Home » भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रणेते : लोकमान्य टिळक

भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रणेते : लोकमान्य टिळक

by Correspondent
0 comment
Share

बरोबर १०० वर्षांपूर्वी याच दिवशी एका झंजावत्या वादळाचा अंत झाला. असं वादळ ज्याची ओळख आपल्याला शाळेत स्वाभिमानाचे धडे गिरवताना करून देण्यात आली, “मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही” हाच तो धडा, पण या वादळाची ओळख त्या वादळाची ओळख त्या धड्यापूर्तीच मर्यादित राहिली. हे वादळ म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आज लोकमान्यांची स्मृतिशताब्दी. त्यानिमित्ताने मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही या पलीकडचे लोकमान्य जाणून घेण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न.

१८५७चं बंड मोडीत निघाल्या नंतर, स्वातंत्र्याची आशा सोडून दिलेल्या भारतीय मनांना पुन्हा स्वातंत्र्यासाठी चेतवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकमान्य टिळक. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे ते पहिले नेते होते. खुद्द ब्रिटिशांनीच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले होते. शिक्षक, वक्ते, अभ्यासक, लेखक, पत्रकार, खगोलशास्त्रज्ज्ञ असे बहुआयामी टिळक स्वराज्यासाठी झपाटून काम करत, आणि त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील या इतर सर्व आयमांपेक्षा मुत्सद्दी राजकारणी म्हणून अधिक प्रकर्षाने आपल्या समोर येतात.  

टिळकांची चतुःसूत्री

कुठलीही चळवळ उभारताना लोकांना एकत्र आणणे, त्यांना शिक्षित करणे आणि त्यांच्यात चेतना निर्माण करणे हे महत्त्वाचे असते, हेच काम टिळकांच्या चतुःसूत्रीने केलं. लोकमान्य टिळकांच्या राजकारणाचा खरा पाया म्हणजे स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही त्यांची चतुःसूत्री. शिवाजी महाराजांचीच ‘स्वराज्य’ ही संकल्पना त्यांनी नव्या काळानुसार पुन्हा मांडली. समाजात पुन्हा एकदा स्वराज्याची बीजे रोवली. स्वराज्य म्हणजे इथल्या मातीतल्या लोकांचे इथल्या लोकप्रतिनिधींचे राज्य ही लोकशाहीची तत्त्वे त्यांनी लोकांना समजावली. यासाठीच त्यांनी पुढे होम रूल लीगची स्थापना केली. परकीय सत्ता उलटवण्यासाठी स्वदेशीचा आणि बहिष्कराचा नारा महत्त्वाचा आहे हे टिळकांनी ओळखलं होतं. यात ब्रिटिशांची अर्थव्यवस्था खिळखिळी करणे, तर स्वदेशी उद्योग धंद्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यासाठी बाजारपेठ निर्माण करणे हे दोन मुख्य हेतू होते. भारतीय तरुणांना भारतीय विचारांचे, भारतीय संस्कृतीचे शिक्षण मिळावे, शिक्षणातून रोजगारक्षम तरुण निर्माण व्हावेत, देशभक्तीने पेटून उठणारे, व देशनिर्मितीसाठी उपयुक्त असे तरुण निर्माण व्हावेत असे टिळकांना वाटे आणि त्यासाठी ब्रिटिश शिक्षणपद्धती उपयोगाची नव्हती, तर त्यासाठी राष्ट्रीय शिक्षण हवे हे टिळकांचे मत होते. याच विचारातून पुढे न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली.

धारदार पत्रकारिता

टिळकांच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांच्या अग्रलेखांचा वाटा मोलाचा आहे. केसरी मधून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा लेख लिहून सरकारवर टिका करणारा लेख लिहिणारे टिळक पत्रकार म्हणून देखील खूप महत्वाचे काम करत होते. टिळकांना त्यांच्या आयुष्यात अनेकदा त्यांच्या पत्रकारितेमुळे तुरुंगवास भोगावा लागला. भारताच्या इतिहासातील पहिला राजद्रोहाचा खटला टिळकांविरुद्ध चालवण्यात आला तो सुद्धा त्यांच्या पत्रकारितेमुळेच. टिळकांनी धार्मिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक लेख देखील केसरीत लिहिले. हे सारेच लेख त्यांनी स्वातंत्र्य चळवळीशी जोडले. पत्रकारिता ही सरकारवर स्तुती सुमने उधळण्यासाठी नसून, सरकारची चुकीची धोरणं लोकांसमोर आणण्यासाठी आहे ही टिळकांची धारणा होती.

गीतारहस्य

मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी हा ग्रंथ लिहिला. गीता हा निवृत्तीनंतर अभ्यासण्याचा ग्रंथ आहे हा समज त्यांनी या ग्रंथातून खोडून काढला. कर्मयोगाचे महत्त्व त्यांनी सांगितले किंबहुना ते स्वतः आचरणात आणले. आपले रोजचे जीवन जगताना समाजकार्य कसे करता येईल हे त्यांनी सांगितले. यातूनच अध्यात्मावर आधारित नीतिशास्त्र त्यांनी सामान्य जनतेला शिकविले.

तर असे बहुआयामी टिळक आजच्या पिढीने शेंगांच्या गोष्टी पलीकडे, व स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या पलीकडे अभ्यासण्याची गरज आहे. त्यांचे विचार आजच्या काळात देखील तितकेच मौल्यवान ठरतात आणि म्हणूनच ते खऱ्या अर्थाने युगपुरुष आहेत. आजच्या राजकारण्यांनी, पत्रकारांनी, लेखकांनी, शिक्षकांनी, व्यावसायिकांनी खरं तर सगळ्यांनीच टिळकांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.

–© रसिका कुलकर्णी


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.