डोक्यावर शंकूसारखी काळी टोपी, पांढरी Santacluas वानी दाढी, लोंबणारी लाल जीभ, अंगभर काळे कपडे, कंबरेला घुंगरू… अशी राक्षसासारखी वेशभूषा केलेला माणूस गावभर फिरून लहान मुलांना घाबरवत असतो, अशा कितीतरी व्हिडिओ तुम्ही पाहिल्याच असतील. आधी वाटतं, हा कोणीतरी कलाकार आहे. पण मुळात हा कोकणच्या लोककलेचा आणि संस्कृतीचा एक भाग आहे. याच नाव आहे संकासूर… कोकणातलो शिमगो तसं प्रसिद्धच आहे. त्यात ठिकठिकाणी संकासूराची वेशभूषा घातलेली लोकं होळीभोवती नाचत असतात. घराघरात भेटी देत असतात. पण हा संकासूर नेमका आहे तरी कोण ? कोकणातल्या काही भागांमध्ये त्याला का पुजलं जातं ? आणि काही भागांमध्ये त्याला भगवान श्रीकृष्ण यांच्यासोबत का जोडलं जातं ? जाणून घेऊ. (Shankasur)
कोकण म्हटलं तर डोळ्यांसमोर येतं इथलं निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे, हिरवेगार डोंगर… पण कोकणात आणखी एक गोष्ट वास्तव्य करते ती म्हणजे इथली संस्कृती ! गणपती असो शिमगा… कोकणातला माणूस भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असो, तो कोकणात येतोच… इथल्या लोककला भयंकर प्रसिद्ध ! आता भयंकर शब्द वापरला, कारण लोककला आहे अगदी राक्षसासारखी आणि तिचं नाव आहे संकासूर ! आता हा संकासूर (Shankasur) नेमका शिमग्यातच दिसतो. पण कोकणातल्या विविध भागांमध्ये त्याचं महत्त्वदेखील वेगवेगळ आहे.
काही शिमग्यामध्ये तो नाचतो, तर काही ठिकाणी त्याची पूजा होते. मुळात संकासूर ही एक लोककलाच… काळ्या रंगाचं वस्त्र घालून टोपी आणि पांढरी दाढी ठेवलेला, एक राक्षस गावात हिंडत असतो. तो नाचतो, सगळ्याचं मनोरंजन करतो. कोकणात शिमग्याला प्रत्येक गावात देवाची पालखी निघते. याच पालखीसोबत राक्षस कुळातला एक राजा म्हणजेच संकासूर फिरत असतो. तो अनेकांना वेठीने म्हणजेच चिंध्यापासून बनवलेल्या काठीने मारत असतो, त्याचा मार इथे आशीर्वाद समजला जातो. मुलं त्याच्याभोवती फेऱ्या पण घालतात आणि मुलं त्याला प्रचंड घाबरतात सुद्धा ! गेल्या शेकडो वर्षांपासून ही संकासुराची परंपरा कोकणात सुरूच आहे.
आता कोकणात या संकासुराची(Shankasur) तुम्हाला वेगवेगळी स्टोरी ऐकायला मिळते. एक गोष्ट अशी की, पुराणात हयग्रीव नावाचा दैत्य होता. त्याने ब्रम्हदेवाकडून वेद पळवले आणि समुद्रात शंखात जाऊन तो लपला. यानंतर भगवान विष्णू यांनी मत्स्य अवतार घेऊन त्याचा वध केला. हा हयग्रीव म्हणजेच संकासूर…असं म्हटलं जातं की हा ज्ञानदानाचं कामदेखील केलं होतं. काहींच्या मते तर संकासूर हा पराक्रमी आणि कष्टकरी राजा होता. त्यातच संकासुराला नवस बोलण्याची आणि फेडण्याची प्रथादेखील आहे.
काही भागांमध्ये संकासुराला भगवान श्रीकृष्ण यांचाही अवतार मानतात. त्याची दंतकथा अशी की, भगवान श्रीकृष्णाने ६५ दिवस सांदीपनी ऋषी यांच्याकडे वास्तव्य केलं. यावेळी त्यांनी सर्व विद्या संपादित केल्या. अखेरच्या दिवशी श्रीकृष्णाने सांदीपानी ऋषीना गुरुदक्षिणाबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की, माझा मुलगा समुद्राने गिळला आहे, तो मला हवा. मग श्रीकृष्ण समुद्राकडे गेले आणि समुद्राकडे गेल्यानंतर त्यांनी विचारणा केली कि सांदिपनी ऋषींचा मुलगा आम्हाला दे. समुद्रदेव म्हणाला की. मी तो गिळलेला नाही. परंतु माझ्या पोटामध्ये एक असुर आहे.
================
हे देखील वाचा : Scarface : जगातला सर्वात शक्तिशाली सिंह ज्याचं राज्य १ लाख एकरपर्यंत होतं
================
त्या असुराने गिळला असावा, त्याप्रमाणे भगवान श्री कृष्णाने सागरामध्ये उडी मारली. त्या असुराला ठार मारलं. पण त्याच्या पोटामध्ये तो मुलगा काही सापडला नाही. तेव्हा श्रीकृष्ण यांना आपल्याकडून चूक झाल्याची जाणीव झाली आणि त्यांनी त्या असुराला वरदान दिला की, तुझ्या केवळ दर्शनाने पाप नष्ट होतील, संकट दूर होतील. तुझी फाल्गुन महिन्यात पूजा केली जाईल. आणि हाच तो संकासूर (Shankasur) आहे, ज्याची पूजा रत्नागिरी भागात केली जाते.
दक्षित कोकणात फक्त संकासूर नाचवले जातात. किंवा दशावतार आणि इतर नाटकांमध्ये ते दिसून येतात. मुद्दा काय तर ही आहे लोककला… पण सणांमध्ये आणि अनेक दंतकथांमध्ये हा संकासूर आपल्याला सापडतो. महत्त्वाचं म्हणजे आज तो कोकणातल्या संस्कृतीचा आणि शिमग्याचा महत्त्वपूर्ण भाग झाला आहे. तुमचा कोकणातला एखादा संकासुराचा किस्सा असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.