आयपीएलमधील हैद्राबाद आणि बंगळूरू (SRH vs RCB) यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात विराट कोहलीचे झंझावाती शतक आणि कर्णधार फाफ डू प्लेसीच्या उत्तम फलंदाजीच्या जोरावर बंगळूरूने हैद्राबादवर ८ गड्यांनी मात करत अत्यंत महत्वाच्या सामन्यात विजय मिळवला. आपल्या खिशात दोन गुण घालत त्यांनी गुणतालिकेत चौथ्या स्थानावर उडी घेतली. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यातील मिळवलेल्या या विजयामुळे त्यांनी त्यांचे प्लेऑफ साठीचे आव्हान कायम ठेवले आहे. हैद्रबादच्या याअगोदरच प्लेऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
प्रथम फलंदाजी करतांना हेन्री क्लासेनच्या जबरदस्त शतकाच्या बळावर हैद्राबादने १८६ धावांपर्यंत मजल मारली. हैद्राबादचे सलामीवीर आणि कर्णधार लवकरच माघारी परतल्यानंतर क्लासेनने सर्व सूत्र आपल्या हातात घेत जबरदस्त फटकेबाजी केली. केवळ ५१ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने त्याने १०४ धावा ठोकल्या. हरी ब्रूकने १९ चेंडूत २७ धावा करत त्याला योग्य साथ दिली. या दोघांव्यतिरिक्त हैद्राबादच्या इतर फलंदाजांना काही फारशी चमक दाखवता आली नाही.(SRH vs RCB)

बंगळूरूच्या गोलंदाजांनी चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले. मोहम्मद सिराजने टिच्चून मारा करत हैद्राबादच्या फलंदाजांना बांधून ठेवण्याचे काम केले. चार षटकात अवघ्या १७ धावा देत त्याने ग्लेन फिलीपचा महत्वपूर्ण बळी मिळवला. मायकल ब्रेसवेलने अप्रतिम गोलंदाजी करत १३ धावांच्या मोबदल्यात २ बळी मिळवले. शाहबाज अहमद आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत त्यांना योग्य साथ दिली.(SRH vs RCB)
हैद्राबादने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करायला उतरलेल्या बंगळूरूच्या सलामीवीरांनी संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसीस यांनी पहिल्या गड्यासाठी १७२ धावांची विक्रमी भागीदारी करत संघाला विजयाच्या चौकटीवर आणून ठेवले. विराट कोहलीने ६३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. षटकार मारून शतक पूर्ण करणारा विराट मात्र पुढच्याच चेंडूवर बाद झाला. आयपीएल कारकिर्दीतील विराटचे हे सहावे शतक ठरले. ख्रिस गेलच्या शतकांच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. कर्णधार डू प्लेसीने त्याला योग्य साथ देत ४७ चेंडूत ७१ धावा ठोकल्या. दोघे बाद झाल्यानंतर विजयाची फक्त औपचारिकता बाकी होती.(SRH vs RCB)
=====
हे देखील वाचा : दिल्लीची पंजाबवर सरशी
=====
हैद्राबादचे गोलंदाज बंगळूरूच्या फलंदाजांना रोखण्यात पुरते अपयशी ठरले. गोलंदाजांचे आव्हान परतवत बंगळूरूच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन हेच गोलंदाज प्रत्येक एका फलंदाजाला माघारी पाठवत हैद्राबादकडून बळी मिळवण्यात यशस्वी ठरले. हैद्राबादच्या गोलंदाजांना बळी मिळवण्यात अपयश आल्याने बंगळूरूने सहज लक्ष गाठले.(SRH vs RCB)
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही डावात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी शतक झळकावण्याचा पराक्रम केला. कोहलीच्या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा किताब देवून गौरवण्यात आले. बंगळूरूने मिळवलेल्या या विजयामुळे त्यांच्या प्लेऑफच्या आशा कायम आहेत. १३ सामन्यातील ७ विजयांसह १४ गुण मिळवत ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत.