आपण अशा देशात राहतो ज्या देशात अगणित मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिराला स्वतःचा एक इतिहास आणि महत्व आहे. भारतामध्ये नानाविध प्रकारची असंख्य मंदिरं आहेत. आपण अनेक मंदिरांबद्दल आणि तिथल्या अनुभवांबद्दल ऐकत असतो. मात्र भारतात असे देखील मंदिरं आहेत जिथे महिलांना प्रवेश नाही. आता अनेक आंदोलनं केल्यानंतर काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश दिला जातोय, पण काही मंदिरांमध्ये आजही महिलांना प्रवेश नाही. मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नसणे ही आता तशी सामान्य बाब झाली आहे. पण भारतात अशी देखील काही मंदिरं आहेत जिथे चक्क पुरुषांना प्रवेश नाकारला जातो. ऐकून आश्चर्य वाटले ना…? पण हो अशी मंदिरं भारतात आहे. आता ती कोणती मंदिरे आहेत जाणून घेऊया.
ब्रह्मदेव मंदिर पुष्कर, राजस्थान
राजस्थान येथील पुष्कर येथे असलेल्या ब्रह्मा मंदिरामध्ये विवाहित पुरुषांना प्रवेश करण्याची अनुमती नाही. एका आख्यायिकेनुसार भगवान ब्रह्मांनी पुष्कर नदीच्या तटावर सरस्वतीसमवेत यज्ञ करण्याचे योजिले होते. पण यज्ञाला सरस्वती वेळेवर न पोहोचल्याने ब्रह्माने देवी गायत्रीशी विवाह केला आणि यज्ञ पूर्ण केला. सरस्वतीला हे कळल्यानंतर तिने कोपाविष्ट होऊन ब्रह्माला शाप दिला. त्यामुळे आजही या मंदिरामध्ये विवाहित पुरुषाचा प्रवेश निषिद्ध मनाला जातो. कोणीही विवाहित पुरुष ब्रह्माच्या दर्शनासाठी गर्भगृहात गेल्यास त्याच्या वैवाहिक आयुष्यात नकारात्मक परिणाम होतो, असे मानले जाते.
कन्याकुमारी मंदिर
कुमारिका असताना भगवान शंकराने आपल्याशी लग्न करावे यासाठी पार्वती मातेने तीन समुद्राच्या मधोमध या जागेवर तपश्चर्या केली होती, अशी या मंदिराविषयीची आख्यायिका आहे. त्यामुळेच कन्याकुमारी येथील भगवती माता मंदिरात देखील आजही पुरुषांच्या प्रवेशावर बंदी आहे. या मंदिराचा कारभार स्त्रियाच बघतात.
अट्टूकल मंदिर, तिरुअनंतपुरम
प्रसिद्ध पद्मनाभ स्वामी मंदिरापासून केवळ दोन किमी अंतरावर असलेल्या पार्वती देवीच्या या मंदिरात दरवर्षी सुमारे ३० लाख महिला दर्शनासाठी येतात. हे मंदिर नारी सबरीमला नावानेही ओळखले जाते. यामध्ये पुरुषांना प्रवेश करण्यास मनाई आहे.
चक्कूलातुकावू मंदिर, अलापुझा
केरळच्या अलापुझा जिल्ह्यातील चक्कूलातुकावू मंदिरात दरवर्षी पोंगल साजरा केला जातो. या उत्सवात अनेक महिला सहभागी होतात. हा कार्यक्रम सुमारे एक आठवड्यापर्यंत सुरु असतो. याला नारी पूजा नावाने ओळखले जाते. यादरम्यान इथे पुरुषांना प्रवेश करण्यास मनाई असते.
माता मंदिर, मुजफ्फरपूर
बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील हे मंदिर वर्षभर भाविकांसाठी खुले असते. पण एक काळ असा येतो की, यावेळी पुरुषांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई असते. इतकंच नाही तर मुख्य पुजाऱ्यालाही यादरम्यान मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची परवानगी नसते.