सौदी अरेबियाने पाकिस्तानी पंतप्रधानांना नुकतीच एक विनंती केली आहे. त्यात पाकिस्तानी भिका-यांना आवरा अन्यथा यापुढे पाकिस्तानी नागरिकांना हज यात्रेलाही येऊ देणार नाही, अशी थेट तंबी दिली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे आणि पाकिस्तानचे आणखी एक रुप उघड झाले आहे. सौदी अरेबियाने धार्मिक यात्रेच्या नावाखाली येणाऱ्या पाकिस्तानी भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानातून येणा-या भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येबाबत सौदी अरेबियाने थेट शाहबाज सरकारला जाहीर इशारा दिला आहे. उमराह व्हिसा म्हणजेच तीर्थयात्रा व्हिसाच्या आधारे अनेक पाकिस्तानी सौदी अरेबियाला जातात आणि तिथे भिक मागतात. यात महिलांची संख्या मोठी आहे. फक्त सौदी अरेबियाच नाही, तर आखाती देशांमध्येही पाकिस्तानी भिका-यांची संख्या वाढली आहे, आणि त्याबाबत पाकिस्तानला सूचना देण्यात आल्या आहेत. जगभरात जे भिकारी सापडतात त्यातील 90 टक्के भिकारी हे पाकिस्तानातील आहेत. (Pakistani Beggars)
आता या वाढत्या भिका-यांच्या संख्येनं हैराण झालेल्या देशांनी पाकिस्तानच्या शरीफ सरकारला थेट इशारा दिला आहे. पाकिस्तान हा देश अवघ्या जगासाठी एक डोकेदुखी आहे. अतिरेक्यांचा आणि दहशतवाद्यांचा आवडता देश म्हणून ओळख असलेल्या पाकिस्तानची नवी ओळखही निर्माण झाली आहे. ती म्हणजे, भिका-यांचा देश. अर्थातच मोठ्या संख्येनं पाकिस्तानी नागरिक आखाती देशात जाऊन भिक मागण्याचा धंदा करीत आहेत. आता या भिकारी पाकिस्तानी नागरिकांमुळे त्या देशातील व्यवस्थेवर ताण येऊ लागला आहे. त्यामुळे या भिका-यांना परत त्यांच्या देशात पाठवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यातूनच सौदी अरेबियानं पाकिस्तानला त्यांच्या देशातून येणा-या भिका-यांना आवरा असे सांगितले आहे. उमराहच्या नावाखाली पाकिस्तानातून येणाऱ्या भिकाऱ्यांची संख्या या देशात कमालीची वाढली आहे. त्यामुळे सौदीने पाकिस्तानच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाला इशारा दिला आहे. (Pakistani Beggars)
जर पाकिस्तान भिकाऱ्यांना रोखू शकत नसेल तर त्याचा परिणाम पाकिस्तानी उमराह आणि हज यात्रेकरूंवर होऊ शकतो, अशीही तंबी दिली आहे. पाकिस्तानमध्ये सौदी आणि अन्य देशांमध्ये भिक मागण्यासाठी पाठवण्यात येणा-या नागरिकांच्या चक्क टोळ्या आहेत. या टोळ्यांना काही ट्रॅव्हल एजन्सींही मदत करतात. या ट्रॅव्हल एजन्सीसाठी कडक नियम आखावेत असा सूचना सौदीच्या अधिका-यांनी पाकिस्तानी मंत्रालयाला दिल्या आहेत. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी हे सौदी अरेबियाच्या दौ-यावर असतानाच पाकिस्तानी भिका-यांचा प्रश्न चर्चेत आला. यामुळे आपल्या देशाची प्रतिमा खराब होत असल्याचे मोहसीन यांनी सांगितले. मात्र एवढ्या मोठ्या संख्येनं पाकिस्तानी दुस-या देशात भिक मागण्यासाठी का जातात, याचे स्पष्टीकरण त्यांना या चर्चेच्यावेळी देता आले नाही. (Pakistani Beggars)
पाकिस्तानात वाढत असलेली बेरोजगारी आणि कमजोर शिक्षण व्यवस्था हे त्यांचे मूळ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच पाकिस्तानी जनतेसमोर भिक मागण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही. पाकिस्तानी आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयानं केलेल्या पाहणीनुसार अन्य देशात पकडले गेलेले 90 टक्के भिकारी पाकिस्तानचे असतात. पाकिस्तानात भिका-यांच्या मोठ्या टोळ्या असून या टोळ्यांमधील वर्चस्वाची लढाईही रक्तरंजीत झाल्याचे किस्से ऐकीवात आहेत. पाकिस्तानी भिकारी उमराहच्या नावाखाली आखाती देशांमध्ये जातात. त्यांनी सौदी अरेबिया आणि यूएईसारख्या श्रीमंत देशांमध्ये तळ उभारले आहेत. या भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे यूएई सरकारही हैराण झाले आहे. एका बातमीनुसार यूएई सरकार सध्या पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यास टाळत आहे. त्यामागे हेच प्रमुख कारण आहे. दुबईमध्येही पाकिस्तानी भिका-यांचा प्रश्न मोठा आहे. (Pakistani Beggars)
======
हे देखील वाचा : पाकिस्तान आणि पाकिस्तानची गाढवं !
======
त्यामुळे या वर्षी मार्चमध्ये रमजान महिन्यात दुबई प्रशासनाने या भिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू केली होती. या काळात 200 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली. ते सर्व पाकिस्तानी होतेच, शिवाय त्यात महिलांची संख्या अधिक होती. गेल्याच महिन्यात अशी एक भिका-यांची टोळी कराची विमानतळावर पकडण्यात आली. ही टोळी सौदी अरेबियाला भिक मागण्यासाठी जात होती. गेल्यावर्षीतर लाहोर विमानतळावर विमानात बसलेल्या 16 पाकिस्तानी नागरिकांना उतरवण्यात आले. हा किस्सा बराच गाजला होता. हे सर्व भिक मागण्यासाठी युएईला जात होते. अशा नागरिकांमुळे पाकिस्तानची नाचक्की होत असल्याचे पाकिस्तानी मंत्रायलय सांगत असले तरी पाकिस्तानात उपलब्ध नसलेल्या रोजगाराच्या संधी आणि अन्य देशात मानाची नोकरी मिळवण्यासाठी नसलेली शैक्षणिक पात्रता हे या समस्येचे मूळ कारण आहे. (Pakistani Beggars)
सई बने