२४ ऑगस्ट १९७१ गणेश चतुर्थीचा दिवस. दुपारी ३ वाजल्यापासून प्रत्येक जण रेडिओला कान लावून बीबीसी वरून प्रसारित होणारे धावते वर्णन ऐकण्यात मश्गुल होता. प्रसंगही तसाच होता. जवळ जवळ ४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारत ओव्हलच्या क्रिकेट मैदानावर इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर उभा होता.
इंग्लंडने सामन्याच्या पहिल्या दिवशी सर्व बाद ३५५ धावा केल्या त्या जेम्सनच्या ८२, अॅलन नॉट च्या ९० आणि रिचर्ड हटन च्या ८१ धावांच्या जोरावर. इंग्लंडची एक वेळ ६ बाद १७५ अशी अवस्था हॊती. भारताकडून सोलकरने २८ धावात ३ बळी घेतले. दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. भारताने प्रत्युत्तरादाखल २८४ धावा केल्या त्या वाडेकर ४८, सरदेसाई ५४, इंजिनियर ५९ आणि सोलकर ४४ यांच्या योगदानामुळे.
इंग्लंडचा दुसरा डाव चंद्रशेखरच्या जादुई गोलंदाजीमुळे १०१ धावात गुंडाळला गेला. चंद्राने केवळ ३८ धावात ६ बळी मिळवले तर सोलकरने दोन अप्रतिम झेल घेतले. त्यातील एक अॅलन नॉटचा चिरस्मरणीय झेल होता.
भारताला विजय मिळवण्यासाठी १७३ धावांची गरज होती. गावस्कर ० धावांवर बाद झाला व पाठोपाठ अशोक मंकड सुद्धा तंबूत परतला. वाडेकर, सरदेसाई या अनुभवी जोडीने दिवसाखेर ७६ धावांपर्यंत मजल मारली.
आणि तो ऐतिहासिक दिवस उगवला. दिवसाची सुरुवात सनसनाटी झाली. पहिल्याच षटकात वाडेकर धावबाद झाला आणि तमाम भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला. पण सरदेसाई, विश्वनाथ यांनी विटेवर वीट रचावी त्याप्रमाणे एकेक धाव जमवत १२४ पर्यंत मजल मारली आणि सरदेसाई ४० धावांवर बाद झाला. पाठोपाठ सोलकरही १ धाव काढून बाद झाला. त्यावेळी भारताला जिंकण्यासाठी ३९ धावांची गरज होती.
अशावेळी इंजिनियर मैदानात उतरला तो जास्तीत जास्त लवकर सामना संपवण्याच्या इराद्यानेच. विश्वनाथ एक बाजू लावून धरत असताना इंजिनियरने फटकेबाजी चालू ठेवली आणि हीच जोडी सामना जिंकून देईल असे वाटत असतानाच १७० धावसंख्येवर विश्वनाथ कामचलाऊ गोलंदाज लकहर्स्टच्या गोलंदाजीवर ३३ धावांवर बाद झाला. जिंकण्यासाठी केवळ ३ धावांची गरज होती तरी मनात धाकधूक होतीच. अखेर अबिद अलीने तो बहुप्रतीक्षित चौकार मारून लक्ष्य पार केले आणि भारतीयांच्या आनंदाला उधाण आले.
सर्वांची एकच भावना होती की गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपती पावला. आज ५० वर्षे उलटली तरी सर्व काही कालच घडल्यासारखे अजूनही वाटते.
या विजयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात भारताने त्याच ओव्हल मैदानावर ६ सप्टेंबर २०२१ रोजी, गणेश चतुर्थी उंबरठ्यावर आलेली असताना, इंग्लंडला १५७ धावांनी पाणी पाजून एक वर्तुळ पूर्ण केले.
या दोन विजयांमध्ये निव्वळ ५० वर्षांचाच फरक नव्हता तर भारतीय क्रिकेटमध्ये झालेल्या स्थित्यंतराचे ते एक दर्शन होते.

१९७१ चा संघ क्रिकेट विश्वात खालच्या उतरंडीवर होता तर २०२१ चा संघ जागतिक श्रेणीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होता.
१९७१ चा कर्णधार अजित वाडेकर नेमस्त भारताचा प्रतिनिधी होता तर २०२१ चा कप्तान विराट कोहली नव्या स्वाभिमानी भारताचे प्रतिनिधित्व करत होता.
१९७१ चा संघ हौशी म्हणावा असा होता. (केवळ फारूक इंजिनियरच व्यावसायिक क्रिकेटपटू होता.) बचेंगे तो लढेंगे अशा मानसिकतेचा होता. २०२१ चा भारतीय संघ तद्दन व्यावसायिक होता आणि त्यामुळे अधिक कॉम्पेटीटीव्ह होता. बचेंगे भी और लढेंगे भी अशा विजिगिषु वृत्तीचा होता.
१९७१ चा विजय हा मुख्यतः फिरकी गोलंदाजीच्या जीवावर मिळाला होता. त्यावेळी संघात तीन फिरकी गोलंदाज व एक मध्यम गती आणि एक कामचलाऊ मध्यमगती गोलंदाज होता. तर २०२१ चा विजय हा जलदगती गोलंदाजीमुळे मिळाला. या संघात चार जलदगती गोलंदाज व केवळ एकच फिरकी गोलंदाज होता.
वरील विरोधाभासात काही साम्यस्थळं सुद्धा होती.
दोन्ही कसोटीत तिसऱ्या दिवसाखेर भारत पिछाडीवरच होता. चौथ्या दिवशी भारताने बाजी पलटवली आणि पाचव्या दिवशी इंग्लडला अखेरचा ठोसा लगावला. फरक इतकाच की १९७१ चा विजय फलंदाजांनी साजरा केला तर २०२१ चा विजय गोलंदाजांनी साकारला.
१९७१ च्या विजयाप्रमाणेच २०२१ चा विजय पण निर्विवाद होता. पण १९७१ मध्ये परकीय भूमीवरचा विजय हे एक अप्रूप होते तसे २०२१ मध्ये वाटले नाही कारण भारताला परदेशी विजय मिळवणे ही काही नवलाई राहिलेली नाही.
एक गोष्ट मात्र वादातीत आहे की २०२१ च्या पराक्रमाची पायाभरणी ५० वर्षांपूर्वीच्या ओव्हलवरील विजयानेच झाली. याची जाणीव कोहली व त्याच्या सहकार्यांनी विजयोन्मादात सुद्धा ठेवावी ही अपेक्षा व्यक्त करणे अनाठायी ठरू नये.
– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.