श्रावण महिना सुरु होऊन बरेच दिवस झाले आहेत. आता श्रावणातील एक एक सणवार येतील. नागपंचमीचा सण साजरा केल्यानंतर काही दिवसातच श्रावणातला दुसरा महत्वाचा सण साजरा केला जातो, आणि तो म्हणजे ‘नारळी पौर्णिमा’. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा खरेतर हे दोन्ही सण एकत्रच साजरे केले जातात. मात्र कधी कधी नारळी पौर्णिमा आधी होते यानंतर रक्षाबंधन साजरे केले जाते. यंदा असेच होणार आहे. आधी नारळी पौर्णिमा आहे आणि दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन असेल. नारळी पौर्णिमा हा सण खासकरून कोळी बांधव मोठ्या जल्लोषाने साजरा करतात. जाणून घेऊया याच सणाच्या महत्वाबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल. (Todays Marathi News)
कधी आहे नारळी पौर्णिमा?
हिंदू पंचांगानुसार, यावर्षी श्रावणी पौर्णिमेची तिथी शुक्रवार, ८ ऑगस्ट २०२५ रोजी ०२ वाजून १२ मिनिटांनी सुरू होईल. दुसऱ्या दिवशी ९ ऑगस्ट २०२५, रोजी शनिवारी दुपारी ०१ वाजून २४ मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार ९ ऑगस्ट २०२५, रोजी नारळी पौर्णिमा साजरी केली जाईल.
श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा येते. नारळी पौर्णिमा हा सण महाराष्ट्रासह गोवा आणि गुजरात किनारपट्टीवर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नारळी पौर्णिमा सणाला श्रावणी पौर्णिमा म्हटले जाते. विशेषतः कोळी समाजात हा सण खूप महत्वाचा असो. या दिवशी, समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला जातो. या पूजेचा मुख्य उद्देश समुद्र देवता आणि वरुण देवाला प्रसन्न करणे आणि मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी, प्रवासासाठी प्रार्थना करणे हा असतो. वरुण देव हा जल आणि समुद्राचा देव मानला जातो, त्याची आराधना करणे आणि त्याला प्रसन्न करणे, हे या दिवसाचे महत्व असते.(Marathi Trending News)
पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची ये – जा या काळात बंद असते. जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात म्हणून समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा साधा नारळ अर्पण करत असतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. पावसाळ्याच्या दिवसांनंतर, समुद्र हळूहळू शांत होऊ लागतो. समुद्र शांत होऊ लागला की, कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करतात, त्यामुळेही या दिवसाला महत्व आहे. (Latest Marathi News)
नारळी पौर्णिमेला शंकरासह वरुण देवतेची पूजा केली जाते. पूजेचा विधी पूर्ण केल्यानंतर मच्छीमार आपल्या सजवलेल्या बोटी समुद्रात घेऊन जातात आणि काही वेळातच समुद्रातून किनाऱ्यावर परततात आणि कुटुंबासह आनंद साजरा करतात. समुद्राची प्रदक्षिणा केल्यानंतर डान्स, गायन आदी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. महिला वर्ग सोन्याचे आभूषण परिधान करुन गोडाधोडाचे पदार्थ बनवतात. कोळी बांधवांसाठी हा सण अधिक खास मानला जातो. या दिवशी पारंपरिक पदार्थ, विशेष करून गोड भात बनवला जातो. या दिवशी घरातील मंडळी एकत्र जमा होतात. (Marathi Top News)
कोळी बांधव नारळ पौर्णिमेला बोटींची पूजा करतात. बोटींना पताका लावतात. छान रंगरंगोटी करून बोटी सजवतात आणि मासेमारीसाठी समुद्रात लोटतात. कोळीवाड्यातून मिरवणुका निघतात. थोरामोठ्यांपासून लहान मुलांसह सगळे वाजत गाजत मिरवणुकीने बंदरावर येतात. पारंपरिक कोळीगीते आणि वाद्याच्या साथीने या मिरवणुका निघतात. नारळी पौर्णिमेला खास बनवलेल्या नारळाच्या पूर्ण्या अर्थात करंज्या यांचा नैवद्य बोटीला व समुद्राला दाखवतात. समुद्राची यथासांग पूजा करतात.(Top Marathi Stories)
===========
Rakshabandhan : जाणून घ्या रक्षाबंधनाची तारीख, शुभवेळ आणि या सणाचे महत्व
===========
दक्षिण भारतात नारळी पौर्णिमेच्या दिवशी उपनयन किंवा यज्ञोपवीत विधी मोठ्या प्रमाणावर केले जातात. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पवित्र धागा बदलण्याची परंपरा आहे. म्हणूनच या सणाला अबितम, श्रावणी किंवा ऋषी तर्पण असेही म्हणतात. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी ब्राह्मणांना अन्नदान किंवा दान देण्याचीही परंपरा आहे. विशेषतः किनारपट्टी भागातील लोक नारळी पौर्णिमा हा सण साजरा करतात. (Social News)
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics