Home » Rani Lakshmibai : झाशीच्या रणरागिणीचा झंझावाती प्रवास !

Rani Lakshmibai : झाशीच्या रणरागिणीचा झंझावाती प्रवास !

by Team Gajawaja
0 comment
Rani Lakshmibai | Top Stories
Share

भारतीय संस्कृतीमध्ये शक्ती हीच सर्वोच्च देवता मानली गेली आणि ती स्त्री म्हणून गणली गेली आहे. याच शक्तीच्या जोरावर आपला दरारा निर्माण करणाऱ्या महान महिला योद्धासुद्धा इथे घडल्या आहेत. पौराणिक कथांमधील पार्वती, दुर्गा, सिता, कुंती, द्रौपदी इ. पात्र असो किंवा भारताच्या महान साम्राज्यांमधील महिला योद्धा असो, सर्वांनीच या इतिहासात अढळपद मिळवलं आहे. विशेष म्हणजे या भारत भूमीलाही इथे आई म्हणून संबोधल जात. याच आईच्या पोटी जन्मलेली एक धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणारी महान वीरांगना म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई ! या देशातून इंग्रजांची पाळं-मुळं उपटून काढण्याचं ध्येय बाळगणाऱ्या त्यागमूर्ती लक्ष्मीबाईंनी १८५७ च्या उठावात जो पराक्रम गाजवला, त्यामुळे आजही भारतवासीयांच्या माना गर्वाने उंचावतात. विशेषतः स्त्रियांसाठी प्रेरणेचा एक किरण ठरलेल्या लक्ष्मीबाईंचा जीवनप्रवास जाणून घेणार आहोत. (Rani Lakshmibai)

राणी लक्ष्मीबाईंच खर नाव मणिकर्णिका मोरोपंत तांबे ! वाराणसीच्या एका साध्या मराठी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या लक्ष्मीबाईंना बालपणी मनू आणि छबिली म्हणून संबोधल जायच. छबिली म्हणजे खेळकर! आता राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या आणि वाढलेल्या होत्या. दुर्दैवाने वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षी आई भागीरथीबाईच निधन झाल्यानंतर त्या बिथुरच्या पेशव्यांच्या घरात वाढल्या आणि इथेच त्या घोडेस्वारी, तलवारबाजी, नेमबाजी, मल्लविद्या, युद्धकला आणि इतर गोष्टींमध्ये पारंगत झाल्या.(Top Stories)

त्यानंतर वयाच्या १४ व्या वर्षी १८३४ मध्ये त्यांचा विवाह झाशीचे राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. त्यामुळे लग्नानंतरच त्यांना लक्ष्मी अस नाव देण्यात आल. गंगाधरराव राजकारणी होते. झाशी प्रांत त्यांच्या राजवटीत भरभराटीस आला असला, तरी लोकांना त्यांची भीती वाटत होती. त्यांच्या राज्यात क्षुल्लक कारणांसाठी, लहान गुन्ह्यांसाठी आणि कायद्याच उल्लंघन करणाऱ्यांना थेट फाशीची शिक्षा देण्यात येत होती. मात्र राणी लक्ष्मीबाईंनी ही प्रथा बंद पाडली आणि वेगळ्या शिक्षांची अंमलबजावणी केली. त्यादरम्यान झाशीमध्ये सुमारे ५००० पुरुष सैनिकांची फौज होती. मात्र महिला सैनिकांचीसुद्धा एक तुकडी असावी, अशी राणी लक्ष्मीबाईंची इच्छा होती. झाशीचे सैन्यबळ आणखी शक्तिशाली करत त्यांनी दुर्गा नावाची एक महिला योद्धांची तुकडी उभारली. स्वतः एक उत्कृष्ट घोडेस्वार असल्यामुळे इतर महिलांना त्यांनी प्रशिक्षण दिल. महिला सैन्यासोबत त्या नियमित शस्त्रांचा सराव करत. याचदरम्यान त्यांना साथ लाभली आणखी एका महिला योद्धाची ज्यांचं नाव होतं झलकारी बाई, विशेष म्हणजे त्या हुबेहूब राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या दिसायच्या.(Rani Lakshmibai)

Rani Lakshmibai

पुढे १८५१ साली राणी लक्ष्मीबाईच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. मात्र अवघ्या चार महिन्यातच त्याला मृत्यूने जवळ केलं. पोटच्या गोळ्याचा अकस्मात झालेला मृत्यू त्यांचा मनाला चटका लावून गेला. पण या विरहात न राहता त्यांनी आनंदराव नावाच्या मुलाला दत्तक घेतलं आणि त्याचं नाव दामोदरराव असं ठेवलं. पण दामोदररावच्या येण्याने चेहऱ्यावर आलेलं हसू अवघ्या काही महिन्यांपूरतच होत. कारण १८५३ साली लक्ष्मीबाईंचे पती गंगाधरराव यांचा आजारपणाने मृत्यू झाला. दोन वर्षांच्या कालावधीत दोन भयाण संकटं त्यांच्यावर कोसळली, पण त्या डगमगल्या नाहीत. वैधव्य येऊनही झाशीचं आणि जनतेचं रक्षण हेच सर्वतोपरी मानून त्यांनी राज्यकारभार सुरू ठेवला.

एव्हाना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपले पाय मजबुतपणे रोवले होते आणि तत्कालीन गव्हर्नर जनरल डलहौसीने नागपूर, तंजावर आणि साताऱ्यासारखी मराठ्यांची मोठी संस्थानं खालसा केली होती. आता त्यांचा डोळा झाशीवर होता. एकीकडे इंग्रज सैन्य झाशी काबीज करण्याची तयारी करत होते, तर दुसरीकडे १८५७च्या उठावाची ठिणगी पेटली होती. संपूर्ण भारतावर राज्य करण्याचं कपटी स्वप्न बघणाऱ्या इंग्रजांचा डाव लक्ष्मीबाईंनी ओळखला होता त्यामुळे आता झाशी नाही आपला भारत देश वाचवणं गरजेचं आहे, हे त्यांना कळून चुकलं म्हणूनच फिरंगींविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी इतर राजांना आणि संस्थानांना प्रोत्साहित केलं.(Top Stories)

दरम्यान गंगाधररावांच्या निधनामुळे झाशी खालसा करण्याची आयती संधीच डलहौसीला मिळाली. म्हणूनच त्याने दामोदररावचं दत्तक विधान फेटाळून लावलं आणि झाशी खालसा करत असल्याचा जाहीरनामा काढला. जाहीरनाम्यात झाशीचा ब्रिटिश राजवटीत समावेश करावा, हे वाचताच लक्ष्मीबाई यांना राग अनावर झाला. लक्ष्मीबाईंनी तातडीने हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. लक्ष्मीबाईंच्या सैन्यात जवळपास १५०० सैनिक होते. ब्रिटिशांच सैन्य तुलनेने जास्तच होतं. पण आपली राणीच रणांगणात उतरल्यामुळे जनता आणि सैन्य दोघांमध्येही आत्मविश्वास निर्माण झाला होता. अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांच सैन्य शौर्याने लढत होत.लक्ष्मीबाईसुद्धा इंग्रजांशी निकरानं झुंज देत होत्या. दोन्ही हातांनी तलवार चालवत घोड्यावर स्वार होऊन, आपल्या लहान मुलाला पाठीवर बांधून त्या फिरंग्यांशी लढत होत्या.(Rani Lakshmibai)

मात्र इंग्रजांच्या बलाढ्य सैन्यदलासमोर झाशीच्या सैन्याचा निभाव लागणं शक्य नव्हतं. तात्या टोपे यांची २० हजार सैनिकांची मदतदेखील अपुरी पडली होती. राणी लक्ष्मीबाईंचे रक्षण करण्यासाठी इतर सरदार आणि सैनिकांनी त्यांना किल्ला सोडून ग्वाल्हेरला जाण्याची विनंती केली. दरम्यान युद्धाच्या ११व्या दिवशी रणांगणात त्यांच्यासारखाच पोशाख घालून हुबेहूब दिसणारी झलकारी बाई उतरली आणि तिने जो पराक्रम गाजवला, ते पाहून ब्रिटिश सैन्य अधिकारी ह्यू रोजला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पण झलकारी पकडल्या गेल्या आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली. अखेर ब्रिटिशांनी झाशीवर विजय मिळवला. आपण हरलोय ही जखमच लक्ष्मीबाईंच्या मनावर मोठा घाव करून गेली. त्यांनी झाशी सोडली आणि त्या ग्वाल्हेरला आल्या.

====================

हे देखील वाचा : Kedarnath : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; पायलटसह सात जणांचा मृत्यू

====================

काही दिवसांनी ब्रिटिश अधिकारी स्मिथच्या आदेशावरून ब्रिटिश सैन्याने ग्वाल्हेरवर हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी तातडीने रणांगणात धाव घेतली आणि त्या ब्रिटिशांना सपासप कापू लागल्या. मात्र यावेळीही ब्रिटिश सैन्याचं पारडं जड होतं. लक्ष्मीबाई परिस्थितीचा अंदाज घेत आपल्या काही निवडक सैन्याला घेऊन तेथून निसटल्या. मात्र ब्रिटिश सैन्य त्यांचा पाठलाग करू लागले. पुन्हा आमनेसामनेची लढाई सुरु झाली. अचानक एका इंग्रज सैन्याने राणी लक्ष्मीबाई यांच्या छातीवर वार केला. त्याचा हा वार काळावर घाव घालणारा ठरला.(Rani Lakshmibai)

लक्ष्मीबाईंचं अर्ध डोकं फाटलं, एक डोळा निकामी झाला. त्या घोड्यावरून कोसळल्या. त्यानंतर एका सैनिकाने त्यांना उचललं आणि जवळच्या मंदिरात नेलं. लक्ष्मीबाई हळुवारपणे त्या सैनिकाला म्हणाल्या, ‘दामोदरला छावणीमध्ये सुरक्षित न्या आणि माझा मृतदेह इंग्रजांच्या हाती पडू देऊ नका.’ जखमांमधून वाहणारं रक्त थांबण्याचं नाव घेत नव्हतं. ‘कोणताही इंग्रज माझ्या देहाला स्पर्श करणार नाही’ ही त्यांची अखेरची इच्छा होती. ही इच्छा स्थानिकांनी आणि सैनिकांनी पूर्ण केली. १७ जून १८५८ रोजी ग्वालियरमधील फुलबाग येथे महान वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांची वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी प्राणज्योत मालवली. अंगरक्षकांनी जवळच लक्ष्मीबाई यांच्या पार्थिवाला अग्नी दिला आणि ही वीर योद्धा अनंतात विलीन झाली. (Top Stories)

बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी !

राणी लक्ष्मीबाई यांनी मातृभूमीसाठी दिलेल योगदान भविष्यातील पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील आणि त्यातून आणखी लक्ष्मीबाई घडतील. असा अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्या लक्ष्मीबाईंना कोटी कोटी वंदन !

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.