या युगी सर्व पृथ्वीवर म्लेन्छ पातशाह… मऱ्हाटा पातशाहएवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही… कृष्णाजी अनंत सभासदांनी सभासद बखरीत शिवराज्याभिषेकाचा केलेला हा ऐतिहासिक उल्लेख… यामध्ये त्यांनी लिहिलंय, ही गोष्ट सामान्य झाली नाही… हे खूप महत्त्वाचं आहे. कारण याच दिवशी जवळपास ६०० वर्षानंतर हिंदुंचं सार्वभौम असं स्वराज्य प्रस्थापित झालं. हे स्वराज्य उभारलं छत्रपती शिवाजी महाराज यांनी !
आपल्या सर्वांना अनेकदा वाटतं, महाराजांबद्दल सर्वांना सांगावं, त्यांची महती घरोघरी पोहोचवावी. पण तुम्ही इथे चुकताय… आपले महाराज त्याचवेळी ३५० वर्षांपूर्वीच सातासमुद्रापार पोहोचले होते. एक छोटा किस्सा सांगतो. मिर्झा राजा जयसिंग जेव्हा महाराष्ट्रात आले होते, त्यावेळी महाराजांची आणि मिर्झा राजाची भेट पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी झाली होती. त्यावेळी मिर्झा राजांनी मुघलांच्या दरबारातला एक इटालियन प्रवासी आणि डॉक्टर, आणला होता, तो लेखक पण होता… त्याचं नाव निकोलाओ मनुची… (Shivrajyabhishek Sohala)
तो महाराजांना म्हणतो की, मी तुमच्याबद्दल इटलीमध्ये असताना आमच्या राजाकडून ऐकलं होतं… किती महत्त्वाचं आहे बघा…मनुचीला महाराजांबद्दल त्याच्या देशातल्या राजाकडून कळतय, म्हणजेच त्याच काळात महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरली होती. याच मनुचीने महाराजांचं एक चित्रसुद्धा काढून घेतलं होतं. लंडन GAZETTE मध्ये महाराजांची बातमी त्यावेळी छापून आली होती. महाराजांचं ऐतिहासिक कर्तृत्व, त्यांचा पराक्रम, त्यांची युद्धनीती या सर्व गोष्टींमुळे महाराष्ट्र फ्रेंच, पोर्तुगीज, डच, इंग्रज, मुघल अशा सर्वांच्या साहित्यात आपल्याला पहायला मिळतात. (Top Stories)
अनेक परकीय लेखक आणि प्रवाशांनी महाराजांचा उल्लेख करून ठेवला आहे, यामध्ये कॉस्मो दा गार्डा, ABE कॅरे, थेवनॉट, फ्र्नास्वा मार्टिन असे अनेक आहेत, यामध्ये अजून तीन नाव आहेत, ते म्हणजे हेन्री ओक्झींडेन, जॉर्ज रॉबिन्सन आणि thomas मायकल ! त्यांचे फोटो तसे उपलब्ध नाहीयेत… विशेष म्हणजे हे तिघेही महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर उपस्थित होते. पण त्यांच्या दृष्टीकोनातून आपल्या राजांचा राज्याभिषेक कसा होता, जाणून घेऊ.(Shivrajyabhishek Sohala)
शिवराज्याभिषेकाची जितकी माहिती आपल्याला मिळते, ती सभासद बखर, श्री शिवभारत ग्रंथ आणि त्यावेळी रायगडावर उपस्थित असलेल्या इंग्रजांच्या साहित्यातून… मुघल, आदिलशाही, कुतुबशाही यांच्या कोणत्याही साहित्यात राज्यभिषेकाची नोंद नाही. पण राज्यभिषेकाची बातमी ऐकून मुघलांची हालत कशी झाली होती, ही गोष्ट कृष्णाजी अनंत सभासद कसे सांगतात बघा…
ही वर्तमाने (शिवछत्रपतींचा राज्याभिषेक) बहादूरखान कोका यास कळली. त्याने पुढे पेडगाव भिमातरी येथे येऊन छावण्या केल्या आणि दिल्लीस पाद्शहास हे वर्तमान सिंहासनाचे लिहिले. पातशाहास कळून तक्तावरून उतरून अंत:पुरात गेले आणि दोन्ही हात भुईस घासून आपले देवाचे नाव घेऊन परम खेद केला. दोन दिवस अन्न-उदक घेतले नाही. आणि बोलिले की, खुदाने मुसलमानाची पातशाही दूर करून तक्त बुडवून मराठीयांस तक्त दिले, आता हद्द झाली. आता ही नोंद सभासदांची असली तरी मुघलांची आणि त्यांच्या पादशहाची अशीच परिस्थिती नक्कीच झाली असेल. पण तुम्हाला थ्री ईडीयटसमधला तो एक सीन आठवतोय का… हम दुखी थे… पर हमसे ज्यादा दुखी दो और लोग थे… इंग्रज सुद्धा दुखीच होते पण एक महत्त्वाचं की त्यांनी शिवराज्याभिषेकाची नोंद ठेवली.(Shivrajyabhishek Sohala)
इंग्रजांच्या साहित्यात राज्याभिषेकाचा पहिला उल्लेख ४ एप्रिल १६७४ च्या पत्रात येतो. महाराजांचे प्रतिनिधी नारायण शेणवे यांनी रायगडावरून इंग्रजांच्या मुंबई कौन्सिलला एक पत्र धाडलं होतं. हे राज्याभिषेकाच्या आमंत्रणाचं पत्र होतं. यावेळी इंग्रजांसाठी चांगला नजराणाही ठरवण्यात आला होता. या सगळ्या गोष्टींचा वृत्तांत ओक्झींडेनच्या डायरीमध्ये आहे. मेदरम्यान महाराज प्रतापगडावरील देवीच्या मंदिरात गेले होते. यावेळी महाराजांनी देवीला सव्वा मण शुद्ध सोन्याचं छत्र अर्पण केलं होतं. याच दरम्यान सर्व इंग्रज अधिकाऱ्यांची सोय रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावात होती. हे सगळ ओक्झींडेनने लिहून ठेवलं होतं. महाराज रायगडावर परतल्यानंतर ओक्झींडेनने निराजी पंडित यांच्याकडे रायगडावर यायची विनंती केली. 22 मे रोजी सर्व इंग्रज प्रतिनिधी म्हणजे ओक्झींडेन, रॉबिन्सन आणि मायकल हे रायगडावर पोहोचले. तिथे त्यांची राहायची पूर्ण व्यवस्था केलेली होती.(Top Stories)
रायगडावर जातानाचा प्रसंग ओक्झींडेनने नोट करून ठेवला आहे, तो असा की,आम्ही ३ वाजता पाचाड सोडले आणि सूर्यास्तापूर्वी रायगडावर पोहोचलो. हा दुर्ग चढून जाण अत्यंत कठीण आहे. या दुर्गावर जाणारा एकाच मार्ग असून तो अधिक सुरक्षित आहे. या मार्गावर बुरुजयुक्त तटबंदी आहे. पर्वताच्या सर्व बाजूस उंच कडे आहेत. त्यामुळे फितुरीशिवाय हा दुर्ग जिंकणे अशक्यच…पर्वतावर अनेक उंच इमारती आहेत, यामध्ये राजाचा दरबार, मंत्र्यांची घरेसुद्धा आहेत. इथल्या घरांची संख्या जवळपास ३०० इतकी आहे. रायगडाच्या पठाराची लंबी अडीच मैल आहे आणि रुंदी अर्धा मैल आहे. इथे वृक्ष कमी आहेत आणि शेती शक्य नाही. आमचं घर राजाच्या दरबारापासून एक मैल अंतरावर आहे. विचार करा… एका इंग्रज अधिकाऱ्याने किती डीटेलिंगमध्ये या सर्व गोष्टींची नोंद करून ठेवली आहे. (Shivrajyabhishek Sohala)
२६ मेला महाराज आणि इंग्रज प्रतिनिधींची भेट घडली. यावेळी त्यांनी महाराज आणि युवराज शंभू राजे यांना मुंबई कौन्सिलने दिलेले नजराणे दिले. पुढे ओक्झींडेन लिहितो की, २९ मे रोजी महाराजांची सुवर्णतुला झाली, ज्यामध्ये १६००० होन लागले. ५ जूनला निराजी पंडित यांनी इंग्रजांकडे एक संदेश पाठवला, त्यात लिहिलं होतं की, सकाळी ७ ते ८ दरम्यान महाराज सिंहासनारोहण करतील. त्यावेळी तुम्ही येऊन महाराजांचे अभिनंदन करावे, राजांना ते निश्चितच आवडेल. त्यांच्या बोलण्यानुसार शिवराज्याभिषेकाच्या दिवशी उपस्थित इंग्रज अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर पुन्हा एकदा नजराणा घेऊन गेले. मुजरा घातला. महाराजांनी तो आनंदाने स्वीकारला. महाराजांना राज्याभिषेकाच्या वेळी काय नजराणा द्यायचा, भेटवस्तू द्यायची… याबाबत बॉम्बे कौन्सिलची बैठकसुद्धा झाली होती.(Top Stories)
यामध्ये असं ठरलं होतं की, महाराजांचा एक हिरेजडीत शिरपेच, ज्याची किंमत ६५० होती, दोन हिरेजडीत सलकडी, आणि दोन महागडे मोती… असा नजराणा द्यायचा. तसेच यावेळी युवराज शंभू राजे यांच्यासह मोरोपंत पेशवे, अण्णाजी दत्तो, निराजी पंडित, राहुजी सोमनाथ यांनाही नजराणा दिला होता. मुळात इंग्रजांचे शिवराज्याभिषेकाला येणे हे त्यांच्यासाठी व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. असंही सांगितलं जातं की, सुरत लुटीच्या वेळी इंग्रजांच्या वखारीचं नुकसान झालं होतं म्हणून नुकसानभरपाई मागण्यासाठी आणि एकमेकांवर हल्ला न करण्याच्या तहाची काही कलमे घेऊन तो रायगडवाडी येथे आला होता. यावेळी तहाच्या काही मागण्या मान्य झाल्यामुळे इंग्रज खुश होते. (Shivrajyabhishek Sohala)
===============
हे देखील वाचा : Shiv Rajyabhishek : शिवराज्याभिषेक सोहळ्याची माहिती
===============
हेन्री ओक्झींडेनने अजूनही एक महाराजांचं वर्णन करून ठेवलं आहे, फक्त त्याने यामध्ये महाराजांचं वय ४७ सांगितलं आहे, याचं कारण अद्याप स्पष्ट नाही. तो म्हणतो की, ‘शिवाजी ४७ वर्षांचा असून देखणा होता, त्याच्या चर्येवरून त्याची बुद्धिमत्ता व चाणाक्षपणा सहज ध्यानात येई,त्याचा वर्ण इतर मराठ्यांपेक्षा पुष्कळच गोरा होता.त्याची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ व टोकाशी बाकदार होते.त्याची दाढीत निमुळती असून मिशी बारीक म्हणजे विरळ होती.त्याचे भाषण निश्चयात्मक,स्पष्ट पण जलद होते. (Shivrajyabhishek Sohala)
अशा अनेक गोष्टींच्या महत्त्वपूर्ण नोंदी इंग्रजांनी करून ठेवल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा खऱ्या अर्थाने भारताच्या इतिहासतील सुवर्णदिन होता. ज्याचे पडसाद सातासमुद्रापार उमटलेच… पण पुढे याच स्वराज्याचं रुपांतर साम्राज्यात झालं आणि मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा थेट अफगाणिस्तानपर्यंत पोहोचल्या.