लहानपणी शाळेतील फळ्यावरील सुविचार वाचनात आला होता. “या जगातील काही लोक स्वतःसाठी जगतात, तर काही देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करतात” या आशयाचा तो सुविचार होता. तेव्हा हा सुविचार समजला नव्हता. पण मनाला भावला होता. सुविचाराखाली नाव लिहिलेले होते, “पद्मश्री बाबा आमटे (Baba Amte)!”
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील देविदास आणि लक्ष्मीबाई आमटे यांच्यासारख्या सुसंस्कारी आणि सुखवस्तू ब्राम्हण कुटुंबात २४ डिसेंबर १९१४ बाबा आमटे (Baba Amte) यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव होते मुरलीधर. परंतु, सर्वजण लाडाने त्यांना बाबा म्हणत असत. बाबा लहानपणापासूनच स्वभावाने खूपच दयाळू होते. बाबांचे घरदार श्रीमंत असल्यामुळे त्यांना म्हणेल ती गोष्ट मिळत असायची. त्यांच्याकडे अगदी लहानपणीच खरोखरची बंदूक होती. ती बंदूक घेऊन ते जंगलात जाऊन प्राण्यांची शिकार करत असत.
बाबांना रेसिंग कारचा कारचा शौक होता त्यामुळे जेव्हा ते १८ वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना एक अँबेसिडर गाडी भेट म्हणून दिली होती. बाबांना मोठे होऊन डॉक्टर व्हायचे होते, पण वडिलांच्या निर्णयाचा आदर करून त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस चालू केली. पण त्यात त्यांचे मन रमत नव्हते. त्यामुळे त्यांनी आवडीच्या मेडिकलच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली. त्या काळच्या दुर्लक्षित असणाऱ्या कुष्ठरोग चिकित्सेवरील अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर वकील असणारे बाबा खऱ्या अर्थाने डॉक्टर झाले.
बाबांना रेसिंग कारचा कारचा शौक होता त्यामुळे जेव्हा ते १८ वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना एक अँबेसिडर गाडी भेट म्हणून दिली होती. बाबांना मोठे होऊन डॉक्टर व्हायचे होते, पण वडिलांच्या निर्णयाचा आदर करून त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस चालू केली. पण त्यात त्यांचे मन रमत नव्हते. त्यामुळे त्यांनी आवडीच्या मेडिकलच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली. त्या काळच्या दुर्लक्षित असणाऱ्या कुष्ठरोग चिकित्सेवरील अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर वकील असणारे बाबा खऱ्या अर्थाने डॉक्टर झाले.
बाबांचे लग्न साधना आमटेंशी झाले. त्यांची आणि साधनाताईंनी भेट कशी झाली याबद्दल पण एक किस्सा सांगितला जातो. बाबांनी साधनाताईंना नातेवाईकांच्या लग्नसमारंभात पहिले होते. झाले असे की, साधनाताईंनी लग्न समारंभ सोडून एका वयस्कर नोकराची मदत केली होती. ती घटना बाबांच्या मनाला स्पर्श करून गेली. त्यानंतर त्यांनी साधनाताईंची पत्नी म्हणून निवड केली.
आता पुढे मात्र खरी कसोटी होती. साधनाताईंच्या आई वडिलांकडे त्यांनी लग्नासाठी मागणी घातली. त्यांच्या घरच्यांनीही मागचा पुढचा विचार न करता लग्नाला होकार दिला आणि १९४६ साली ते विवाहबंधनात बांधले गेले. त्यांनतर बाबा आमटे (Baba Amte) यांनी १४ ऑगस्ट १९४९ रोजी पत्नी साधना आमटे यांच्यासोबत आनंदवनची स्थापना केली आणि कुष्ठरोग रुग्णालय उभारले.
बाबांनी समाजसेवा आणि मानवसेवेची सांगड घालून कुष्ठरोग्यांची निःस्वार्थ सेवा आणि पुनर्वसनाचे कार्य आयुष्यभर केले. दिवसेंदिवस आनंदवन परिवार वाढत चालला होता. १९५१ साली सरकारने आनंदवनच्या विस्तारासाठी भूखंड दिला आणि पुढे २००८ या वर्षापर्यंत आनंदवन हे ३५०० कुष्ठरोग्यांचे रुग्णालय बनले.
====
हे देखील वाचा: सेवाभावी साधनाताई!
====
१९७३ साली बाबांनी भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. पुढे जाऊन नर्मदा बचाव आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांना १९७१ साली समाजसेवेसाठी भारत सरकारच्या वतीने ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांचे आयुष्य जरी ऐशोआरामात गेले असले तरी गोगरिबांसाठी त्यांच्या मनात कणव आणि आपुलकी होती. जेव्हा महात्मा गांधी वर्ध्यात सेवाग्राम आश्रमात आले होते तेव्हा बाबा त्यांना भेटायला गेले होते. महात्मा गांधींच्या विचारांचा बाबांवर मोठा प्रभाव पडला. महात्मा गांधीजींनी त्यांना ‘अभय साधक’ नाव दिले होते. हे नाव देण्यामागे पण एक कारण होते.
१९४२ सालची ती गोष्ट आहे. बाबा आमटे (Baba Amte) रेल्वेने बडोद्याला चालले होते. त्यावेळी रेल्वेत काही इंग्रज शिपाई नवविवाहित महिलेची छेड काढत होते. यावेळी बाबांनी क्रांतिकारी मार्ग अवलंबला. त्यांनी मध्ये पडून इंग्रज शिपायांना थांबवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा गाडी वर्धा स्टेशनमध्ये जाऊन थांबली तेव्हा तिथे खूप सारे लोक जमा झाले. त्यावेळी या सैनिकांच्या तुकडीचा कमांडिंग ऑफिसर तेथे आला. बाबानी सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातल्यावर, त्याने बाबांना चौकशी करण्याचे वचन दिले. ही घटना जेव्हा गांधीजींना समजली तेव्हा त्यांनी बाबांना ‘अभय साधक’ अर्थातच न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा अशी उपमा दिली.
====
हे देखील वाचा: आयुष्याच्या शाळेत अशा घडल्या लता मंगेशकर
====
बाबांकडे संवेदनशीलता, संघटनकौशल्य, प्रखर बुद्धिमत्ता, धाडस, प्रेरणासातत्य आणि शारीरिक कष्ट करायची तयारी असल्यामुळे त्यांनी प्रत्येक प्रकल्प यशस्वी करून दाखवला. विकास आणि प्रकाश या त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजसेवेचे व्रत चालूच ठेवले. अशा या थोर समाजसेवकाचे ९ फेब्रुवारी २००८ रोजी वरोडा येथील निवासस्थानी निधन झाले. बाबांच्या पुढील पिढ्या आजही समाजसेवेचे काम व्यवस्थित पाहत आहेत. त्यांच्या रूपाने आनंदवन परिसरात आजही बाबांचे अस्तित्व जाणवत राहते.
– विवेक पानमंद