तब्बल १५ तास कवितांचा एकपात्री प्रयोग करून जागतिक विक्रम करणारे विसुभाऊ बापट यांच्या ‘ओंकार साधना’, मुंबई निर्मित ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या काव्य नाट्यनुभवने नुकतीच चाळीशी पार करून ४१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. अखंडपणे एखादया एकपात्री प्रयोगास सलग ४० वर्षे उदंड प्रतिसाद मिळणे हे केवळ भारतातच नाही, तर जगभरातील क्वचितच एखादे उदाहरण असेल, या निमित्ताने विसुभाऊंनी आपले स्वतःचे एक युट्युब चॅनेल सुरू करून रसिकांसाठी एक पर्वणीच निर्माण करून दिली आहे
माणदेश हा तसा साहित्यिकांची खाण मानला जातो. विसुभाऊ बापट यांचे मुळगाव विटा. ते येथील महात्मा गांधी विद्यामंदिरात शिकले. लहानपणापासून त्यांना कवितांची आणि गाण्यांची मोठी आवड, ही आवड त्यांचा छंद कधी झाला कळलेच नाही, बघता बघता विसुभाऊंचा तोंडातून ओघवत्या शैलीत एक से बढकर एक कविता बाहेर पडू लागल्या आणि जन्म घेतला तो ‘कुटुंब रंगलय काव्यात’ या अजरामर एकपात्री प्रयोगाने!
विसुभाऊ एकदा का एखाद्या कवितेची पार्श्वभूमी सांगत वाचन करू लागले की, रसिक मंडळी अशी तल्लीन होतात की मग भरभरून दाद मिळते. विसुभाऊंचा असा तब्बल १५ तास अखंडपणे कार्यक्रम करण्याचा जागतिक विक्रम आहे. तसे ते सुमारे ४५ तास हा कार्यक्रम करू शकतात. हे ऐकताच अचंबित व्हावे लागते.
आता ‘कुटुंब रंगलय काव्यात’ने नुकतीच चाळीस वर्षे पूर्ण करून ४१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. महाराष्ट्रातील असा एकही ख्यातनाम कवी नसेल की त्यांची कविता विसुभाऊना मुखोद्गत असेल, अफाट पाठांतर आणि हार्मोनियम सोबत अफलातून सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य मानावे लागेल.
=====
हे हि वाचा: आज ३०० कोटींचा व्यवसाय असणाऱ्या रघुनंदनला एकेकाळी आपली पावभाजीची गाडी बंद करण्याची वेळ आली होती, पण नंतर…
=====
विसुभाऊंच्या भात्यातून एक ना अनेक एका पाठोपाठ अशा कविता जेव्हा बाहेर पडतात तेव्हा परिसर तल्लीन होऊन जातो. बोबड्या बाळाच्या तोंडच्या शब्दापासून म्हाताऱ्या कोताऱ्याची बोली, एखादी हळुवार प्रेम कविता असो अथवा शोर्य गाजवण्याऱ्या ओळी विसुभाऊ डोळ्यातून कधी आसू तर चेहऱ्यावर कधी हसू निर्माण करतात कळतच नाही. म्हणून त्यांचा हा कार्यक्रम आज प्रचंड लोकप्रिय ठरला आहे.
वऱ्हाडी, कोकणी, अस्सल कोल्हापुरी, आदिवासी, आगरी अशा विविधतेने नटलेल्या कवितांचा त्यामध्ये समावेश असतो, महाराष्ट्राबाहेर व जगभरात विसुभाऊंचे कार्यक्रम तर, रसिकांनी डोक्यावर घेतले आहेतच. शिवाय राज्याच्या कानाकोपऱ्यात देखील त्यांना तसाच प्रतिसाद लाभला आहे.
या कार्यक्रमाला ४० वर्ष पूर्ण झाल्यानंतर विसूभाऊंनी रसिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. हे भाग्य आपल्याला लाभल्याचे ते समाधान व्यक्त करत आहेत. आता कालानुरूप बदलले पाहिजे हे ओळखून विसूभाऊंनी स्वतःचे एक युट्युब चॅनेल सुरू केले आहे. त्यालाही उदंड प्रतिसाद मिळत असल्याने विसुभाऊ भारावून गेले आहेत. त्यांचा हा कवितांचा प्रवास असाच अविरतपणे रसिकांसाठी सुरु रहावा यासाठी संपूर्ण देश विदेशातून त्यांना शुभेच्छा येत आहेत.
– संतोषदादा