मध्य प्रदेशातील नौरादेही व्याघ्र प्रकल्प सध्या चर्चेत आहे. नौरादेही व्याघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. सागर, दमोह आणि नरसिंहपूर या तीन जिल्ह्यांमध्ये या व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार झाला आहे. हा प्रकल्प भारतीय राखाडी लांडग्यासाठी एक प्रमुख अधिवास मानला जातो. याव्यतिरिक्त, पँथर, जंगली कुत्रे, कोल्हे, राखाडी कोल्हे आणि सामान्य ओटरसारखे मांसाहारी प्राणी देखील येथे मोठ्या संख्येनं आढळतात. याच नौरादेही व्याघ्र प्रकल्पातून राष्ट्रीय महामार्ग-४५ जातो. ब-याचवेळा या मार्गावर रात्री एखाद्या प्राण्याला वाहनाची धडक लागण्याच्या घटना होत असे. आता अशाप्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग-४५ हा भारतातील पहिला वन्यजीवांसाठी सुरक्षित महामार्ग बनवण्यात आला आहे. या रस्त्यावर ५ मिमी जाडीच्या लाल टेबलटॉप ब्लॉक्स लावण्यात आले असून यातून रस्ते अपघात रोखण्यास आणि वन्यजीवांनाही सुरक्षता मिळणार आहे. ( Nauradehi Tiger Reserve )

Nauradehi Tiger Reserve
मध्यप्रदेशमधील नौरादेही व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात. याच प्रकल्पाला वीरांगना राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्प असेही म्हटले जाते. हा मध्य प्रदेशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प असून त्याचे एकूण क्षेत्रफळ २,३३९ चौरस किलोमीटर आहे. त्यात १,४१४ चौरस किलोमीटरचा कोर क्षेत्र आणि ९२२ चौरस किलोमीटरचा बफर क्षेत्र समाविष्ट आहे. भारतीय लांडगा, पँथर, जंगली कुत्रा, कोल्हा, राखाडी कोल्हा आणि ओटर यासारख्या अनेक दुर्मिळ वन्यजीव प्रजातींसाठी हा प्रकल्प ओळखला जातो. २०१८ मध्ये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रकल्पात या नौरादेही प्रकल्पाचा समावेश करण्यात आला असून त्यातील वाघांची संख्या आता २६ वर आहे.
हा नौरादेही प्रकल्प आहे, त्या घनदाट जंगलांमधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ४५, सध्या लाल रंगाच्या चौकोनांनी अधिक रेखीव झाला आहे. भारतातील पहिला वन्यजीव-सुरक्षित महामार्ग म्हणून या महामार्गाचा आता उल्लेख होत आहे. या महामार्गाच्या बांधकामात एका अनोख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या रस्त्यावर ५ मिमी जाडीच्या लाल टेबल-टॉप ब्लॉक मार्किंग्ज लावण्यात आल्या आहेत. या तंत्रज्ञानाचा उद्देश केवळ चालकांचा वेग कमी करणे नाही तर वन क्षेत्रात राहणाऱ्या वन्यजीवांची सुरक्षितता सुनिश्चित करणे देखील आहे. नौरादेही व्याघ्र प्रकल्पातून सुमारे ११.९६ किलोमीटरचा भाग दोन आणि चार लेनमध्ये विकसित करण्यात आला आहे. यावर २ किलोमीटर लांबीच्या संवेदनशील वन्यजीव क्षेत्रात हे लाल टेबल-टॉप मार्किंग्ज बसवण्यात आले आहेत. जेव्हा एखादे वाहन या लाल ब्लॉकवरून जाते तेव्हा चालकाला थोडासा धक्का बसतो, ज्यामुळे तो वेग कमी करतो. यामुळे रात्री या रस्त्यावरुन एखादा प्राणी जात असेल तर त्याला गाडीचा धक्का लागण्याची शक्यता कमी होणार आहे. यापूर्वी या रस्त्यावर हरीण आणि नीलगाय यांचा कायम वाहनाच्या धडकेनं मृत्यू झाला आहे. त्यामुळेच या समस्येवर उपाय करण्यासाठी वनअधिकारी अभ्यास करीत होते. परदेशात अशाप्रकारे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, त्याचाच अभ्यास करुन नौरादेही व्याघ्र प्रकल्पातून जाणा-या राष्ट्रीय महामार्ग-४५ वर लाल चौकोन लावण्यात आले आहेत. रात्री हे विशिष्ट स्टिकर चमकणार असून त्यामुळे यारुन जाणारे प्राणीही सावध होणार आहेत. ( Nauradehi Tiger Reserve )
=======
हे देखील वाचा : Champawat Tiger : नेपाळपासून भारतापर्यंत दहशत तिने अख्खं गाव खाल्लं…
=======
जगभरातील अनेक देशांमध्ये अशाप्रकारचे उपाय वन्यजीवांना वाचवण्यासाठी करण्यात येत आहेत. कॅनडा, अमेरिका आणि काही आफ्रिकन देशांनी वन्यजीव क्रॉसिंग तयार केले आहेत. ज्यात ओव्हरपास, अंडरपास आणि कॉरिडॉर यांचा समावेश आहे. कॅनडामधील बॅन्फ नॅशनल पार्क आणि अमेरिकेतील मोंटाना येथे असंख्य पूल आणि अंडरपास करण्यात आले आहेत. बॅन्फ नॅशनल पार्कमधील ट्रान्स-कॅनडा हायवेवर अस्वल, हरण आणि लांडग्यांसाठी वनस्पतियुक्त ओव्हरपास बांधण्यात आले आहेत. मोंटाना, फ्लोरिडा आणि कॅलिफोर्निया या अमेरिकेमधील राज्यांमध्ये वन्यजीवांसाठी हजारो ओव्हरपास आणि अंडरपास बांधण्यात आले आहेत. भारतातही ऋषिकेश-झिलवाला रोडवर वन्यजीव अंडरपास बांधले जात आहेत. मंडई वन्यजीव पूल हा सेंट्रल कॅचमेंट नेचर रिझर्व्हला जाणारा जंगली पूल आहे. तर भूतानमध्ये आशियायी हत्तींसाठी अंडरपास बांधण्यात आले आहेत. या सर्वात वन्यजीवांसाठी महागार्गवर सुरक्षित उपाय करणे हे भारतात प्रथमच करण्यात आले आहे. ( Nauradehi Tiger Reserve )
नौरादेही वन्यजीव अभयारण्य हे मध्य प्रदेशातील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य पन्ना आणि सातपुरा व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा मार्ग म्हणून काम करते. हे ठिकाण वाघ, बिबट्या, लांडगे आणि विविध पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे आता चित्ताही संरक्षित कऱण्यात येणार आहे.
सई बने
