मुंबईतील मलाबार हिल्समधील अडीच एकराच्या परिसरावर पसरलेले, सुमारे एक हजार कोटींचे बाजारमूल्य असलेले जिन्ना हाउस आताच्या घडीला मोकळे पडून आहे. आता हा बंगला कुणाचा आहे? हे तुम्हाला त्याच्या नावावरुनच लक्षात आले असेल. हा बंगला आहे पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल आणि पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा!
इ.स. १९३६ साली जिना यांनी तब्बल दोन लाख रुपये खर्चून हा बंगला बांधला. २ भाऊसाहेब हिरे मार्ग इथे हा बंगला जवळपास अडीच एकरांच्या जागेवर स्थित आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान, वर्षा येथून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. Claude Batley यांनी या बंगल्याची रचना केलेली आहे. बंगल्याच्या बांधकामादरम्यान जिनांनी स्वतः जातीने लक्ष घातले होते. भारताची फाळणी होईपर्यंत ते याच बंगल्यात वास्तव्यास होते. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत भारताच्या फाळणी संदर्भात सगळ्या चर्चा जिनांनी याच बंगल्यात केल्या होत्या.

भारताच्या फाळणीनंतर जिनांना हा आपला जिव्हाळ्याचा बंगला सोडावा लागला. नवीन निर्माण झालेल्या देशाची, पाकिस्तानची सूत्रे हाती घेण्यासाठी ते पाकिस्तानला रवाना झाले. जाताना त्यांनी हा बंगला मात्र कुणालाही विकला नाही. जेव्हा केव्हा भारतात परत येऊ तेव्हा या बंगल्यात वास्तव्यास राहू अशी त्यांची धारणा होती, पण तसे काही घडले नाही. पुन्हा भारतात येण्याचा योग काही जुळून आला नाही. यादरम्यान जीनांनी भारताचे तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना वारंवार पत्रे लिहून या बंगल्याची काळजी घेण्याची विनंती केली होती.
जिनांसोबत असलेल्या चांगल्या वैयक्तिक संबंधांमुळे नेहरूंनी या बंगल्याला ‘एनिमी प्रॉपर्टी’ म्हणून घोषित केले नाही. बंगला पाकिस्तान सरकारच्या हवाली करावा म्हणून १९५५ मध्ये नेहरूंनी प्रस्ताव मांडला होता. पण मंत्रिमंडळाकडून त्याला मंजुरी मिळाली नाही. १९४८ ते १९८३ दरम्यान ब्रिटीश हाय कमिशनला हा बंगला भाडेतत्वावर देण्यात आला होता. २००३ मध्ये ‘इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स’ला सांस्कृतिक कार्यांसाठी देण्यात आला.
=====
हे देखील वाचा : ग्रीन कॉफी एकदा पिऊनच बघा…
=====
दिना वाडिया, जिनांची एकुलती एक मुलगी फाळणीनंतर भारतातच वास्त्याव्यास राहिली. जीनांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलीने या बंगल्यावर आपला मालकी हक्क सांगितला. तिच्या मृत्यूनंतर तिचा मुलगा नुसली वाडिया यांनी त्या बंगल्यावर आपला हक्क सांगितला आहे. मोहम्मद अली जिना यांचा हा बंगला त्यांच्यानंतर कायम वादात राहिला. सरकारने तिथे कुणालाही जाण्यास बंदी घालून ठेवलेली आहे त्यामुळे हा बंगला आजच्या घडीला अगदी मोकळा पडून आहे.