Home » राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

by Correspondent
0 comment
Share

ब्रॅण्ड ठाकरे’वरून राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या टीकाटिप्पणी सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे राज यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक विनंती केली आहे.

राज यांनी आपल्या पत्रातून सरकारी अनास्थेवर प्रहार केला आहे. करोना काळात सेवा बजावताना मृत्यू झालेल्या खासगी डॉक्टरांना राज्य सरकारकडून नाकारण्यत येत असल्याचं राज यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे. ‘करोना काळात खासगी दवाखाने, रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅब्स अजिबात बंद ठेवू नये. सर्वांनी रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज राहावं, असे आदेश सरकारनं दिले होते.

त्यानुसार, खासगी सेवेतील बहुसंख्य डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी व्यावसायिक बांधिलकी लक्षात घेऊन रुग्णांची सेवा सुरू ठेवली. करोना काळात सेवा बजावताना कुठल्याही वैद्यकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांचं विमा कवच दिलं जाईल, असंही सरकारनं सांगितलं होतं. मात्र, आता खासगी सेवेतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला विम्याचा लाभ नाकारला जात आहे. केंद्र सरकारच्या योजनेनुसार हे विमा कवच उपलब्ध असेल तर राज्य सरकार कोणत्या न्यायानं ते नाकारत आहे? ह्याला असंवेदनशीलता नाही तर काय म्हणायचं? सरकार डॉक्टर्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार पण स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल?,’ असा प्रश्न राज यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

‘मुख्यमंत्र्यांनी ह्या विषयांत तात्काळ लक्ष घालावे आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन खासगी व सरकारी दोन्ही सेवेतील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे विमा दाव्याच्या अर्जावर तात्काळ कार्यवाही करावी, अशी विनंती राज यांनी केली आहे. ‘आपण डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांना योग्य न्याय द्याल, अशी आशाही राज यांनी पत्राच्या शेवटी व्यक्त केली आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.