Home » निलकंठ महादेव मंदिराचे रहस्य

निलकंठ महादेव मंदिराचे रहस्य

by Team Gajawaja
0 comment
Nilakantha Mahadev Temple
Share

हिंदू धर्मात समुद्रमंथनाच्या कथेला मोठे महत्त्व आहे.  या समुद्रमंथनात जेव्हा विष समोर आले, तेव्हा हे विष कोण घेणार ? हा प्रश्न पडला.  कारण एक वस्तू घेतल्याशिवाय पुढची वस्तू निघू शकत नव्हती.  मात्र विष बघून देव आणि राक्षसही मागे झाले.  अशावेळी भगवान शंकर मदतीला आले.  समुद्रमंथनातून आलेले विष भगवान शंकराने सेवन करुन आपल्या गळ्यात ठेवले.  त्यामुळेच देवाचा कंठ निळा झाला महादेवाला निळकंठ अशा नावाने संबोधण्यात येऊ लागले.  या भगवान निलकंठाचे रुप बघायचे असेल तर उत्तरप्रदेशमधील कालिंजर किल्ल्याला भेट द्यायला हवी.  या किल्ल्यात असलेले निळकंठ महादेव मंदिर हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. या मंदिरातील भगवान शंकराच्या पिंडींला हात लावल्यावर काही भाग हा मुलायम लागतो.  तोच भगवान शंकराचा कंठ असल्याची भाविकांची भावना आहे.  शिवाय या पिंडाला कायम घाम येतो.  भगवान शंकरानं विष प्राशन केल्यामुळे त्याला हा घाम येत असल्याचे भक्त सांगतात.  या पिंडीवर वर्षाचे बारा महिनेही नैसर्गिक जलस्त्रोतामधून अभिषेक होतो.  हा जलस्त्रोत नेमका कुठला आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.  मात्र त्याबाबतही रहस्य कायम आहे.  (Nilakantha Mahadev Temple)

उत्तरप्रदेशमधील कालिंजर किल्ला हा ऐतिहासिक किल्ला आहे.  या किल्ल्याची निर्मिती आठव्या शतकात झाल्याच्याही नोंदी आहेत.  तेव्हापासून अनेक शासकांनी या किल्ल्यावरुन राज्य केले.  ऐतिहासिक आणि पौराणिक कथांनी भरलेला हा किल्ला अधिक प्रसिद्ध आहे तो निलकंठ महादेव मंदिरासाठी.  कालिंजर किल्ला हा 8 व्या शतकात बांधलेला,  प्राचीन भारतीय वास्तुकलेचा पुरावा आहे.  हा किल्ला राजा विक्रमादित्यने बांधल्याचे काही सांगतात.  पण त्याआधी नागाशासकांनी दुस-या शतकात येथे मोठे बांधकाम केल्याचे सांगण्यात येते.  त्यांनीच किल्ला आणि मंदिर बांधल्याची माहिती स्थानिक देतात.   बांधल्यापासून या किल्ल्याने अनेक लढाया आणि सत्ता संघर्ष बघितले आहेत.  10व्या शतकात लष्करी हालचालींसाठी एक प्रमुख स्थान म्हणून एका उंच टेकडीवर असलेल्या किल्ल्याचे स्थान महत्त्वाचे होते. किल्ल्याच्या  भिंतींची जाडी ही 40 फूट इतकी असून, त्यामुळे हल्लेखोरांना कायम पराभूत व्हावे लागले आहे.  कालिंजर किल्ल्याने राजकीयदृष्ट्या महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  गुप्त, चंदेल आणि मुघल यांच्यासह अनेक राजसत्तांनी या किल्ल्यावर राज्य केले आहे.  16 व्या शतकात याच किल्ल्याभोवती वेढा घालणा-या शेरशाह सुरीचा मृत्यू झाला. या किल्ल्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत.  त्यापैकी निलकंठ महादेव मंदिर, कालभैरव मंदिर आणि माता काली मंदिर ही महत्त्वाची मंदिरे या किल्ल्यावर आहेत.  या मंदिरांची स्थापना कोणी केली याची नेमकी माहिती नाही.  मात्र भव्य अशी ही मंदिरे एकेकाळी चार मजली होती, अशी माहिती आहे.  (Nilakantha Mahadev Temple)

यातील निलकंठ महादेव मंदिराबाबत (Nilakantha Mahadev Temple) अनेक आख्यायिका आहेत.  यातील एक कथा समुद्रमंथनासंदर्भात आहे.  समुद्रमंथनातून विष बाहेर आले, आणि त्याच्या प्रभावानं देव आणि राक्षस या दोघांनाही त्रास सुरु झाला.  प्रचंड उष्मा बाहेर आला.  यातून बचाव करण्यासाठी देव आणि राक्षसांनी  भगवान शंकराची प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेनंतर भगवान शंकरांनी ते विष आपल्या कंठामध्ये ठेवले. विषाच्या प्रभावाने भगवान शंकराचा कंठ निळा पडला.   हा विषाचा दाह कमी करण्यासाठी भगवान शंकर एकाकी जागी गेले.  ही जागा म्हणजेच, उत्तरप्रदेशमधील कालिंजर किल्ला आहे, ते स्थान. 

या जागी बसून भगवान शंकरानं विषामुळे होणारा शरीराचा दाह कमी केला.  त्या जागी असलेल्या भगवान शंकराच्या पिंडीला आजही कायम घाम आलेला असतो.  शिवाय या पिंडीवर भगवान शंकराचा चेहराही काही काळापूर्वी होता, अशी धारणा आहे.  आता हा चेहरा विरळ झाला असून पिंडीतील काही भागाला हात लावल्यास तो भाग मुलायम आणि गरम लागतो.  हा भाग म्हणजे, भगवान शंकराचा कंठ असल्याची भावना भक्तांमध्ये आहे.  विष प्राशन केल्यावर भगवान शंकरानं स्वतःवर अभिषेक होईल अशी जागा निवडली.  या जागीही कायम जलस्त्रोताद्वारे पाणी येत असते.  यामुळे पिंडीला होणारा दाह कमी होतो, असे सांगण्यात येते.  

============

हे देखील वाचा : वाळवंटाचे गाव कसे झाले जगातील सर्वोत्तम गाव

============

एकेकाळी हे भगवान शंकराचे मंदिर (Nilakantha Mahadev Temple) अतिशय भव्य होते.  त्याच्या आसपास असलेले खांब मंदिराच्या भव्यतेची साक्ष देतात.  मंदिरात जाण्यासाठी दोन दरवाजे आहेत.  मंदिराच्या मार्गात एक गुहाही असून अनेक दगडी शिल्पे आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर परीमद्र देव नावाच्या चंदेल शासकाने लिहिलेले शिव स्तोत्र आहे. मंदिरात स्वयंभू असलेल्या पिंडीवर कायम जल अभिषेक होतो.  हा भाग दुष्काळासाठीही ओळखला जातोपरंतु कितीही दुष्काळ पडला तरी महादेवावर अभिषेक होणारा हा जलस्त्रोत कधीच सुकत नाही याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जाते.  नागशासकांनी हे निलकंठ महादेवाचे मंदिर बांधल्याचे सांगण्यात येते. चंदेला राजपूत हे या निलकंठ महादेवाची अखंड सेवा करीत आहेत. या मंदिराच्या मागे डोंगर कापून पाण्याचे तळे बनवले आहे.  या तळ्यात खजिना असल्याचीही कथा सांगितली जाते.  अनेकांनी हा खजिना शोधण्याचा प्रयत्न केला.  पण कोणालाही यश आले नाही.  सध्या हा सगळा भाग भारतीय स्थापत्यविभागाच्या देखरेखेखाली आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.