हिंदू धर्मात सृष्टीचा निर्माता म्हणून ब्रह्मदेवाला पुजले जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवांमुळे सृष्टीचे कार्य चालते. त्यापैकी विष्णू आणि शिवशंकराची शेकडो मंदिरे देशाच्या कानाकोपऱ्यात आढळतात. परदेशातही काही ठिकाणी विष्णू आणि शिवशंकराची मंदिरे आहेत. मात्र ज्याचा सृष्टीचा निर्माता म्हणून गौरव होतो त्या ब्रह्मदेवाचे मंदिर मात्र दिसत नाही.
या सृष्टी निर्मात्याचं अवघं एकच मंदिर असून ते राजस्थानमधील पुष्करमध्ये आहे (Brahma temple in india). सरस्वतीदेवींचा शाप मिळाल्याने ब्रह्मदेवाची पूजा फक्त या एकमात्र मंदिरात करण्यात येते. समस्त सृष्टीच्या निर्मात्याला बसलेल्या या शापाची कथा पुष्करच्या मेळ्यात भाविकांना ऐकवण्यात येते. विशेष म्हणजे विवाहित पुरुषांना या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळत नाही.
राजस्थानमधील पुष्करमध्ये अनेक मंदिरे आहेत. त्यातील सर्वात लोकप्रिय मंदिर म्हणजे ब्रह्मदेवाचे मंदिर. जगभरातील भाविक या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या चरणी लीन होण्यासाठी येतात. याचे मुख्य कारण म्हणजे, हे ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर आहे (Only Brahma temple in india). या मंदिराबद्दल एक पौराणिक कथा सांगण्यात येते.
ब्रह्मदेवांन वज्रनाभ नावाच्या राक्षसाने त्रस्त केले होते. त्याच्यापासून होणाऱ्या त्रासामुळे ब्रह्मदेव यज्ञ करण्यासाठी शांत ठिकाण शोधत होते. यात त्यांच्या हातातील कमळाच्या तीन पाकळ्या पृथ्वीवर पडल्या. त्या पाकळ्यांचे तीन तलाव झाले. या तलावांना ब्रह्म पुष्कर, शिव पुष्कर आणि विष्णू पुष्कर असे मानले जाते. याच ठिकाणी ब्रह्मदेवांनी यज्ञ करण्याचे ठरवले.
ब्रह्मदेव या यज्ञासाठी पुष्कर येथे वेळेवर पोहोचले. मात्र त्यांची पत्नी देवी सरस्वती वेळेवर पोहोचू शकल्या नाहीत. यज्ञाच्या मुहुर्ताची वेळ साधण्यासाठी त्यांनी देवी गायत्रीसोबत विवाह केला आणि यज्ञ करण्यास बसले. मात्र तेवढ्यात देवी सरस्वती तिथे हजर झाल्या.
आपल्या पतीसोबत दुसरी पत्नी बघून त्या क्रोधित झाल्या. सृष्टीचे निर्माते आणि त्रिदेवांमध्ये प्रमुख असूनही तुमची पूजा होणार नाही, असा शापच त्यांनी ब्रह्मदेवांना दिला. मात्र त्यांचा राग शांत झाल्यावर पृथ्वीवर केवळ पुष्कर येथेच ब्रह्मदेवाची पूजा होईल. अन्य मंदिरात पुजा झाल्यास त्याचा नाश होईल असा उशाप दिला. पर्यांयानी ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर पुष्करला झाले. (Only Brahma temple in india)
या यज्ञाच्या ठिकाणी भगवान विष्णूही हजर होते. विष्णूंनी ब्रह्मदेवांना दुसरे लग्न करण्यापासून रोखले नाही, म्हणून देवी सरस्वती विष्णूवरही नाराज झाल्या आणि त्यांना पत्नी विरह सहन करावा लागेल, असा शाप दिला. त्यामळेच विष्णूंचा सातवा अवतार असलेल्या श्रीरामांना पत्नी सीतेचा विरह सहन करावा लागला, असे मानण्यात येते.
पुष्करमधील या मंदिराला दोन हजार वर्षाचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. ऋषी विश्वामित्रांनी मंदिराची निर्मिती केल्याची माहिती आहे. त्यानंतर प्रस्थापित राजांनी अनेकवेळा या मंदिराचा जिर्णोद्धार केला.
ब्रह्मा मंदिराच्या समोरच पुष्कर तलाव आहे. या तलावात स्नान करुन मंदिरात पुजा केली जाते. यामुळे आध्यात्मिक शांतीचा अनुभव येतो, असे भक्त सांगतात. मंदिरापर्यंत पोचण्यासाठी संगमरवरी पायऱ्या आहेत. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ब्रह्मदेवांचे वाहन असलेल्या मोराची मूर्ती आहे.
मंदिराच्या आतील भागात भव्य असा मंडप असून गर्भगृहात ब्रह्मदेवांची मुर्ती आहे. या मुर्तीला चौमुर्ती संबोधण्यात येते. ब्रह्मदेवाच्या बाजुला त्यांच्या दोन्ही पत्नी देवी सरस्वती आणि देवी गायत्री यांच्याही मुर्तीही आहेत. मंदिरात सर्वत्र पांढऱ्या शुभ्र रंगाचे संगमरवर असून त्यावर हजारो भक्तांनी चांदीचे शिक्के लावले आहेत.
मंदिराच्या भिंती देवी सरस्वती आणि मोराच्या चित्रांनी सजवलेल्या आहेत. याच मंदिराच्या आत एक चांदीने मढलेला दरवाजा असून तिथून शिवशंकराच्या मंदिरात जाता येते. या मंदिरातील सर्वात वैशिष्टपूर्ण गोष्ट म्हणजे येथे गर्भगृहात विवाहीत पुरुषांना प्रवेश मिळत नाही.
कार्तिक पौर्णिमेला या मंदिरात होणार उत्सव जगभर ओळखला जातो. पाच दिवसांत होणाऱ्या या उत्सवासाठी लाखो भाविक येतात. या पुष्कर मेळ्याला पर्यटनाचा महोत्सव म्हणूनही ओळख मिळाली आहे. या दिवसात ब्रह्मदेव आणि देवी सरस्वतींच्या चरणी लीन होण्यासाठी प्रत्यक्ष देवही येतात, अशीही धारणा असल्यामुळे भाविक कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवाला गर्दी करतात.
या दिवसांत ब्रह्मा मंदिराच्या परिसरातील अन्य पर्यटन स्थळंही गजबजलेली असतात. त्यापैकी प्रमुख म्हणजे पुष्कर तलाव. या तलावात स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झालेली असते.
=====
हे ही वाचा: हिंदुराष्ट्र: जगातील ‘या’ १० देशात आहेत सर्वाधिक हिंदू; पाच नंबरचा देश तर हिंदूंचं करतोय धर्मांतर
=====
येथील वराह मंदिरालाही प्राचीन इतिहास आहे. भगवान विष्णूचा तिसरा अवतार म्हणजे वराह. त्यामुळे येथे विष्णू भक्तांचा मेळा असतो. सरस्वतीं देवीचे स्वतंत्र मंदिर ब्रह्मामंदिरासमोरील डोंगरावर आहे. उंच डोंगरावर असलेल्या या मंदिरात देवी सरस्वतींसोबतच गायत्री देवीचीही मुर्ती आहे. ब्रह्मदेवाची पूजा या देवी सरस्वतींच्या मंदिरात आल्याशिवाय पूर्ण होत नाही अशी धारणा आहे. त्यामुळे ब्रह्मामंदिरात दर्शन घेतल्यावर सर्व भाविक देवी सरस्वतींच्या मंदिरात पूजा करण्यासाठी येतात.
पुष्करमधील आत्मेश्वर मंदिरही प्रसिद्ध आहे. या मंदिरातील शिवलिंग जमिनीपासून काही फूट खाली असून त्यावर तांब्याचा नाग बसवलेला आहे. पुष्करमधील रोज गार्डनही असेच पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे. राजस्थानसारख्या भागात गुलाबांचे हजारो प्रकार पहायला मिळणंच आर्श्चयकारक मानले जाते. याशिवाय मोती महल, रंगजी मंदिर, जैन मंदिर ही सर्व स्थानेही ब्रह्मामंदिराच्या आसपास येतात. (Brahma temple in india)
हे ही वाचा: ‘या’ कारणामुळे पशुपतिनाथ मंदिराचे दर्शन केल्याशिवाय केदारनाथाची यात्रा पूर्ण होत नाही
नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या पुष्कर मेळ्यामध्ये उंटाच्या स्पर्धा घेण्यात येतात. शिवाय स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम होतात. एकूण ब्रह्मामंदिरात येणाऱ्या भाविकांना या मंदिरासोबत अन्य पुरातन मंदिरालाही भेटी देता येतात. राजस्थानची राजधानी जयपूरपासून अवघ्या दिडशे किलोमिटर अंतरावर पुष्कर आहे. पुष्कर तलावाच्या आसपास पाचशेहून अधिक मंदिर असून त्यात ब्रह्मामंदिर सर्वात पुरातन मानले जाते.सृष्टी निर्मात्याच्या या एकमेव मंदिरात त्यामुळेच वर्षाचे बाराही महिने भक्तांची गर्दी असते.
– सई बने