Home » Uddhav Thackeray : ठाकरेंचा स्वबळाचा नारा स्मार्ट मूव्ह की मोठी रिस्क?

Uddhav Thackeray : ठाकरेंचा स्वबळाचा नारा स्मार्ट मूव्ह की मोठी रिस्क?

by Team Gajawaja
0 comment
Share

हो नाही करत करत अखेर उद्धव ठाकरे यांनी येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत हातमिळवणी करून उद्धव यांनी महाविकास आघाडीची मोट बांधली. या आघाडीच्या बळावर ते अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिले. पुढची अडीच वर्षे विरोधी पक्षात काढली. मात्र या संपूर्ण काळात आघाडीचा त्यांना कुठलाही फायदा झाला नाही, उलट शिवसेनेचे बळ कमी झालं, ही सामान्य शिवसैनिकांची तक्रार होती. त्या तक्रारीची दखल घेऊन उद्धव यांना स्वबळाचा नारा देणं भाग पडलं. सर्वोच्च नेत्याने दिलेल्या आदेशावर कार्यकर्त्यांनी निमूटपणे काम करण्याऐवजी कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार नेत्याला निर्णय घेण्यासाठी भाग पडल्याची शिवसेनेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असावी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख असलेल्या ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक नवीन वळण आलं आहे. हा निर्णय उद्धव ठाकरे यांना का घ्यावा लागला? त्याने येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय फरक पडेल? हे जाणून घेऊ. (Uddhav Thackeray)

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस यश मिळाल्यानंतर आघाडीतील घटक पक्षांचे नेते जोषात होते. निवडणुकीचे जागावाटप होण्यापूर्वीच मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यात भांडणे लागली होती. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील पराभवाने शहाणे झालेल्या महायुतीतील तिन्ही पक्षांनी आपल्या चुका सुधारल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. इतकंच नाही तर या पराभवानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये वाद सुरू झाला. संजय राऊत, नाना पटोले, विजय वडेट्टीवार असे नेते एकमेकांवर पराभवाचे खापर फोडू लागले.

ठाकरे कुटुंबावरील निष्ठा म्हणून जे सामान्य शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, ते या सर्वांमुळे अस्वस्थ होऊ लागले. उबाठा सेनेतून अनेक नेते व कार्यकर्त्यांची रिघ अन्य पक्षांत लागली. पुण्यात पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, कुडाळ आणि रत्नागिरीतील अनेक माजी नगरसेवकांनी व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. उबाठा सेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी आपल्या पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काही पदाधिकारीही उबाठा सेनेतून शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. विदर्भातही तीच स्थिती आहे.(Uddhav Thackeray)

त्यावर उद्धव ठाकरे यांनी वरकरणी “ज्यांना पक्ष सोडून जायचे असेल ते खुशाल जाऊ देत. जे शिल्लक राहतील, त्यांना घेऊन पक्ष वाढवू,” अशी प्रतिक्रिया दिली. परंतु हे असेच चालू राहिले तर आपले अस्तित्व संपून जाईल याची जाणीव त्यांना झाली. तेव्हा त्यांनी राज्यातील बहुतांश भागातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्या सर्वांनी एकमुखाने स्वबळावर लढण्याचा आग्रह केला. तेव्हा कुठे ठाकरे यांनी स्वबळाचे पाऊल उचललं.

राज्यात आता इतक्यात सार्वत्रिक निवडणुका होणार नाहीत, परंतु मुंबई महापालिकेसह राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीच केलेली होती. ठाकरे यांनी तिला दुजोराच दिला आहे.

मुंबई महापालिका ही शिवसेनेसाठी जीव की प्राण आहे. शिवसेनेच्या दृष्टीने मुंबई महापालिका जिंकणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व टिकवणं, तसंच आपल्या राजकीय शक्तीचं प्रदर्शन करणं असतं. त्यामुळेच मुंबई पालिकेची निवडणूक शिवसेना नेहमीच जीवाच्या कराराने लढते. आपण राजकारणात अजूनही महत्त्वाचे आहोत, हे दाखवून देण्याची ती संधी असते. मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक आहे. तब्बल 39 हजार कोटी रुपयांचा तिचा अर्थसंकल्प आहे. हे बजेट अनेक राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त आहे. तसंच, मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी राज्य सरकारचा निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. म्हणूनच शिवसेनेच्या तिजोरीच्या चाव्या म्हणूनही मुंबई पालिकेकडे पाहिले जातं.(Uddhav Thackeray)

आणखी एका दृष्टीने मुंबई पालिकेची निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाची असते. शाखा हा शिवसेनेचा प्राण समजला जातो. शाखा पातळीवर कार्यकर्त्यांचे संघटन आणि नवीन कार्यकर्त्यांची भरती होण्यासाठी मुंबईची पालिका निवडणूक ही नामी संधी असते. वर्षानुवर्षे शिवसेनेने याच प्रकारे आपली संघटना बांधून ठेवली आहे. म्हणूनच 1985 पासून शिवसेना मुंबई महापालिकेवर वर्चस्व राखत आहे. केवळ 1992चा अपवाद वगळला तर 1997, 2002, 2007, 2012, आणि 2017 च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने विजय मिळवला आहे.(Political News)

परंतु हा झाला इतिहास. यंदाची परिस्थिती अभूतपूर्व तर आहेच, पण उद्धव यांच्या दृष्टीने बिकटही आहे. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने त्यांचा स्वतःशीच म्हणजे शिवसेनेशीच सामना होणार आहे. शिंदे यांनी केवळ पक्षावर ताबा मिळविला नाही तर न्यायालयात, निवडणूक आयोगात आपलीच खरी शिवसेना हे त्यांनी सिद्ध केले. त्यानंतर मतदारांकडूनही त्यावर मान्यतेची मोहर उमटवली. शिंदे यांच्या शिवसेनेला विधानसभेत 50 च्या वर जागा मिळाल्या तर उद्धव यांच्या वाट्याला 20 जागा आले आहेत. लोकसभेतही त्यांनी भाजपपेक्षा सरस कामगिरी केली. त्यामुळे आपले बळ किती आहे, याची पुरती जाणीव ठाकरे यांना झालेली आहे.

त्याहूनही गंभीर बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर केले. त्यात मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे पालकमंत्री म्हणून मुंबईतील विकास कामांवर शिंदे लक्ष ठेवणार आहेत. तसंच आपली शिवसेना वाढविण्यासाठी ते या संधीचा फायदा घेणार, यात शंका नाही.(Political News)

मुंबई पालिकेच्या मागील निवडणुकांमध्ये एकसंघ शिवसेना आणि भाजप यांचा सामना झाला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक प्रचार करून उद्धव ठाकरे यांच्या नाकी नऊ आणले होते. अखेर जेमतेम दोन जागा जास्त मिळवून ठाकरे यांना पालिकेतली सत्ता कायम ठेवता आली होती. त्यावेळी शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. आता भाजपच्या जोडीला शिंदे असणार आहेत आणि आपल्या शिवसेनेचा प्रसार करण्यासाठी त्यांना ही हुकमी संधी आहे. उद्धव ठाकरे यांचा उरला सुरला प्रभाव पुरता नष्ट करून शिवसेनेवर एकहाती नेतृत्व गाजविण्याची ही संधी ते सोडणार नाहीत.(Uddhav Thackeray)

मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांनी आपली रणनीती स्पष्ट केली आहे. मी आता मुख्यमंत्री नसलो तरी या पदासाठी मी हपापलेला नाही. पुढील एक वर्षात प्रत्येक घराघरात पक्ष पोहोचवण्याची माझी योजना आहे असे त्यांनी जाहीर केले. मी स्वार्थी नाही… मला वाटते की माझा स्वाभिमान कोणत्याही खुर्चीपेक्षा मोठा आहे. शिवसेना प्रत्येक घराघरात नेण्यासाठी आता आपण सर्वांनी काम केलं पाहिजे, असं ते म्हणाले.(Political News)

=============

हे देखील वाचा : India Constitution : भारतीय संविधानाला उधार का थैला का म्हणतात?

=============

त्याच दिवशी अंधेरीत झालेल्या सभेत उद्धव यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आशीर्वाद आहे तोपर्यंत शिंदे हे भाजप साठी उपयुक्त राहतील. त्यांची उपयुक्तता संपली की भाजप त्यांना दूर सारेल, असं ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी दोन-तीनदा फडणवीस यांची भेट घेतली, त्यांच्या मुखपत्रातून फडणवीस यांचं कौतुक केलं. त्यामुळे ठाकरे हळूहळू भाजपच्या दिशेने सरकत आहेत की काय, ही सुद्धा चर्चा आहे. अशात या सभेमध्ये ठाकरे यांनी आपला संपूर्ण रोख अमित शहा यांच्यावर ठेवला आणि फडणवीसांबद्दल ते काहीही बोलले नाहीत, हे लक्षणीय होते.(Uddhav Thackeray)

या सगळ्याचा अर्थ हा की ठाकरे यांच्या दृष्टीने आता मुख्य प्रतिस्पर्धी एकनाथ शिंदे हे आहेत. एवढे दिवस त्यांचे सगळे राजकारण भाजपच्या, विशेषतः फडणवीस यांच्या, विरोधात होते. मात्र विधानसभेतील विजयाने भाजपचे बळ काहीच्या काही वाढले आहे. उलट उद्धव यांचा पक्ष होता-नव्हता झाला आहे. स्वतःचे अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांना आता शिंदे यांच्याशी लढाई करावी लागेल. त्यांच्या या लढाईत काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस काहीही हातभार लावणार नाहीत, हेही त्यांना समजून चुकलं आहे.(Political News)

ठाकरे यांच्या विरोधात बंड करून शिंदे व त्यांचे समर्थक आमदार जेव्हा गुवाहाटीला गेले होते, त्यावेळी त्यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. घाबरू नका आपल्या मागे महाशक्ती उभी आहे, असे शिंदे हे आपल्या आमदारांना सांगताना त्या व्हिडिओत दिसत होतं. येथे महाशक्ती म्हणजे भाजप व नरेंद्र मोदी- अमित शहा असा अर्थ लावला गेला. त्यावरून महाविकास आघाडीतील पक्षांनी टीकाही केली होती. जवळजवळ तीन वर्षांनंतर ती महाशक्ती आजही शिंदेच्या पाठीशी असल्याचे दिसून येत आहे. इकडे उद्धव यांच्या मागे मात्र महाविकास आघाडी उभी राहताना दिसत नाही. त्यामुळे त्यांना स्वबळाचा पुकारा करावा लागत आहे. म्हणूनच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची लढाई आता खूप रंजक होणार आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना, किंबहुना महाशक्ती विरुद्ध स्वबळ अशी ही लढाई रंगणार आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.