Home » बुध-बृहस्पती व्रताची माहिती आणि पूजाविधी

बुध-बृहस्पती व्रताची माहिती आणि पूजाविधी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shravan Budh Brihaspati Vrat
Share

श्रावण महिना सुरु झाला असून वातावरणात एक नवीनच ऊर्जा आणि आनंद जाणवू लागली आहे. दिव्यांच्या अमावस्या झाली, श्रावणी सोमवार झाला, नवविवाहितांनी मंगळागौर देखील साजरी केली आता आज आहे बुध-बृहस्पती व्रताचा दिवस. सगळ्यांनाच माहित आहे की, श्रावण म्हटले की, रोजचा दिवस खासच असतो. आठवड्यातले सगळेच वार विशिष्ट देवांना समर्पित असतात.

सामान्यतः आपण आपल्या रोजच्या जीवनात बुधवार आपण साजरा करत नाही. अर्थात सोमवार शंकर देवाचा, मंगळवार गणपती बाप्पाचा असतो. मात्र बुधवारला असे काही खास नसते. मात्र याच बुधवार वाराला श्रावणात अनन्यसाधारण महत्व आहे. श्रावणात बुधवार हा ‘बुध-बृहस्पती’ यांचा वार म्हणून साजरा केला जातो. श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते. आता बहुसंख्य लोकांना याबद्दल माहिती नसेलच. आज श्रावणी बुधवार आहे, त्याच निमित्ताने जाणून घेऊया बुध-बृहस्पती व्रताबद्दल आणि त्याच्या महत्वाबद्दल.

श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी अनेक घरांमध्ये जिवतीचा कागद देवघरात चिकटवून त्याची पूजा करण्याची परंपरा आहे. या जिवतीच्या फोटोमध्ये बुध-बृहस्पती देखील असतात. यांचीच बुधवारी पूजा केली जाते. यावर्षी ७ ऑगस्ट, १४ ऑगस्ट, २१ ऑगस्ट आणि २८ ऑगस्ट या तारखांना बुधपूजन करता येणार आहे. तर ८ ऑगस्ट, १५ ऑगस्ट, २२ ऑगस्ट आणि २९ ऑगस्ट रोजी बृहस्पती पूजन करता येईल. आता त्यांचे पूजन कसे करावे? याची व्रतकथा काय? पाहूया.

बुध-बृहस्पती व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र, फोटो किंवा चंदनाने बालस्ती रेखाटून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे. दररोज घरातील देवांची जशी पूजा केली जाते, अगदी तशीच पूजा या बुध-बृहस्पती यांची करायची असते. पूजा संपन्न झाल्यानंतर शेवटी नैवेद्य म्ह्णून दही-भात ठेवला जातो. बुध-बृहस्पतीचे हे व्रत सात वर्षे केले जाते.

धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन आदी गोष्टी या बुध-बृहस्पती यांच्या पूजेनंतर आणि व्रतानंतर आपल्याला प्राप्त होतात. बुध आणि बृहस्पती यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते. मनःशांतीसाठी हे व्रत करणे अतिशय उत्तम आणि फायदेशीर मानले जाते. हे व्रत केल्यानंतर ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुजनांना भेटवस्तू द्याव्यात. खूप महाग, मोठे काही न देता अगदी एखादे फूल, एखादे पुस्तक दिले तरी चालते. या पूजेमुळे मुलांनाही या पूजेची आणि परंपरेची माहिती मिळते आणि जाणीव होते. सोबतच ही परंपरा आणि त्याचे सातत्य देखील टिकून राहते. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून देखील साजरा करू शकतो.

Shravan Budh Brihaspati Vrat

बुधपूजन करताना पुढील मंत्र म्हणावा:

ॐ पूर्वकपिमुखाय पच्चमुख हनुमते टं टं टं टं टं सकल शत्रु सहंरणाय स्वाहा।

सकाळी उठून स्नान केल्यानंतर भगवान शंकराला गंगाजल आणि शमीच्या पानांनी अभिषेक करावा. यानंतर पूजा करून या मंत्राचा २१ वेळा जप करावा. बुधवारी या मंत्राचा जप केल्यास आपल्याला शत्रूपासून मुक्ती मिळते.

बृहस्पती मंत्र :

देवनम् च ऋषिं गुरुं कंचना-सन्निभं बुद्धि-भूतम् त्रिलोकेशन तम नमामि बृहस्पतिम ||

गुरुवारी हा मंत्र पहाटे ४ ते ६ या वेळेत म्हणावा.

बुध-बृहस्पती पूजनाचे लाभ

बुधपूजनामुळे सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि सुख लाभते. तसेच वैवाहीक जीवनात आनंद आणि गोडवा कायम टिकतो आणि वाढत राहतो. जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. व्रत करणाऱ्या व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होते आणि त्या व्यक्तीची जगात वेगळी ओळख निर्माण होते. कामात त्या व्यक्तीला यश मिळते. ती व्यक्ती भय आणि तणावाशिवाय जीवन जगते.

बुध-बृहस्पती कथा

ऐका बुध-बृहस्पतींनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला सात मुलगे होते, सात सुना होत्या. त्याच्या घरी रोज एक मामा-भाचे भिक्षेला जात. राजाच्या सुना ‘आमचे हात रिकामे नाहीत’ म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यास द्रारिद्र्य आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामा-भाचे पूर्वीप्रमाणं भिक्षेला आले. सर्व सुनांनी सांगितलं, “असतं तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झाले.” सर्वांत धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही. ब्राह्मण विन्मुख जातात. ती त्यांच्या पाया पडली. त्यांना सांगू लागली, “आम्ही संपन्न असता धर्म केला नाही ही आमची चुकी आहे.

<p>आता आम्ही पूर्वीसारखी होऊ, असा काही उपाय सांगा,” ते म्हणाले, “श्रावणमासी दर बुधवारी आणि बृहस्पतवारी जेवायला ब्राह्मण सांगावा. आपला पति प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागं दोन बाहुली काढावी. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी. त्यांची मनोभावे पूजा करावी. अतिथींचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतु पूर्ण होतात.” त्याप्रमाणे ती करू लागली.

<p>एके दिवशी तिला स्वप्न पडलं, “ब्राह्मण जेवीत आहेत, मी चांदीच्या भांड्यानं तूप वाढते आहे.” ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केला. इकडे काय चमत्कार झाला? तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं? हत्तिणीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरविलं, “ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याचा राज्याभिषेक होईल,” अशी दौंडी पिटविली. हत्तिणीनं ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली.

======

======

हे देखील वाचा : जाणून घ्या श्रावणी सोमवारची ‘ही’ माहिती

======

======

मंडळींनी त्याला हाकलून दिलं. पुन्हा हत्तीण फिरविली. पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली. याप्रमाणं तीनदा झालं. पुढं त्याचाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली, तेव्हा ती अन्न अन्न करून देशोधडीस लागल्याची खबर समजली.

मग राजानं काय केलं? मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारो मजूर खपू लागले, तिथं त्याची माणसं आली. राजानं आपली बायको ओळखली. मनामध्ये संतोष झाला. तिनं बुध-बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविली. देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनात ठेविली.

ब्राह्मणभोजनाचा थाट केला. हिच्या हातात चांदीचं भांडं दिलं. तूप वाढू सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनीं ते पाहिलं. त्याचा सन्मान केला. मुलंबाळं झाली. दुःखाचे दिवस गेले. सुखाचे दिवस आले. जशी त्यांवर बुध-बृस्पतींनी कृपा केली, तशी तुम्हा आम्हावर करोत. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.