“आमची लढाई त्यांच्या विरोधात आहे, ज्यांना आमच्या जंगलावर कब्जा करायचा आहे. आमच्यासाठी विकास म्हणजे जंगल आहे, जो आमचं पालनपोषण करतो” हा अॅमेझॉनमध्ये राहणाऱ्या यानोमामी लोकांचा आक्रोश आहे. १९८० पासून यानोमामी लोकांच्या जमिनीवर बेकायदेशीर गोल्ड मायनिंगचं काम सुरू झालं, तेव्हापासून या यानोमामी लोकांचा जंगल वाचवण्यासाठीचा लढा सुरू झाला आणि आजही ते आपल्या हक्कासाठी लढतायत. अॅमेझॉनमधल्या यानोमामी लोकांबद्दल आणि त्यांच्या जंगल वाचवण्याच्या लढयाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.(Yanomami)
अॅमेझॉन जगातलं सर्वात मोठ जंगल… जितक्या इथे प्राण्याच्या प्रजाती तितक्याच आदिवासी लोकांच्या प्रजाती… इथे असेही कित्येक आदिवासी आहेत. ज्यांचा अजूनही माणसांसोबत Contact होऊ शकला नाही. जंगल त्यांचं सगळ काही आहे… पण तरीही या जंगलांच्या राखणदारांना इथून बाहेर काढलं जात आहे. हे यानोमामी लोकं ब्राझील आणि व्हेनेझुएलाच्या बॉर्डरवर, अॅमेझॉनच्या घनदाट जंगलात आणि डोंगराळ भागात राहतात. त्यांच्या घरांना “शाबोनो” म्हटलं जातं. आता हे शाबोनो म्हणजे एक मोठ्ठं, गोलाकार झोपडं, जे झाडांच्या फांद्या, पानं आणि द्राक्षवेलींनी बनवलेलं असतं. एका शाबोनोत ५० ते ४०० लोक राहू शकतात, आणि सगळे एका मोठ्या कुटुंबासारखे एकत्र राहतात. या लोकांचं आयुष्य पूर्णपणे जंगलाशी जुळलेलं आहे. त्यांचा विश्वास आहे की जंगलातलं प्रत्येक झाड, प्राणी, नदी, आणि अगदी ढगांमध्येही आत्मा असतो. त्यामुळे ते जंगलातून फक्त तेवढंच घेतात, जेवढं त्यांना हवं असतं, त्याचा अतिरेक कधीच करत नाहीत. (Top Stories)
त्यांचं निसर्गाशी नातं इतकं खोल आहे की ते जवळपास ५०० प्रकारच्या वनस्पतींचा वापर खाण्यासाठी, औषधांसाठी, आणि अगदी घर बांधण्यासाठी करतात. आता उदाहरणच बघायचं झालं तर, ते “टिंबो” नावाच्या वेलीचा वापर मासे पकडण्यासाठी करतात. यातून बनवलेलं विष पाण्यात टाकलं की मासे बेशुद्ध होतात, आणि त्यांना सहज पकडता येतं. ते शेती करण्यासाठी “स्लॅश-अँड-बर्न” या टेक्निकचा वापर करतात. या टेक्निक मध्ये ते जंगलात थोडी झाडं तोडतात, ती जाळतात आणि तिथे शेती करतात. त्या जमिनीवरचं काम संपलं की, ते तिथून दुसरीकडे जातात, आणि जंगलाला पुन्हा वाढायला वेळ देतात. या शिफ्टिंग कल्टिव्हेशन प्रोसेसमुळे जंगलाचं काहीच नुकसान होत नाही आणि माती सुपीक राहते. त्यांच्या कुठल्याच गोष्टीमुळे निसर्गाला कोणतंच नुकसान होत नाही. त्यांचं हे पारंपरिक जीवन अगदी आनंदात सुरू होतं आणि १९८० साली वाईट गोष्टीला सुरुवात झाली, ती म्हणजे त्यांच्या जमिनीवर आजूबाजूच्या शहरातील लोकांनी अतिक्रमण करायला सुरुवात केली. (Yanomami)
१९८० साली त्यांच्या जमिनीवर गोल्ड मायनिंग सुरू झालं आणि तेव्हापासून त्यांचं जीवन बदलून गेलं. हे गोल्ड मायनिंगचं काम बेकायदेशीर पद्धतीने सुरू झालं. हे बेकायदेशीर खनन करणारे त्यांच्या जमिनीवर घुसले, त्यांनी जंगलतोड सुरू केली. याचा परिणाम म्हणजे तिथल्या नद्या Mercury मुळे प्रदूषित झाल्या, तिथे कधी नव्हे तर मलेरिया, टीबी सारखे रोग पसरले आणि या गोल्ड माइनिंगमुळे २०% पेक्षा जास्त लोकं मेली. आजही ही समस्या कमी झाली नाही. २०१० ते २०२० या काळात तर यानोमामींच्या जमिनीवर बेकायदा खनन ४९५% ने वाढलं. यामुळे प्रदूषण इतकं वाढलं की त्यांचा परिणाम म्हणजे तिथल्या मुलांमध्ये कुपोषण वाढलं आणि मलेरियाचा आजार आणखी वाढला. २०१९ ते २०२२ या काळात किमान ५७० यानोमामी मुलांचा मृत्यू कुपोषण आणि रोगांमुळे झाला. (Top Stories)
===============
हे देखील वाचा : ‘कॅम्लिन’ ब्रँड परदेशातील नव्हे चक्क भारतातील, वाचा Success Story
===============
याशिवाय आणखी एक भयानक गोष्ट सुरू झाली, ती म्हणजे बेकायदा खनन करणाऱ्यांनी यानोमामी मुली आणि महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनाही समोर आल्या. काही खनन करणारे ११-१२ वर्षांच्या मुलींना अन्न आणि कपड्यांच्या बदल्यात लैंगिक शोषणासाठी भाग पाडतात. यामुळे यानोमामी समाजात सामाजिक अस्थिरता आणि तणाव वाढला. पण यानोमामी हार मानणारे नव्हते. त्यांचे नेते दावी कोपेनावा, गेल्या अनेक दशकांपासून त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत. १९९१ मध्ये त्यांच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेमुळे ब्राझील सरकारला यानोमामींची ९.६ दशलक्ष हेक्टर जमीन “यानोमामी पार्क” म्हणून राखीव ठेवावी लागली. ही जमीन स्वित्झर्लंडपेक्षाही दुप्पट आकाराची आहे! (Yanomami)
दावी कोपेनावा यांनी “हुतुकारा यानोमामी असोसिएशन” नावाची संस्था स्थापन केली, जी यानोमामींच्या हक्कांसाठी आणि जंगलाच्या संरक्षणासाठी काम करते. व्हेनेझुएलातही “होरोनामी” नावाची संस्था आहे, जी तिथल्या यानोमामींसाठी लढते. या संस्था आणि आंतरराष्ट्रीय गट, जसं की सव्हरायव्हल इंटरनॅशनल आणि अॅमेझॉन वॉच, यानोमामींच्या बाजूने लढत आहेत. २०२३ मध्ये ब्राझील सरकारने यानोमामी जमिनीवरून बेकायदा खनन करणाऱ्यांना हटवण्यासाठी आपत्कालीन कारवाई सुरू केली. पण अजूनही हे काम सुरूच आहे. (Top Stories)
यानोमामी फक्त स्वतःसाठीच लढत नाहीत, तर ते अॅमेझॉनच्या जंगलाच्या रक्षण व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत. अजूनही यानोमामींच्या या लढ्यामुळे त्यांच्या जमिनीवर अजूनही जंगल जसंच्या तसं आहे, कारण त्यांनी ते टिकवून ठेवलंय. ते पुढेसुद्धा टिकून राहावं म्हणून आंदोलनं करत आहेत. तिथल्या लोकांची एवढीच इच्छा आहे की, त्यांना फक्त त्यांचं निसर्गाशी जे आधीपासूनचं पारंपरिक नातं होतं ते टिकवायचं आहे.