मार्केटमध्ये खरेदीसाठी गेल्यानंतर सर्रास दिसून येणारं दुकान म्हणजे रसवंती. रस काढण्याच्या मशीनला लावलेल्या घुंगरांचा छुनछुन आवाज लगेच आपले लक्ष वेधून घेतो आणि रस पिण्यासाठी आपल्याला आकर्षित करतो. पूर्वी फक्त उन्हाळ्यामध्ये दिसून येणाऱ्या या रसवंती आता बाराही महिने आपल्याला सहज उपलब्ध असतात. आता उसाचा रस म्हटल्यावर कोणीच नाही म्हणत नाही. सगळ्यांनाच उसाचा रस खूप आवडतो, आणि उसाचा पिणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर देखील असते. (Sugarcane)
मात्र तुम्ही कधी एक निरीक्षण केले आहे का? की आपण जेवढ्या रसवंत्या बघतो त्या सर्वच रसवंत्यांची नावं नवनाथ आणि कानिफनाथच असेच दिसते. समोरासमोर जरी दोन रसवंत्या असल्या तरी त्यांची नावं यापैकीच एक असते. मग असे का? आजच्या काळात जिथे आपण आपल्या खाद्यपदार्थांच्या दुकानांना फॅन्सी नावं देऊन लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत, तिथे रसवंत्याना मात्र अशीच जुनी आणि एकसारखीच नावे का दिली जातात? रसवंत्या कोणाच्या फ्रेंचायजी आहेत का? चला आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.(Marathi Trending News)
नवनाथ, कानिफनाथ अशा रसवंतीच्या नावांच्या मागची एक कथा काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर कमालीची व्हायरल झाली होती. का रसवंत्यांना असे नावं देतात याबद्दल डॉक्टर मंत्री यांनी एक पोस्ट शेअर केली होती. त्यात सांगितले होते की, “नवनाथ रसवंती गृहाच्या नावाची गोष्ट आहे साधारण ७० – ८० वर्षांपूर्वीची. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्या बोपगाव नावाचं गाव आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या मानाने हा तसा दुष्काळी पट्टाच म्हणावा लागेल. पण इथला शेतकरी फार जिद्दी. जवळ असणाऱ्या थोड्याथोडक्या पाण्यावर हा शेती जगवत होता. त्याकाळात साखर कारखान्यांचं एवढं पेव फुटलेलं नव्हतं. त्यामुळे शेतात पिकणाऱ्या ऊसाला हक्काचं मार्केट नव्हतं. त्यातून मिळणारा रोजगार नव्हता. (Marathi Top News)
अशातच गावातला कोणीतरी खटपट्या तरुण रोजगार शोधायला मुंबईला गेला. तिथं गेल्यावर त्याला कळाल की इथं आपल्या ऊसाला भरपूर मागणी आहे. त्याकाळात देशी ऊस असायचे. लहान मुलाला देखील एका फटक्यात शेंड्यापासून बुडख्यापर्यंत सोलता येईल असा तो ऊस असायचा. या ऊसाचे छोटे छोटे तुकडे करून बरणीत घालून ते मुंबईला विकले जाऊ लागले. नंतर कोणाच्यातरी लक्षात आलं असं दारोदारी फिरण्यापेक्षा एका जागी दुकान टाकून तिथ हे रस काढून विकावं. (Top Stories)
पुरंदरच्या गोड ऊसाच्या रसाने मुंबईत जादू केली. हळूहळू बोपगाव, सासवड, चांबळी, बिव्हरी अशा गावातली बंडी विजार घालणारे शेतकरी रसवंतीच्या बिझनेससाठी पूर्ण राज्यभरात पसरले. जिथं जातील तिथं दुधात साखर विरघळावी तसे तिथल्या माणसांमध्ये विरघळून गेले. धंद्यात सचोटी ठेवली. आपल्या रसवंतीला त्यांनी ब्रँड बनवलं. (Marathi Top News)
‘नवनाथ’ किंवा ‘कानिफनाथ’ हेच नाव का?
“ज्या बोपगावमधून हे रसवंती चालवणारे महाराष्ट्रभर पसरले त्या बोपगावजवळच्या डोंगरावरच्या गुहेत नाथसंप्रदायाच्या ९ नाथांपैकी एक कानिफनाथ स्वामी तपश्चर्येला बसले होते असं सांगतात. आजही त्या जागेवर सुंदर मंदिर आहे. अख्खा पुरंदर तालुका या कानिफनाथांचा भक्त आहे. इथली माणसं जगभर पसरली पण आपल्या मातीला विसरली नाहीत. त्यांनी आपल्या रसवंतीगृहाचे नाव श्रद्धेनं कुणी ‘नवनाथ’ ठेवलं तर कुणी ‘कानिफनाथ’ ठेवलं. (Social Update)
========
हे देखील वाचा : Maharashtra: असं मिळालं आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव
========
हत्ती कनेक्शन
ताजा ऊस हा हत्तीला फार आवडतो आणि कानिफनाथांची उत्पत्ती ही हत्तीच्या कानातून झाली अशी दंतकथा आहे. त्यामुळे भाव तिथे देव या न्यायाने कानिफनाथांना ऊस, रस, गूळ आवडतो. इतका यामागील साधा अर्थ आहे. दत्तसंप्रदायाची नाथसंप्रदाय ही शाखा आहे. त्यामुळे ‘नवनाथ रसवंती’, ‘कानिफनाथ रसवंती’ ही नावे ठेवण्याचा प्रघात पडला आणि तो जनमानसात रुळला. ‘नवनाथ’ अथवा ‘कानिफनाथ’ रसवंतीगृहाचं यश बघून इतर रसवंतीगृहवाले सुद्धा तेच नाव वापरू लागले. (Marathi Latest News)
पूर्वी बैलांच्या सहाय्याने फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर ऊसाचा रस काढला जायचा. पुढे काळानुरुप बैल गेले अन् त्याजी लोखंडी मशीन्स आले. पण या बैलांनी आपल्याला एकेकाळी रसवंतीच्या माध्यमातून जगवलेलं याची जाणीव या शेतकऱ्यांच्या पोरांना होती, ते ती विसरले नाही. त्यामुळेच बैलाच्या गळ्यातल घुंगरू आजही रस काढणाऱ्या मशीनच्या चरख्यावर छुमछुम आवाज करत आहे.”