चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions trophy 2025) यजमान पाकिस्तान आणि आता यजमानच ग्रुप स्टेजमधून बाहेर पडले आहेत आणि यांना घरचा रस्ता दाखवला आहे, भारताच्या टीमने ! यावेळी पाकिस्तानात टीव्ही जास्त फुटल्या नाहीत, कारण आधीच त्यांची अर्थव्यवस्था आणि परिस्थिती खराब आहे. यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने २०१७ च्या फायनलच्या पराभवाचा वचपाच काढला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भारत वि. पाकिस्तानची दोन ठिकाणी मोठी रायव्हलरी आहे, एक म्हणजे सीमेवर आणि दुसरी म्हणजे क्रिकेटच्या मैदानात… सीमेवर तर इंडियन आर्मी दरवेळेस पाक सैन्याला लोळवते. क्रिकेटमध्ये तसं १९-२० (उन्नीस-बीस) आहे, पण आयसीसी इव्हेंट्स म्हटलं तर भारत नेहमीच सरस आणि वरचढ ठरला आहे. पण ही रायव्हलरी कधी सुरु झाली ? या रायव्हलरीचा इतिहास काय ? जाणून घेऊ. (Ind vs Pak)
२३ फेब्रुवारीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅचमध्ये पाकिस्तानसाठी करो या मरोची परिस्थिती होती. मात्र भारतासमोर पाकची टीम काही टिकू शकली नाही आणि कितीतरी वर्षानंतर आपल्या घरात आयसीसी इव्हेंट खेळवणारा पाकिस्तानच सलग दोन मॅच हरून आपल्याच घरात बेघर झाला आहे. टॉस जिंकून आधी बॅटिंग करताना पाकिस्तानने भारतासमोर २४१ रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. भारताकडून कुलदीप यादवने ३ विकेट्स घेतले. यानंतर किंग विराट कोहलीने धमाकेदार सेंच्युरीसोबत भारताला आपला सलग दुसरा विजय मिळवून दिला. त्याला व्हाईस कॅप्टन शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरची जोड लाभली. यानंतर आता हेड टू हेड पहायचं झालं तर भारताने विजयाच्या बाबतीत पाकिस्तानशी बरोबरी केली आहे. आतापर्यंत भारत-पाक २००४, २००९, २०१३, आणि २०१७ मध्ये दोन मॅच आणि आता २०२५ च्या स्पर्धेची एक मॅच असे एकूण सहा वेळा भिडले आहेत. यामध्ये भारत तीन वेळा तर पाकिस्तान तीन वेळा विजयी ठरला आहे. (Cricket Match)
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतली भारताची पहिली मॅच १९ सप्टेंबर २००४ रोजी झाली होती. यावेळी पाकिस्तान ३ विकेट्सने जिंकला होता. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तरी आपली विनिंग कन्सिस्टनसी एकत्र ठेवली असली, तरी इतर आयसीसी इव्हेंट्समध्ये भारतच किंग ठरला आहे. आयसीसी क्रिकेट वनडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत इंडिया आणि पाकिस्तान आठ वेळा आमने-सामने आले आहेत. या सर्वांमध्ये इंडियाचाच हुकुम चालला आहे आणि सर्वच्या सर्व आठ मॅच इंडियानेच जिंकल्या आहेत. भारत पहिल्यांदा १९९२ साली सिडनीमध्ये पाकिस्तानशी भिडला होता. त्यावेळी सहज भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. यानंतर अगदीच २०२३ च्या वर्ल्ड कपपर्यंत इंडियाने पाकिस्तानला नमवत आपला रुबाब शाबूत ठेवला आहे.(Ind vs Pak)
वनडे वर्ल्ड कप इतिहासातली एक जबरदस्त मॅच सांगायची झाली तर ती आहे, २००३ च्या वर्ल्ड कपची! दादा सौरव गांगुली भारतीय संघाचा त्यावेळी कॅप्टन होता. पाकिस्तानने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. यानंतर पाकिस्तानने ५० ओव्हर्समध्ये २७३ रन्सचं आव्हान भारतासमोर ठेवलं. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पाक बॉलर्सना सळो की पळो करून सोडलं होतं. याच सामन्यात क्रिकेटमधले दोन अजरामर प्रसंग घडले होते.(Match Update)
एक म्हणजे, सचिनने डावाच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरला थर्ड मॅनच्या दिशेने मारलेला सिक्सर ‘शॉट ऑफ द सेंच्युरी’ म्हणून गणला गेला. तर दुसरा प्रसंग म्हणजे, भारत २ बाद ५७ रन्सवर खेळत होता. वसिम अक्रमने ६व्या ओव्हरचा ४था बॉल टाकला. मात्र सचिनने फटकावलेला तो शॉट अब्दुल रझाकला कॅच करता आला नाही. यानंतर अक्रम रझाकवर चवताळला आणि त्याच्या मुखातून हे वाक्य निघालं, ‘तुझे पता है, तुने किसका कॅच छोडा है…? हा दरारा होता एका छोट्या उंचीच्या मोठ्या सचिनचा. या सामन्यात सचिन नर्व्हस नाइंटीजचा शिकार ठरला. पण त्याने ७५ चेंडूत ९८ धावा ठोकल्या. भारताने ही मॅच सहा विकेट्स राखून जिंकली तसच या वर्ल्ड कपमध्ये भारत फायनलपर्यंत पोहोचला होता. (Ind vs Pak)
दुसरीकडे आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्येही भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) सात वेळा समोरासमोर आले आहेत. यामध्ये सहा वेळा भारताचा विजय झाला आहे, तर पाकिस्तान केवळ एकदाच जिंकला आहे. तो एक पराभव म्हणजे २०२१ च्या टी२० वर्ल्ड कपचा… ज्यावेळी पाकिस्तानने १० विकेट्सने भारताला हरवलं होतं. यातलीच एक ग्रेटेस्ट मॅच म्हणजे २०२२ ला झालेली भारत पाकिस्तान मॅच ! ८ बॉल्सवर २८ रन्स पाहिजे असताना विराटने हरीस रौफला मारलेला तो आयकॉनिक सिक्स आणि क्रुशिअल परिस्थितीत जिंकलेला ती ऐतिहासिक मॅच आजही क्रिकेटप्रेमी विसरलेले नाहीत.
=============
हे देखील वाचा : रेखा गुप्ता यांच्या जुन्या पोस्ट ट्रॉलर्स आहेत पेक्षा खतरनाक
=============
वनडे वर्ल्ड कप, टी२० वर्ल्ड कप आणि चॅंपियन्स ट्रॉफी या तीन आयसीसी इव्हेंट्स व्यतिरिक्त भारत फक्त आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अजूनही आमने सामने आलेले नाहीत. तशी अनेक भारतीयांच्या पचनी पडणार नाही की, आजपर्यंत भारत-पाकदरम्यान १३१ वनडे सामने खेळले गेले आहेत. यामध्ये पाकिस्तानने तब्बल ७४ वेळा विजय मिळवला आहे. तर भारत केवळ ५६ वेळाच विजयाचा धनी ठरला आहे. त्यातच टेस्टमध्येही पाकिस्तानचाच दबदबा राहिला आहे. पण २००७ नंतर भारत-पाकदरम्यान एकही टेस्ट मॅच झाली नाही. फक्त टी२० मध्ये भारत विनिंगमध्ये पाकिस्तानच्या पुढे गेला आहे. आयसीसी इव्हेंट म्हटलं तर क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणीच असते. त्यातच या एका मॅचमुळे आयसीसीचा गल्ला अक्षरश भरून जातो. त्यामुळे भविष्यात आता कोणताही आयसीसी इव्हेंट असो, हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी भिडतातच… सध्या हायब्रिड मॉडलमुळे दोन्ही देश एकमेकांच्या देशांमध्ये खेळू शकणार नाहीत. पण भारत-पाक ही मॅच कुठेही झाली, तरी ती हाय व्हॉल्टेजच असणार, यात शंकाच नाही.