“आई, मी चोर नाही. मी चिप्स चोरले नव्हते..” ही त्या तेरा वर्षाच्या मुलाची सुसाइड नोट होती. ही सुसाइड नोट लिहून एका १३ वर्षाच्या लहान मुलाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. त्या मुलाचं नाव होतं, कृष्णेंदु दास (Krushnendu Das). हा पश्चिम बंगाल मधल्या पांस्कुरा गावात राहायचा. त्याला खूप भूक लागली होती. तो गोसाईंबेर बाजाराच्या एका मिठाईच्या दुकानात गेला. तिथे त्याच्यावर चोरी केल्याचा आरोप केला गेला आणि त्याला मारलं. रस्त्यात लोकांसमोर अपमान केला. त्याच्यावर हा अपमान एकदा नाही तर दोनदा झाला. या गोष्टीचा परिणाम त्या लहान मुलावर इतका झाला की, घरी येऊन त्याने स्वतःला कोंडून घेतलं, सुसाइड नोट लिहिली आणि विष पिऊन स्वतःचं आयुष्य संपवलं. तो जिवाच्या आकांताने ओरडून सांगत होता की, “दुकानात कोणी नव्हतं”. तरी त्याला उठबशा काढायला लावल्या आणि दुकानदाराने त्याला कानाखाली मारली. या घटनेनंतर मेंटल डिप्रेशन मध्ये येऊन त्याने आत्महत्या केली. नक्की घटना काय घडली आणि असं काय झालं की त्याने आत्महत्या केली? या बद्दल जाणून घेणार आहोत.(Kolkata News)
कृष्णेंदु दास हा सातवीत शिकत होता. एकदा त्याला खूप भूक लागली म्हणून गोसाईंबेर बाजारातल्या एका मिठाईच्या दुकानात चिप्स, कुरकुरे विकत घेण्यासाठी आत गेला. त्याने दुकानात “काका, मला चिप्स हवे आहेत,” अशी भरपूर वेळा हाक मारली, पण तिथे दुकानदार नव्हता. त्याला इतकी भूक लागली की, त्याला राहवलं नाही. त्याने दुकानदार नसताना ५-५ रुपयाचे ३ कुरकुरेचे पॅकेट्स उचलले आणि तो निघाला. तेवढ्यात दुकानदार तिथे आला. त्याने त्या मुलाला पॅकेट्स घेऊन जाताना बघितलं. त्याला वाटलं तो चोरी करतोय. म्हणून दुकानदाराने कृष्णेंदुचा पाठलाग केला, त्याला पकडलं आणि त्याच्यावर चोरीचा आरोप लावला. कृष्णेंदुने दुकानदाराला २० रुपये दिले आणि दुकानदाराने त्याला ५ रुपये परत केले. त्यानंतर सुद्धा दुकानदार त्याला दुकानात घेऊन गेला. त्याने सगळ्यांसमोर त्याला कानाखाली मारली आणि कान धरून उठाबशा काढायला लावल्या. (Latest Marathi News)
कृष्णेंदु घरी आला. घरी आल्यावर त्याच्या आईला ही गोष्ट कळली आणि ती त्याला पुन्हा दुकानात घेऊन गेली. तिथे तिनेही सर्वांसमोर त्याला झापलं आणि कानाखाली मारली. त्याच अवस्थेत त्याने रस्त्यावर पडलेले पॅकेट्स उचलले. कृष्णेंदु सतत “मी चोर नाहीये. मी चोरी नाही केली” सांगत होता, पण कोणीच त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं.या घटनेनंतर त्याला खूप वाईट वाटलं. घरी आल्यावर, कृष्णेंदुने स्वतःला आपल्या खोलीत कोंडून घेतलं. त्याने एक सुसाइड नोट लिहिली, ज्यामध्ये त्याने आपला निरपराधीपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. नोटमध्ये लिहिलं होतं:
“आई, मी चोर नाही. मी चिप्स चोरले नाहीत. दुकानदारकाका तिथे नव्हते, मी वाट पाहिली. परत येताना मला रस्त्यावर कुरकुरेचे पाकीट दिसले, आणि मी ते उचलले. मला कुरकुरे खूप आवडतात. हे माझे शेवटचे शब्द आहेत. मला माफ कर.”
त्याचा दरवाजा बराच वेळ बंद होता म्हणून त्याची आई बराच वेळ दरवाजा ठोकत होती. दरवाजा उघडला नाही म्हणून शेजारच्यांनी दरवाजा तोडला आणि त्यांनी मन हादरवणारं दृश्य पाहिलं. कृष्णेंदुच्या तोंडातून फेस येत होता आणि बाजूला विषाची रिकामी बॉटल होती. त्याला तातडीने तामलूक मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना, गुरुवारी सकाळी कृष्णेंदु दास याचा मृत्यू झाला. ( Top Stories)
=============
हे देखील वाचा : Ashok Khemka : ३४ वर्षात तब्बल ५७ वेळा बदली झालेले IAS अधिकारी अशोक खेमका
=============
कधी कधी पालकही चुकतात. आपल्या मुलांना समजून घेत नाही, त्यांच्यावर रागावतात, त्यांना शिक्षा देतात. त्यांचं त्यामागे वाईट हेतु नसतो. लहान मुलांचं मन नाजुक असतं, त्यांना त्यांच्या कलेने घेणं खूप गरजेचं असतं. जर कृष्णेंदुच्या आईने त्याला समजून घेतलं असतं तर त्या १३ वर्षाच्या मुलासोबत जे घडलं, ते कदाचित घडलंच नसतं. (Kolkata News)
‘आई.. माझी चूक नव्हती” त्या लहान मुलाच्या सुसाइड नोटने पश्चिम बंगाल मध्ये बरीच खळबळ उडाली. दुकानदार अजूनही फरार आहे. २५ मे २०२५ला त्याच्याविरुद्ध FIR दाखल करण्यात आली आणि अजूनही तो पकडला गेला नाही.