चीनमध्ये १९७० च्या दशकात देशाची लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी एक मूल धोरण लागू करण्यात आले होते. या धोरणाचे चीनवर मोठे सामाजिक परिणाम झाले. एक मूल म्हणजे तो मुलगाच हवा अशी भावना चीनमध्ये वाढीस लागली. यामुळे चीनमधील लोकसंख्येमध्ये असंतुलन वाढले. यामुळे अनेक सामाजिक परिणामांना चीनला आता सामोरे जावे लागत आहे. जवळपास ३८ वर्षानंतर चीनमध्ये एक मूल धोरण मागे घेण्यात आले. पण आता चीन हा सर्वाधिक वृद्ध असलेला देश होत आहे. त्यातही या देशात मुलींचे प्रमाण फार कमी आहेत. चीनमधील अनेक तरुणांना लग्न करण्यासाठी योग्य वधू मिळत नाही. त्यामुळे या देशात आता अन्य देशातील तरुणी मानवी तस्करीच्या मार्गानं आणल्या जात आहेत.
यात नेपाळमधील तरुणींची संख्या सर्वाधिक आहे. नेपाळमधील तरुणींना चीनमध्ये लग्न करण्यासाठी आणले जाते. तिथे त्यांचे शारीरिक शोषण केले जाते. या तरुणींना मूल झाल्यावर त्यांना देह विक्री करण्यास भाग पाडले जात असल्याचे भयाण वास्तव आता जगासमोर आले आहे. चीनमध्ये लोकसंख्या वाढवण्यासाठी हरत-हेने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातील हा अतिशय क्रूर प्रकार आहे. ज्या नेपाळी तरुणींना लग्नाच्या नावाखाली चीनमध्ये नेले जाते, त्यांची विक्री होत आहे. यासाठी नेपाळ आणि चीनमध्ये टोळ्या सक्रीय आहेत. मानवी तस्करी करणा-या या टोळ्यांबाबत नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यात नेपाळमधील तरुणींची चीनमध्ये कशापद्धतीनं फसवणूक करण्यात येते, याची माहितीही देण्यात आली आहे. (Chinese men & Nepalese Women)
नेपाळी तरुणींसाठी चीननं आपले द्वार खुले केले आहे. अलिकडे बहुसंख्य नेपाळी तरुणींना नोकरीच्या किंवा लग्नाच्या अमिषानं चीनला नेण्यात येत आहे. यासाठी या नेपाळी तरुणींन श्रीमंतीचे दाखले देण्यात येतात. लग्नानंतर सुखाचे आयुष्य, मोठे घर, संपत्ती याची लालूच दाखवण्यात येते. प्रत्यक्षात या मुली चीनमध्ये गेल्यावर त्यांची फसवणूक होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या तरुणींवर मूल जन्माला घालण्याची जबरदस्ती करण्यात येते. एकदा मूल झाल्यावर या तरुणींना मूल चीनमध्येच सोडून नेपाळला नेण्यात येते किंवा या तरुणींना देहविक्री करण्यास भाग पाडण्यात येत आहे. अशासाठी अनेक चिनी एजंट नेपाळमध्ये सक्रीय आहेत. लग्नाच्या नावाखाली हे नेपाळी तरुणींना विकत घेत असून त्यांना चिनमध्ये गेल्यावर गलिच्छ धंदा करण्यासाठी जबरदस्ती करत आहेत.
यासंदर्भात मीडिया आउटलेट डीएमएन न्यूजने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्याच या चीनी दलालांचे वास्तव सांगण्यात आले आहे. नेपाळमध्ये चिनी दलालांची एक मोठी टोळी कार्यरत असल्याचे यात सांगण्यात आले आहे. हे दलाल लग्नाच्या बहाण्यांनं नेपाळी तरुणींना चीनमध्ये घेऊन जातात. त्यांना चीनी नागरिकत्व आणि अन्य सुविधांचे लालूच दाखवण्यात येते. मात्र प्रत्यक्षात त्यांची विक्री करण्यात आलेली असते. त्यांचे शारीरिक आणि लैंगिक शोषण करण्यात येते. यातील काही तरुणींनी बिजींगमधील नेपाळ दूतावासामध्ये संपर्क केल्यावर त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर या सर्व मानवी तस्करी रॅकेटचा खुलासा झाला आहे. या नेपाळी तरुणींची चीनमध्ये १ लाखे ते १० लाखापर्यंत विक्री करण्यात आलेली होती. यामध्ये नेपाळच्या ग्रामिण भागातील तरुणींचे प्रमाण जास्त आहे. (Chinese men & Nepalese Women)
====================
हे देखील वाचा : अधिक मांजर आणि कुत्रा पाळणारा देश !
====================
यासंदर्भात जाहीर झालेल्या अहवालात या सर्वांमागे चीनमधील एक मूल धोरण कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. आता चीनमधील लोकसंख्येमध्ये प्रचंड प्रमाणात तफावत आहे. मुलींचे प्रमाण हे मुलांच्या तुलनेत अल्प आहे. त्यामुळे चीनमधील तरुणांचे लग्नाचे वयही ३४ च्या पुढे गेले आहे. नेपाळ पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी ब्युरोच्या म्हणण्यानुसार, “वधू खरेदी” या प्रथेनुसार चीनमध्ये नेपाळी तरुणींची सहजपणे विक्री करण्यात येते. २०१५ पासून अशा वधू खरेदी घटना वाढीस लागल्या.
सुरुवातीला चीनमध्ये दक्षिण कोरिया, कंबोडिया आणि व्हिएतनाममधून बहुसंख्य महिलांची तस्करी होत असे. मात्र आता त्या देशांमधील नियम हे कडक झाल्यानं, चीनमधील दलाल नेपाळ मधील तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. चिंताजनक गोष्ट म्हणजे, अलिकडे काही घटनांमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील तरुणींचीही सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे चीनमधील या मानवी तस्करीला वेळीच आळा घालावा अशी मागणी करण्यात येत आहे. (Chinese men & Nepalese Women)
सई बने