खरं तर, लग्न ही अगदी वैयक्तिक बाब. मियां बिबी राजी तो क्या करेगा काझी, अशी एक हिंदी म्हण आहे. परंतु भारतात लग्न हे फक्त दोन व्यक्तींचं मिलन नसतं, तर दोन कुटुंबांचे मिलन असते. त्यातही राजकीय घराणं असेल तर मग बघायलाच नको. प्राचीन काळापासून आजपर्यंत राजे, सम्राट आणि राजकीय घराण्यांमध्ये परस्पर लाभासाठी विवाह होताना आपण पाहतो. अशाच एका राजकीय संबंधांवरून बिहारच्या राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबात वादळ आलं आहे. त्यांचे थोरले चिरंजीव तेजप्रताप यादव यांच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहेत. ते आरोप म्हणजे त्यांनी अनेक लग्ने केली असून अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या चॅट आणि फोटो-व्हिडिओंमुळे या प्रकरणाला नवनवे वळण मिळत आहे. काय आहे हे सगळं प्रकरण? ते कसं सुरू झालं? आणि यामुळे लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबाच्या अडचणी कशा वाढल्यात? हे जाणून घेऊ. (Tej Pratap Yadav)
या प्रकरणाची सुरूवात झाली ती तेजप्रताप यादव यांच्या फेसबुक पोस्टपासून. या पोस्टमध्ये त्यांनी अनुष्का यादव नावाच्या मुलीसोबत एक फोटो पोस्ट केला.एवढंच नाही, तर गेल्या १२ वर्षांपासून आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत, असे त्यांनी पोस्ट द्वारे जाहीरही केलं. या गौप्यस्फोटामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. पण गंमत बघा, जेव्हा हा विषय तापायला लागला, तेव्हा, “माझं अकाउंट हॅक करण्यात आलं आहे आणि ‘एआय’च्या माध्यमातून हे चित्र तयार करण्यात आलं आहे,” असा दावा तेजप्रताप यांनी केला. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही, की तेजप्रताप यांचं लग्न २०१८ मध्ये ऐश्वर्या राय नावाच्या मुलीशी लग्न झालं होतं. ऐश्वर्या ही बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगाप्रसाद राय यांची नात. पण हे लग्न फक्त तीन महिनेच टिकलं. तीन महिन्यांच्या आत ऐश्वर्या हिने घटस्फोटासाठी अर्ज केला. ऐश्वर्या सध्या तिच्या पतीपासून वेगळी राहत आहे. (Political News)
आता प्रश्न असा – जर तेजप्रताप आणि अनुष्का १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते, तर मग तेजप्रताप यांनी ऐश्वर्याशी लग्न का केले? हाच प्रश्न तेजप्रताप यांच्या पोस्टनंतर लोकांनी विचारला. सोमवारी ऐश्वर्या यांनी मीडियाशी संवाद साधला तेव्हा तिनेही हाच प्रश्न उपस्थित केला. माझे आयुष्य का उद्ध्वस्त केले, असा सवाल तिने केला. ऐश्वर्याने तेजप्रतापवर घरगुती हिंसाचार आणि विचित्र वर्तनाचे आरोप केले. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे.(Tej Pratap Yadav)
पण गोष्ट इथेच थांबत नाही. यादव कुटुंब अजूनही एकत्रच आहे आणि फक्त विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने लालूप्रसाद हे नाटक करत आहेत, असा आरोप ऐश्वर्याने केला. तेजप्रताप यांच्या या भानगडीची त्यांच्या कुटुंबातील सर्वांना माहिती होती. तरीही त्यांचे लग्न लावून देण्यात आलं, असंही ती म्हणाली आहे. दुसरीकडे, तर तेजप्रताप यांनी स्वतः एका पॉडकास्टमध्ये मान्य केलं होतं की ऐश्वर्याशी त्यांचं लग्न राजकीय फायद्यासाठी झालं. दोन मोठ्या राजकीय कुटुंबांना जोडून “एक आणि एक अकरा” बनवण्याचा हा खेळ होता, असं ते म्हणाले होते.
एकीकडे हा प्रेमाचा triangle गाजत असतानाच आणखी एका characterची या प्रकरणात एंट्री झाली. ती म्हणजे निशू सिन्हा.सोशल मीडियावर अनुष्का यादव हिचे काही चॅट्स व्हायरल झाले, ज्यात अनुष्का म्हणतेय की तिला आता मीडियासमोर यावं लागेल. तसंच तेजप्रताप यादव १७ मे २०२५ रोजी मालदीवला जाणार आहेत आणि २३ मे रोजी परतण्याची त्यांची योजना आहे. तेजप्रताप आणि निशू सिन्हा मालदीवला जात आहेत, असा सुद्धा दावा या चॅटमध्ये करण्यात आला. याचा अर्थ निशू सिन्हा कोण आहे आणि तिचे तेजप्रतापशी काय नातं आहे, हे अनुष्काला माहीत होते. तेजप्रताप आणि निशू सिन्हा यांच्यात पती-पत्नीसारखे नातं आहे. असं अनुष्का यांच्या या कथित चॅटमध्ये म्हटले आहे. पण एवढंच नाही या चॅट्सनुसार, तेजस्वी यादव यांनीच तेजप्रताप निशू सिन्हा यांना मालदीवला पाठवलं होतं, तेजप्रताप यांनी एकदा नाही तर तीनदा लग्न केले आहे. पहिली ऐश्वर्या राय, दुसरी अनुष्का यादव म्हणजेच ती स्वतः आणि तिसरी निशू सिन्हा, असाही चाट्समध्ये दावा आहे.(Tej Pratap Yadav)
स्थानिक माध्यमांमधील बातम्यांनुसार, निशू ही पाटण्यातील खगौल भागात राहते, तर अनुष्का यादव लंगरटोली येथे राहते. या सगळ्या प्रकरणात आणखी एक character आहे आकाश यादव. हा अनुष्काचा भाऊ आहे. या आकाश यादवला तेजप्रताप यांचा वरदहस्त आहे आणि त्यामुळेच त्याला पक्षात मोठी पदं मिळाली. याच आकाशच्या उदयामुळे तेजप्रताप, पक्ष आणि कुटुंबात मागे पडले, असं बोललं जातं. आकाश याला २०२१ मध्ये बिहार छात्र राजदचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं. त्यावरून राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह आणि तेजप्रताप यांच्यातही संघर्ष निर्माण झाला. त्यावेळी तेजप्रताप यांनी बंडही केले होते. ऐश्वर्या यांच्या पत्रकार परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी, आकाश यादव पुढे आला. आमच्याकडे गमावण्यासारखे काही नाही, पण लालू आणि तेजस्वी यांच्याकडे गमावण्यासारखे आणि मिळवण्यासारखे खूप काही आहे, असं एक सूचक वक्तव्य त्याने पत्रकारांसमोर केलं. याला काही जण इशारा मानतात तर काही जण धमकी मानतात. (Social News / Updates)
या सगळ्यामध्ये, तीन मुलींशी लग्न करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या तेजप्रताप यादव यांना दोषी ठरवावं की कुटुंब आणि पक्षात त्यांच्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात कट रचल्याचा दावा खरा मानून त्यांना सहानुभूती दाखवावी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतकेच नाही तर त्यांची ही सगळी कुलंगडी माहीत असतानाही त्यांना पाठीशी घालणारे यादव कुटुंब आता नाटक करत आहे का? फक्त लालू यादवच नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाला हे माहीत होतं, अशी पुष्टी तेजप्रताप यांचे मामा म्हणजे राबडी देवी यांचे भाऊ सुभाष यादव यांनीही केली आहे. ते काहीही असलं तरी या प्रकरणात लालू आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब दोषी असल्याचं दिसून येतं. त्यांना सर्व काही माहीत होतं, मात्र जेव्हा गोष्टी चव्हाट्यावर आल्या तेव्हा नैतिकतेचा बहाणा करून हकालपट्टीचे नाटक रंगविण्यात आलं. असं बोललं जातं आहे.(Tej Pratap Yadav)
================
हे देखील वाचा : Osama Bin Laden’s House : पाकिस्तानातील एबटाबादमध्ये राहणाऱ्या लादेनच्या घराचे काय झाले? घ्या जाणून
================
यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जातीचा मुद्दा. ऐश्वर्या आणि अनुष्का या यादव समाजातून आहेत, तर निशू सिन्हा ही कायस्थ. या तिघींवर झालेल्या अन्यायाचा मुद्दा बिहारच्या राजकारणात पुढच्या काळात चांगलाच तापेल. बिहार भाजप लवकरच हा मुद्दा पुढे नेताना दिसू शकतं. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अद्याप तरी याला वैयक्तिक बाब म्हणत त्याची फारशी चर्चा केलेली नाही. मात्र हे वैयक्तिक प्रकरण लवकरच सामाजिक मुद्दा बनण्याची शक्यता आहे. अन्य पक्षही या मुद्द्यावर लालूंच्या कुटुंबाला लक्ष्य करतील अशी शक्यता आहे. विशेषतः नीतीश कुमार यांचा संयुक्त जनता दल या प्रकरणाचा पूरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करेल.(Tej Pratap Yadav)
लालूप्रसाद यांचे धाकटे चिरंजीव तेजस्वी यादव हे बिहारचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना मुख्यमंत्री करायचं, हे लालूंचं स्वप्न आहे. गेल्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली राजदने चांगली कामगिरी केली होती. परंतु या संपूर्ण प्रकरणामुळे तेजस्वी यांचं मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झालं आहे, असंं लालूंच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. तोपर्यंत या प्रकरणाचे अनेक पदर उलगडायचे आहेत! तेजप्रतापच्या भानगडींमुळे लालू कुटुंब आणि राजदचं काय होणार? हा खेळ कसा पुढे जाणार? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे!