उन्हाळा संपून पावसाची सर सुरू झाली की सर्वत्र नजारा दिसतो, तो म्हणजे हिरवळीचा. रखरखत्या उन्हाळ्यानंतर संपूर्ण निसर्गातील जीवसृष्टी पावसाच्या धारेने समाधानी झालेली असते. गाई-गुरे चारा चरण्यासाठी डोंगर कपाऱ्यात सोडलेली असतात.
शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झालेले असते. तर अनेक पर्यटक पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटन स्थळांना भेटी देत असतात. अशातच पुन्हा खेळ सुरू होतो, तो म्हणजे ऊन-पाऊसाचा. अर्थातच यावेळी चाहूल लागते, ती म्हणजे श्रावण महिन्याची.
श्रावण महिन्याला हिंदू संस्कृतीत अनन्य साधारण महत्व दिले जाते. श्रावण महिना सुरू झाला की, महादेवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी ओसंडून वाहू लागते. तर काहीजण श्रावण महिन्यात सव्वा महिन्यासाठी मांसाहाराचा त्याग करतात.
पण श्रावण महिन्यात मांसाहार न खाण्यापाठीमागेही खूप मोठे वैज्ञानिक कारण आहे. अनेकजण श्रावण महिन्यात मांसाहार न करण्याला भोळी श्रद्धा किंवा मग अंधविश्वास म्हणतात. पण आज आपण या लेखातून श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये, त्यापाठीमागे नेमके काय वैज्ञानिक कारण आहे हे जाणून घेणार आहोत.
मांस, मटन, मासे हे पदार्थ पचायला जड जातात. वातावरणातील बदलाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असतो. पावसाळ्यात आपली पचनशक्ती काहीसी मंदावलेली असते. म्हणून श्रावणात व खासकरुन पावसाळ्यात शक्यतो मांसाहार पदार्थ खाणे टाळले जाते.
पावसाळ्यात वातावरणात ओलसर व दमटपणा वाढलेला असतो. ढगाळ वातावरणात मांसावरील बॅक्टेरिया वेगाने वाढत असतो. असे मांस खाण्यात आल्यास अनेक शारीरिक व्याधी उद्भवू शकतात. त्यामुळे शक्यतो पावसाळ्यात व परिणामी श्रावण महिन्यात मांसाहार टाळले जाते.
पावासाळ्यात अति प्रमाणात मांसाहार केल्यास शरिराचे तापमान वाढू शकते. परिणामी ते आपल्या शरीरास धोकादायक ठरु शकते. तसेच, हृदयासंबंधी आजार उद्भवू शकतात. शारीरिक दुखणी वाढतात. त्यामुळे या काळात मद्यपान करणेही वर्ज्य मानले जाते.
तसेच आजून एक महत्वाच वैज्ञानिक कारण म्हणजे श्रावण महिना हा खास करुन प्राण्यांच्या प्रजननाचा काळ मानला जातो. मासे व अन्य प्राण्यांची गर्भधारणा याच काळात होत असते. अशा प्रजनन काळात सतत मासेमारी केल्यास, माशांचे सेवन केल्यास माशांच्या प्रजाती धोक्यात येऊ शकतात. त्याच्या प्रजाती नष्ट होऊ शकतात.
म्हणून या सर्व कारणाने श्रावणात मांसाहार टाळले जाते. तसेच आजून एक भावनिक आणि सांस्कृतिक कारण म्हणजे श्रावण महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात सण-उत्सव साजरे केले जातात. त्यामुळेही काहीजण श्रद्धेपोटी श्रावण महिन्यात मांसाहार खाण्यास टाळतात.
– निवास उद्धव गायकवाड