Home » या लोकप्रिय राजकीय नेत्यांचा झाला होता अपघाती मृत्यू 

या लोकप्रिय राजकीय नेत्यांचा झाला होता अपघाती मृत्यू 

by Team Gajawaja
0 comment
Politicians Died in an Accident
Share

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनाला आता काही दिवस होऊन गेले आहेत. मात्र अजूनही विनायक मेटेंसारखा नेता आपण रस्ता अपघातात गमवला आहे, हा धक्का पचवता आलेला नाही. पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली इथल्या बोगद्याजवळ झालेल्या या अपघातात मेटे गंभीररित्या जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. सकाळी वृत्तवाहिन्यांवर हे वृत्त आलं आणि तमाम महाराष्ट्र हादरला. याबरोबरच अपघातात अकाली निधन झालेल्या राजकीय नेत्यांची आठवण झाली. (Politicians Died in an Accident)

 गोपीनाथ मुंडे

ही चर्चा सुरु झाली की, प्रथम आठवण येते ती गोपीनाथ मुंडे या दिलदार नेत्याची. भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे हे तमाम महाराष्ट्राच्या गळ्यातले ताईत. अभ्यासू आणि तडफदार भाषणं ही मुंडे साहेबांची ओळख.  कोणताही कार्यकर्ता त्यांच्याकडे थेट पोहचू शकत होता. पक्ष बघून त्यांनी कधी काम केलं नाही, म्हणूनच सर्व पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना गोपीनाथ मुंडे आपलेसे वाटायचे.  

3 जून 2014 रोजी गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी आली आणि सर्वांनाच धक्का बसला. त्यावेळी ते दिल्ली विमानतळावर जात होते. अपघात झाला तेव्हा त्यांना जोरदार धक्का बसला, आणि हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले. 26 मे 2014 रोजी मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर पहिल्यांदाच ते बीड येथे त्यांच्या मतदार संघात जाणार होते. तिथे त्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजीत केला होता. त्या समारंभाला येतानाच मुंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली. 

दुरजी खांडू

अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री दुरजी खांडू यांचा झालेला अपघाती मृत्यू असाच चटका लावून गेला.  हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेल्या दुरजी खांडू यांचा मृतदेह पाच दिवसानंतर मिळाला. 4 मे 2014 रोजी पाच दिवस बेपत्ता असलेल्या दुरजी खांडू यांचा मृतदेह चीन सीमेजवळील लुगुथांग येथे मिळाला.  मुख्यमंत्री दुरजी खांडू तवांग ते इटानगरच्या दौऱ्यावर होते. त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. खांडू हे दोनवेळा मुख्यमंत्री म्हणून बिनविरोध निवडून आले होते.  

येदुगुरी संदिंती राजशेखर रेड्डी

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, येदुगुरी संदिंती राजशेखर रेड्डी यांचेही हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.   वायएसआर म्हणून त्यांची ओळख होती. 2 सप्टेंबर 2009 रोजी वायएसआर यांचे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले. हेलिकॉप्टर कुठेतरी सुरक्षित असेल अशी खात्री वायएसआर यांच्या कार्यकर्त्यांना वाटत होती. मात्र अपघाताची बातमी आल्यावर कार्यकर्त्यांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. खराब हवामान हे त्या अपघातातील प्रमुख कारण ठरले.  वायएसआरही दोनवेळा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री होते.  (Politicians Died in an Accident)

साहिब सिंग वर्मा 

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचा जयपूर-दिल्ली महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. साहिब सिंग वर्मा यांचा जयपूर दिल्ली महामार्गावरील जोनईचा खुर्द, शहाजहांपूरजवळ अपघात झाला. 30 जून 2007 रोजी त्यांची कार एका गाडीला धडकली. यात त्याचा मृत्यू झाला. साहिब सिंग वर्मा यांनी भारतीय जनता पक्षाचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणूनही काम केले होते. (Politicians Died in an Accident)

संजय गांधी

अपघाती मृत्यू झालेल्या राजकीय नेत्यांमध्ये नेहमी एका नावाचा प्रामुख्याने उल्लेख होतो ते नाव म्हणजे संजय गांधी. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र, संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र या अपघाताबाबत अनेकांनी शंका निर्माण केली. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप अनेकवेळा करण्यात आला. 23 जून 1980 रोजी नवी दिल्लीतील सफदरजंग विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात संजय गांधी यांचा मृत्यू झाला. वैमानिक असलेल्या संजय गांधी यांच्यासोबत तेव्हा कॅप्टन सुभाष सक्सेना यांचाही अपघातात मृत्यू झाला. (Politicians Died in an Accident)

माधव राव सिंधिया, ओपी जिंदाल,  जीएमसी बालयोगी या नेत्यांचाही असाच विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसंच, काँग्रेसचे युवा नेते मानले जाणारे राजेश पायलट यांचाही रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. (Politicians Died in an Accident)

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.