Home » Rekha Gupta : रेखा गुप्ता यांच्यामुळे राजधानी बहरणार का ?

Rekha Gupta : रेखा गुप्ता यांच्यामुळे राजधानी बहरणार का ?

by Team Gajawaja
0 comment
Rekha Gupta
Share

बुधवारी संध्याकाळी दिल्लीतल्या शालिमार बागमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण होत. अरुंद गल्लीबोळात गर्दी जमून “जय श्री राम !” च्या घोषणा दणाणत होत्या. त्यांच्या हातात भाजपचे झेंडे फडकत होते. याच परिसरात राहणाऱ्या मनीष गुप्ता आणि त्यांच्या आई मीरा यांचं सगळे जण अभिनंदन करत होते. कारण मनीष यांच्या पत्नी आणि मीरा यांच्या सूनबाई रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याची घोषणा झाली होती. “रेखाजीच नव्हे, तर आज संपूर्ण जनता दिल्लीची मुख्यमंत्री झाली आहे,” अशी भावना लोक व्यक्त करत होते. तब्बल 27 वर्षे सत्तेबाहेर राहिल्यानंतर भाजपाने दिल्लीच्या सत्तेत पुनरागमन केलं. निकालाला दोन आठवडे उलटल्यावरही दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत रहस्य कायम होतं. दिल्लीच्या पहिल्या विधानसभेत सुषमा स्वराज भाजपच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. त्याच दिल्लीत आता पुन्हा मुख्यमंत्री कोण होणार याकडे देशाचं लक्ष लागलं होतं. अखेर बुधवारी संध्याकाळी ती घोषणा झाली. भाजपच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांची निवड झाली. पण या रेखा गुप्ता आहेत कोण आणि त्यांच्या नेतृत्वात दिल्लीत काय बदल घडेल जाणून घेऊ… (Rekha Gupta)

रेखा यांची दोन मुलं आहेत. मुलगी हर्षिता ही MBA GRADUATE असून ऑस्ट्रेलियामध्ये काम करते, तर मुलगा निकुंज वेल्लोरमध्ये इंजीनियरिंगचं शिक्षण घेत आहे. त्यामुळे ते या आनंदात थेट सहभागी होऊ शकले नाहीत. सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी मार्लेना या तीन मुख्यमंत्र्यांनतर ५० वर्षांच्या रेखा गुप्ता या दिल्लीचं सर्वोच्च पद भूषवणाऱ्या चौथ्या महिला ठरल्या आहेत. गुरुवारी रामलीला मैदानावर त्यांचा शपथविधी होईल. खरं तर मुख्यमंत्रिपदासाठीच्या शर्यतीत त्या आघाडीवरही नव्हत्या. विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून रेखा यांची निवड होण ही भाजपमधीलच अनेकांना आश्चर्यचकित करणारी होती. तब्बल तीन वेळेस शालिमार बाग मतदारसंघातून दिल्ली महापालिकेवर निवडून आलेल्या रेखा गुप्ता पहिल्यांदाच आमदार बनल्या आहेत आणि त्यांच्या गळ्यात थेट मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे. (Political News)

असं असलं तरी राजकारणात त्या नवख्या नाहीत. रेखा यांनी तीन दशकांपेक्षा अधिक काळाच्या राजकीय प्रवासात अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. सामान्य विद्यार्थी नेत्यापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत असा त्यांचा प्रवास राहिला आहे. मात्र प्रसिद्धीपासून त्या नेहमीच दूर राहिल्या आहेत. दिल्ली भाजपच्या लो प्रोफाईल नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. मुली व महिलांच्या कल्याणासाठी रेखा यांनी केलेल्या कामाचं त्यांना बक्षीस मिळालं, असं मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलं आहे. दिल्लीतील आस फाउंडेशन नावाच्या संघटनेशी रेखा या संबंधित आहेत. अनेक दशकांपासून त्या या संस्थेने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. (Rekha Gupta)

दर नवरात्रीत त्या शेकडो मुलींसोबत देवीची पूजा करतात. शिवाय, गोरगरिबांना बॅग आणि ब्लँकेटचे वाटप करतात. या सर्व सामाजिक कामाची परिणती आज दिल्लीच्या सत्तेची चावी त्यांच्या हातात येण्यात झाली आहे. रेखा यांचा जन्म 1974 साली हरियाणाच्या नंदगड गावात झाला. त्यांचं कुटुंब 1976 मध्ये दिल्लीला स्थलांतरित झालं. 1992 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी रेखा यांचा संबंध आला. तिथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. अभाविपमध्ये असतानाच 1996 मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या म्हणजेच डूसूच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. दिल्लीच्या मुख्यमंत्री बनणाऱ्या त्या डुसूच्या पहिल्या पदाधिकारी आहेत. मेरठमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. (Political News)

महाविद्यालयीन शिक्षणानंतर रेखा यांनी पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून अनेक वर्षे तळागळात काम केलं. रेखा यांना 2007 मध्ये उत्तरी पितमपुरा वॉर्डमधून नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी देण्यात आली. ही त्यांची पहिली मोठी संधी होती. त्यात त्यांनी सहज विजय मिळविला. त्या काळात आपल्या वॉर्डात ग्रंथालये, उद्याने आणि स्वीमिंग पूल बांधण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तसेच “सुमेधा योजना”सारख्या काही योजना आल्या. यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थीनींना शिक्षणासाठी मदत करण्यात येत होती. नंतर 2012 मध्ये त्या उत्तर दिल्ली महानगरपालिकेत सलग दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून विजयी झाल्या. तेव्हा त्यांना शिक्षण समितीचं अध्यक्षपद मिळालं. (Political News)

रेखा यांना 2015 च्या विधानसभा निवडणुकीत शालिमार बाग मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या बंदना कुमारी यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली. परंतु त्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. नंतर 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने विद्यमान नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला. त्यात गुप्ता यांचेही तिकीट कापण्यात आलं आणि काही वर्षांसाठी त्या निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर फेकल्या गेल्या. मात्र 2022 मध्ये, त्या शालीमार बाग बी वॉर्डमधून पुन्हा नगरसेविका म्हणून निवडून आल्या. (Rekha Gupta)

दोन वर्षांपूर्वी, 2023 मध्ये त्यांना आपच्या शेली ओबेरॉय यांच्याविरुद्ध महापौरपदाची उमेदवारी देण्यात आली. पण सभागृहातील संख्याबळ त्यांच्या विरोधात होते, त्यामुळे त्यांचा पराभव झाला. चढ-उताराने भरलेल्या या प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा यंदा आला. दिल्लीतील राजकीय वनवास संपवण्यासाठी कंबर कसलेल्या भाजपने पुन्हा त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. यावेळी गुप्ता यांनी पक्षाला निराश केले नाही. त्यांनी 2015 च्या पराभवाचा बदला घेतला आणि विद्यमान आमदार तसेच त्यांच्या जुन्या प्रतिस्पर्धी आपच्या बंदना कुमारी यांचा 29,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला.

==============

हे देखील वाचा : Suresh Dhas : चंद्रशेखर बावनकुळेंमुळे धस आणि मुंडे यांच्यामध्ये मांडवली ?

==============

विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर रेखा व त्यांचे सहकारी राजनिवास येथे गेले. तिथे त्यांनी उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला. गंमत म्हणजे भाजप आमदारांच्या बैठकीत आमदार परवेश वर्मा, सतीश उपाध्याय आणि विजेंदर गुप्ता यांनी मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. हे सर्व जण या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परवेश वर्मा हे तर आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांना पराभूत करून निवडून आलेले. शिवाय ते माजी मुख्यमंत्री साहिबसिंग वर्मा यांचे चिरंजीव. तहीही भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा अवलंब करत रेखा यांना संधी दिली. (Political News)

रेखा यांना अनुकूल ठरणारे तीन प्रमुख घटक विश्लेषकांनी अधोरेखित केले आहेत. एक म्हणजे त्या महिला आहेत. दुसरे त्या राजकीयदृष्ट्या प्रबळ असलेल्या बनिया समुदायातील आहेत. या समुदायाने भाजपच्या विजयात तर महत्त्वाची भूमिका बजावली आहेच, शिवाय लवकरच निवडणुका होणार असलेल्या बिहारमध्येही बनिया मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची पार्श्वभूमी सामान्य स्तरातील आहे. तीन दशकांपासून अधिक काळ राजकारणात असूनही त्यांच्या विरोधात एकही गुन्हेगारी स्वरूपाचा खटला नाही, हे विशेष. रेखा यांच्या रूपाने महिला सशक्तीकरणाचा दावाही भाजपला करता येईल. सध्याच्या घडीला भाजपची 21 राज्यांमध्ये सत्ता आहे. पण या राज्यांमध्ये एकही महिला मुख्यमंत्री नाही. त्यामुळे रेखा यांची दावेदारी अधिक भक्कम झाली. त्याचमुळे रेखा यांच्या रूपाने भाजपचे दिल्लीत पुन्हा महिला राज आलं आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.