गेल्या आठवड्यात पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात राजनीती आणि लोकप्रशासन विभागात प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या प्रोफेसर शांतिश्री धूलिपूडी पंडीत (Santishree Dhulipudi Pandit) यांची दिल्ली येथील जवाहर लाल नेहरु विद्यापीठात कुलगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. वरवर पहाता ही साधी बातमी वाटते. त्यामुळेच या नेमणुकीला फारसे महत्त्व देण्यात आले नाही.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ म्हणजे जेएनयू. दिल्लीच्या या विद्यापीठाची महती त्याच्यातील अभ्यासक्रमापेक्षा त्यात होणाऱ्या वादग्रस्त घटनांमुळेच सर्वश्रुत झाली आहे. या विद्यापीठाची धुरा आता एका महिलेकडे म्हणजेच प्रोफेसर शांतिश्री यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्या या विद्यापिठाच्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत. प्रोफेसर शांतिश्री यांचा बायोडेटा, त्यांची विद्वता यावर नजर टाकल्यास जेएनयुमध्ये कडक शिस्त निर्माण होईल यात शंकाच नाही. त्यामुळेच प्रोफेसर शांतिश्री यांच्या नेमणुकीचे मान्यवरांनी स्वागत केले आहे.
प्रोफेसर शांतिश्री पंडित (Santishree Dhulipudi Pandit) यांचा जन्म सेंट पीटर्सबर्ग १५ जुलै १९६२ मध्ये झाला. तिथे त्यांची आई ओरीऐंटल फॅकल्टी विभागात तमिळ आणि तेलुगूची प्राध्यापिका होती. त्यांचे वडील सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत. पत्रकार आणि लेखक म्हणूनही त्याची ओळख आहे.
प्रोफेसर शांतिश्री पंडित (Santishree Dhulipudi Pandit) यांचे प्राथमिक शिक्षण चेन्नई येथे झाले. इतिहास आणि मानसशास्त्राची पदवी त्यांनी प्रेसिडेंसी कॉलेजमधून मिळवली. त्यात त्यांनी सुवर्णपदक मिळवले आहे. जेएनयुमध्येच त्यांनी उच्चशिक्षण घेतले. एम. फिल. आणि पीचडी अभ्यासक्रमासाठी त्यांनी जेएनयूचिंच निवड केली होती. एम.फिल. मध्ये त्या विद्यापिठात अव्वल क्रमांकावर होत्या. शैक्षणिक वर्षांमध्ये शांतिश्री यांनी पाच मानाची पदकं आणि दोन विद्यापिठांची पदकं मिळवली आहेत. याशिवाय १९८५-८७ या काळात त्यांनी तमिळनाडू स्टूडंट असोसिएशनच्या सचिव पदाची जबाबदारी सांभाळली आहे.
प्रोफेसर शांतिश्री पंडित (Santishree Dhulipudi Pandit) यांनी करिअरची सुरुवात १९८८ मध्ये गोवा विश्वविद्यालयापासून केली. १९९३ मध्ये त्या पुणे विद्यापिठात सामील झाल्या. युजीसी, आईसीएसएसआरच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. पीएचडी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून त्या काम करतात.
====
हे देखील वाचा: महात्मा गांधींनी बाबा आमटे याना ‘अभय साधक’ पदवी का दिली होती? ही आहे त्यामागची कहाणी
====
अमेरिकन स्टडीज रिसर्च इंस्टिट्यूट, इंडीयन असोसिएशन ऑफ अमेरिकन स्टडीज यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये त्यांनी सदस्य म्हणून काम पाहिले आहे. पार्लियामेंट ऐड फॉरेन पॉलिसी इन इंडीया, रीस्ट्रक्टरिंग इनवायरमेंटल इन एशिया एथनिक एंड पॉलिसी ही त्यांची पुस्तके लोकप्रिय आहेत. तब्बल १७० रिसर्च पेपर त्यांनी लिहिले आहेत.
प्रोफेसर शांतिश्री पंडित (Santishree Dhulipudi Pandit) या जेएनयुच्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत. जेएनयुच्या ५३ वर्षाच्या काळात आत्तापर्यंत १२ कुलगुरू झाले आहेत. हिंदी, इंग्रजी, संस्कृत, मराठी, तमिळ भाषांच्या जाणकार म्हणून त्यांची ओळख आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय राजनितीच्या अभ्यासक म्हणूनही त्या परिचीत आहेत. केंद्र सरकारच्या अनेक संशोधन अहवालासाठी त्यांनी काम केले आहे.
====
हे देखील वाचा : आज ३०० कोटींचा व्यवसाय असणाऱ्या रघुनंदनला एकेकाळी आपली पावभाजीची गाडी बंद करण्याची वेळ आली होती, पण नंतर…
====
जेएनयुचे प्रोफेसर जगदिश कुमार यांचा पदभार आता शांतिश्री सांभाळणार आहेत. शिक्षण क्षेत्राचा ३४ वर्षाचा अनुभव आणि प्रचंड विद्वात्ता असलेल्या शांतिश्रीसाठी ही नेमणूक एक आव्हान ठरणार आहे. २०१६ मध्ये जेएनयू मध्ये झालेल्या आंदोलनानं अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. देशविरोधी घोषणा आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन यामुळे जेएनयू भारताच्या राजकारणात अग्रस्थानी आले होते. याच जेएनयूची नव्यानं ओळख आता पहिल्या महिला कुलगुरू शांतिश्री कशी करुन देतात, याकडे आता अभ्यासकांचे लक्ष आहे.
– सई बने