जम्मूमध्ये भगवान व्यंकटेश्वराचे म्हणजेच तिरुपती बालाजीचे भव्य मंदिर (Tirupati Balaji Temple) उभारले जात आहे. या मंदिराचे बांधकाम तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डातर्फे करण्यात येत आहे. या मंदिराचे बांधकाम मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार असून मंदिरात 4 जून पासून भव्य पूजा अर्चना सुरु होणार आहे. जम्मू मधिल हे भगवान बालाजींचे मंदिर 8 जूनपासून भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. हा मोठा समारंभ होणार असून यामध्ये अनेक साधुसंतांना आमंत्रण देण्यात आले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम (Tirupati Balaji Temple) बोर्डातर्फे अशीच भगवान बालाजींची भव्य मंदिरे देशभरात बांधण्यात येणार आहेत.
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या माझिन गावात तिरुपती बालाजीचे भव्य मंदिर (Tirupati Balaji Temple) उभारण्यात येत आहे. या मंदिराचे बांधकाम आता पूर्णत्वास येत असून मंदिर पुढील महिन्यात 8 जून रोजी विधिवत प्रार्थना केल्यानंतर भाविकांसाठी उघडले जाणार आहे. आता या मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. सुमारे 62 एकर जागेत दोन टप्प्यांत बांधल्या जाणाऱ्या या विशाल मंदिरासाठी 33.22 कोटी रुपये खर्च झाले आहेत. बालाजी तिरुपतींचे हे मंदिर (Tirupati Balaji Temple) जम्मूमध्ये झाल्यामुळे माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जगभरातून येणाऱ्या भाविकांना तिरुपती बालाजींचे दर्शन घेता येणार आहे. भगवान व्यंकटेश्वराच्या या मंदिर संकुलात आणखी काही मंदिरे असून संपूर्ण मंदिर हे भारतीय वास्तुशास्त्रानुसार उभारण्यात आले आहे. या तिरुपती बालाजी मंदिराला आंध्र प्रदेशातील भगवान व्यंकटेश्वर मंदिराचे हुबेहूब स्वरूप देण्यात आले आहे. मुख्य मंदिरात स्थापन करण्यात येणारी व्यंकटेश्वराची मूर्ती खास आंध्र प्रदेशातून आणली जाणार आहे. मंदिर उभारण्यासाठी तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील कलाकार गेले काही वर्ष मेहनत घेत आहेत. मंदिरावरील नक्षीकाम आणि सर्व कलाकृती पाहण्यासारख्या आहेत. येथे येणाऱ्या भाविकांना आपण तिरुपतीमध्ये बसलेल्या व्यंकटेश्वराच्या भव्य मंदिराचे (Tirupati Balaji Temple) दर्शन घेत असल्याचा भास होईल. मंदिराच्या बांधकामात वापरले जाणारे दगड कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून आणण्यात आले आहे.
![](https://kfacts.in/wp-content/uploads/2023/05/AA1b55LY.jpg)
या मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळाही खास ठरणार आहे. त्यासाठी मोठा धार्मिक समारंभ होणार आहे. हा सर्व सोहळा चार दिवस चालणार आहे. 4 जूनपासून सुरु होणारा हा सोहळा 8 जून पर्यंत चालणार आहे. 8 जून रोजी भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. यावेळी तिरुमला तिरुपती देवस्थानमचे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिवाय साधूसंतही उपस्थित असतील. तिरुपती बालाजी मंदिर जम्मू-काश्मीरमध्ये आध्यात्मिक केंद्र म्हणूनही विकसित करण्यात येणार आहे. जम्मू मधील या मंदिराची उभारणी पूर्ण झाल्यावर अशाचप्रकारे देशभर तिरुपती बालाजींची मंदिरे (Tirupati Balaji Temple) उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक राज्यात भगवान व्यंकटेश्वराचे मंदिरे स्थापन करण्यात येतील असे तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाने स्पष्ट केले आहे. आंध्रप्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिरात (Tirupati Balaji Temple) ज्या पद्धतीने पूजा केली जाते त्याच पद्धतीने पूजा जम्मू मधील या मंदिरात केली जाणार आहे. जम्मू-काश्मीरनंतर हैदराबाद, दिल्ली, कन्याकुमारी, चिनानी, भुवनेश्वर, मुंबई, रायपूर आणि अहमदाबाद येथेही अशाच प्रकारची भव्य भगवान बालाजींची मंदिरे उभारण्यात येणार आहेत.
आंध्रप्रदेश येथील मुळ मंदिराचा इतिहास 9व्या शतकापासून सुरू झाला असे मानले जाते. 15 व्या शतकानंतर या मंदिराची ख्याती दूरवर पसरू लागली. 1843 ते 1933 या काळात हत्तीरामजी मठाच्या महंताने ब्रिटिश राजवटीत या मंदिराचे व्यवस्थापन हाती घेतले. त्यानंतर 1933 मध्ये मद्रास सरकारने या मंदिराचे व्यवस्थापन आपल्या ताब्यात घेतले आणि या मंदिराचे व्यवस्थापन ‘तिरुमला-तिरुपती’ या स्वतंत्र व्यवस्थापन समितीकडे सोपवले. आंध्र प्रदेश राज्याच्या निर्मितीनंतर समितीची पुनर्रचना करण्यात आली आणि आंध्र प्रदेश सरकारचा प्रतिनिधी म्हणून प्रशासकीय अधिका-याची नेमणूक केली. या मंदिरात दररोज 1 लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर परिसरात मुख्य मंदिराशिवाय इतरही मंदिरे आहेत.
=====
हे देखील वाचा : रोगांपासून मुक्त करणारी शिमल्याची हटेश्वरी माता
=====
श्री वेंकटेश्वराचे हे पवित्र आणि प्राचीन मंदिर वेंकटद्री नावाच्या पर्वताच्या सातव्या शिखरावर आहे. श्री स्वामी पुष्करणी नावाच्या तलावाच्या काठी हे मंदिर आहे. त्यामुळे येथे बालाजीला भगवान व्यंकटेश्वर म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की, भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतलेल्या प्रत्येकाला त्यांचा विशेष आशीर्वाद मिळतो. देशातील प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये तिरुपती बालाजी मंदिर (Tirupati Balaji Temple) खूप प्रसिद्ध आहे. आता अशीच मंदिरे देशभर झाल्यावर भगवान बालाजींचे दर्शन अधिक सुलभरित्या भक्तांना घेता येणार आहे.
सई बने