पुढील महाराष्ट्र दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणार, असा संकल्प भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला आहे. गोपाळ शेट्टी या अमराठी आणि एकमेव खासदाराने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी संसदेत प्रस्ताव सादर केला होता.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकर मिळावा, यासाठी गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल आणि केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांना पत्र लिहिलं आहे. यानंतर आता केंद्र पातळीवर नव्याने तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.मराठीला भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासंदर्भात ही महत्त्वाची घडामोड आहे. आधीच्या त्रिसदस्यीय समितीपैकी एकाचे निधन झाले, तर एक जण निवृत्त झाल्याने प्रकरण लांबणीवर पडले होते.
गोपाळ शेट्टींनी 2017 मध्ये हा मुद्दा लोकसभेत लावून धरला होता. त्यानंतर यावर अभ्यास करण्यासाठी हा विषय तज्ञ समितीकडे देण्यात आला होता. विविध कारणामुळे ही समिती बरखास्त झाली होती.यासंदर्भात असलेल्या न्यायालयीन अडचणी दूर झाल्या आहेत. केंद्र सरकारने इतरही राज्याकडून त्यांच्या भाषांसंदर्भात प्रस्ताव मागवले आहेत. त्यामुळे हे प्रकरण लवकर मार्गी लागणार असल्याचे गोपाळ शेट्टी यांनी सांगितले.