कुठलंही प्रॉडक्ट ब्रँड बनण्यासाठी किंवा कुठलाही ब्रँड फेमस होण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात ? क्वालिटी, ट्रस्ट, ब्रँड इमेज, etc etc. पण या सगळ्या गोष्टी केव्हा होतात ? जेव्हा त्या ब्रँडच मार्केटिंग किंवा ज्याला आपण पब्लिसिटी म्हणतो ती चांगली होते तेव्हाच ! कारण आपल्याला तर माहितेय कि marketing is the soul of business. पण एखादा ब्रँड मार्केटिंग शिवाय खरंच उभा राहू शकतो का ? तर हो यावर तुम्हाला विश्वास ठेवायला लागेल कारण आपल्या सर्वांचा एक आवडता आईस्क्रिम ब्रँड नॅचरल्स हा फक्त mouth publicity च्या जोरावर आज यशाच्या शिखरावर आहे. एका फळ विक्रेत्याचा मुलगा ते ४०० कोटींचा ब्रँड उभारणारा आईस्क्रिम मॅन यांची आणि जाहिरातीवर एक रुपयाही खर्च न करणाऱ्या नॅचरल्स या आईस्क्रिम ब्रँडची संपूर्ण ब्रँड स्टोरी जाणून घेऊ.(Natural Ice Cream)
पूर्वी आपल्या आई बाबांना आईस्क्रिम म्हटलं की व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, पिस्ता मोस्टली इतकेच फ्लेवर माहिती असावेत. पण नंतर 1984 मध्ये आलेल्या नॅचरल्सच्या आईस्क्रिमने याची परिभाषाच बदलली. शहाळ, सीताफळ, अंजीर, फणस या फळांच आइस्क्रीम खाण्याची सवय भारतात रुजवली ती ‘नॅचरल्स’ या ब्रॅण्डने आणि पर्यायाने याचे founder रघुनंदन कामत यांनी. रघुनंदन एस. कामथ यांचा जन्म कर्नाटकच्या पुत्तुरमधल्या एका लहानशा गावात झाला. त्यांचे वडील फळशेती आणि विक्रीचा व्यवसाय करायचे. सात भावंडांमध्ये रघुनंदन हे सर्वात लहान होते.
1966 साली रघुनंदन मुंबईत आपल्या भावांकडे राहायला आले. त्यानंतर रघुनंदन यांनी गोकुळ या नावाने एक लहानसा फुड स्टॉल सुरु केला. तिथे ते ईडली, डोसा आणि आईस्क्रीम विकायचे. पण त्यांची खरी ओढ होती आईस्क्रीमच्या व्यवसायात! त्यातच त्यांना स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करायची होती. मग 1983 साली लग्न झाल्यानंतर त्यांनी वडिलांचा आंब्याचा हा व्यवसाय आईस्क्रीमच्या बिजनेसमध्ये कन्वर्ट केला आणि मुंबईतच एक लहानस आईस्क्रीम पार्लर सुरु केल. त्याकाळी आईस्क्रीम म्हणजे खूपच महागडी आणि highclass लोकांमध्ये फेमस असलेली गोष्ट होती. त्यातच मार्केटमध्ये ऑलरेडी एस्टॅब्लिशड आईस्क्रीम ब्रँडस होते. पण तरीही रघुनंदन यांनी रिस्क घ्यायचं ठरवलं आणि 14 फेब्रुवारी 1984 रोजी जुहूमध्ये Naturals Ice Cream या नावाने पहिल आऊटलेट काढून आईस्क्रीमचा व्यवसाय सुरु केला.(Natural Ice Cream)
या भागात अनेक श्रीमंत लोक राहत असल्याने त्यांनी हाच एरिया फायनल केला. या आऊटलेटमध्ये सुरवातीला फक्त ४ वर्कर्स आणि १० फ्लेवर्स मिळत होते. पण सुरवातीला त्यांना भीती होती कि आपल्या दुकानात कोणी आईस्क्रीम टेस्ट करायला येईल कि नाही. याच भीतीपोटी त्यांनी आईस्क्रीमला side business म्हणून ट्रीट केलं आणि पावभाजी आपल्या मेन फोकस ठेवला. त्यांना असं वाटत होतं कि जर लोक पावभाजी खायला आली तर आपसूकच तिथे असणारं डेसर्ट म्हणून त्यांचं Naturalsच आईस्क्रीम खातील. त्यांचा हा फंडा यशस्वी झाला. पहिल्या वर्षी त्यांचा टर्नओव्हर ५ लाख रुपये इतका होता त्यानंतर त्यांनी लगेचच पुढच्या वर्षी पावभाजीचा व्यवसाय बंद केला आणि फुल्ल फ्लेज आईस्क्रीम ब्रँड म्हणून इस्टॅब्लिश केला.
तेव्हा ते ५ फ्लेवर्समध्ये फ्रोझन फ्रूट आइस्क्रीम देत होते. त्यात कस्टर्ड अॅपल, काजू मनुका, आंबा, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड अशा आइस्क्रीमचा समावेश होता.जुहूमधले अनेक सेलिब्रिटी त्यांचे कस्टमर होते. ते सेलिब्रिटी परदेशातून फिरून आल्यानंतर तिथे त्यांनी कुठलं वेगळ्या फ्लेवर्सच आईस्क्रीम खाल्ल हे रघुनंदन यांना सांगायचे. त्यांचे सजेशन्स ऐकून रघुनंदन यांनी आपल्या आईस्क्रीम पार्लरमध्ये कोकोनट,जॅकफ्रूट, जांभूळ हे नवे फ्लेवर्स ठेवायला सुरुवात केली. याच काळात त्यांनी फळांच्या प्रोसेसिंगसाठी एक मशीन तयार करुन घेतल होत. त्यामुळे त्यांच्या आईस्क्रीमच उत्पादन आणि व्यवसाय वेगाने वाढायला लागला. फ्रेंजायजीसच्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायाचा पसारा हळूहळू वाढायला सुरुवात झाली. २०२४ पर्यंत बघितलं तर संपूर्ण देशात naturals ची 160 आउटलेट्स आहेत. या आऊटलेट्सवर २० फ्लेवर्सचं आईस्क्रीम विकलं जात आहे.(Natural Ice Cream)
=================
हे देखील वाचा : Plane Crash : ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सच सांगतो अपघाताचे कारण
=================
ज्या आईस्क्रीमचे अमिताभ बच्चन आणि विव्हिएन रिचर्ड सुद्धा दिवाने आहेत अशा या आईस्क्रीमचा usp काय आहे तर रघुनंदन यांनी एका interview मध्ये सांगितलं होतं की फळं, साखर, दूध आणि आई हे त्यांचे usp आहेत.आईकडूनच या गोष्टी शिकलो आणि आपल्या प्रॉडक्टमध्ये फक्त नॅचरल गोष्टी वापरण्यावर भर दिला. केमिकल्स वेगवेगळ्या पावडर्सने बनवल्या जाणाऱ्या आईस्क्रीमच्या मार्केटमध्ये रघुनंदन कामत यांनी देसी आणि हेल्दी आईस्क्रीम बनवून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. मग फळांची अस्सल चव हाच नॅचरलचा युएसपी बनला जो आजही तसाच आहे. (Natural Ice Cream)
आजसुद्धा नॅचरल्सच आईस्क्रीम हे चव आणि दर्जासाठी ओळखल जात. इव्हन त्यांची tagline सुद्धा ‘टेस्ट द ओरिजिनल’ हीच आहे. पण इतका मोठा ब्रँड आहे म्हणजे नक्कीच त्याच मार्केटिंग तगड असेल पण असं नाही वर्षभरात ते जेवढं कमवतात त्यात एक टक्क्यापेक्षा सुद्धा कमी खर्च ते जाहिरातीवर करतात.थोडक्यात नॅचरल्सने टिकवून ठेवलेली ओरिजनलिटी हेच त्यांच यश आहे. एका साध्या घरात जन्मलेल्या रघुनंदन यांनी आपल्या मेहनतीच्या आणि प्रोडक्टच्या क्वालिटीच्या जोरावर ४०० कोटींची कंपनी उभारली आणि ‘आईस्क्रिम मॅन ऑफ इंडिया’ अशी आपली ओळख निर्माण केली. आज ते नसले तरी त्यांच्या मार्फत मिळालेला आईस्क्रीमचा स्वाद कायम आपल्यासोबत असेल एवढं मात्र नक्की !