पदाची शपथ घेण्यापूर्वीपासूनच निरनिराळ्या वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. “धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे. मी तो स्वीकारला आहे आणि पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यांना पदमुक्त केले आहे,” अशी औपचारिक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांच्या मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या कारकिर्दीतील हे सर्वात मोठे राजकीय संकट होय. (Dhananjay Munde)
डिसेंबर महिन्यात बीडमधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती. आरोपींनी क्रौर्याच्या सगळ्या सीमा ओलांडल्या. या घटनेमागे धनंजय मुंडे यांचा उजवा हात समजला जाणारा वाल्मिक कराड हाच असल्याचा आरोप पहिल्या दिवसापासून होत होता. भाजपा आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही त्यात उडी घेतली होती. हे दोघेही दररोज निरनिराळे पुरावे समोर आणत होते. या सर्वांमुळे मुंडे यांची गच्छंती अटळ आहे, हे अनेक दिवसांपासून स्पष्ट होते. विशेष म्हणजे मुंडे हे मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांच्याही मर्जीतील मानले जात होते. त्यामुळे त्यांनाही या संदर्भात वारंवार प्रश्न विचारले जात होते. हे दोघेही एकमेकांकडे बोट दाखवून वेळ काढत होते. (Political News)
दुसरीकडे या प्रकरणी तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती. शनिवारी सीआयडीने 1800 पानी आरोपपत्र दाखल केले. वाल्मिक कराड हाच या हत्येचा मुख्य मास्टरमाइंड असल्यावर या आरोपपत्राने शिक्कामोर्तब केले. या सर्वांवर कडी झाली ती म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. या हत्येची निर्घृणता आणि दुष्टता या फोटो आणि व्हिडिओंमधून स्पष्ट होते. शिवाय आरोपींचे चेहरे स्पष्ट पाहायला मिळतात. देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे 8 फोटो आणि 15 व्हिडीओ समोर आले आहेत. (Dhananjay Munde)
आधीच देशमुख यांच्या हत्येनंतर मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक झाले होते. त्यातच या व्हायरल फोटोंमुळे परत राज्यात संतापाची लाट उसळणे स्वाभाविक होते. शिवाय विधिमंडळाचे अधिवेशनसुद्धा सुरू होत होते. त्यामुळे विरोधक मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले होते. या परिस्थितीत त्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढला होता. फडणवीस आणि पवार यांना मुंडे यांची पाठराखण करणे अशक्य झाले होते. (Political News)
===============
हे देखील वाचा : Taliban : तालिबानने बामियानमधील बुद्धमूर्ती नष्ट का केल्या?
===============
मुंडे यांनी सोमवारी फडणवीस यांची भेट घेऊन आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले. आपले पद वाचवायचा त्यांचा हा शेवटचा प्रयत्न असावा. मात्र त्याच वेळेस कदाचित फडणवीस यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले असावे. मुख्यमंत्री फडणवीस स्वतः रात्री उशिरा थेट ‘देवगिरी’वर दाखल झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली. तेव्हाच राजीनामा अटळ असल्याचे स्पष्ट झाले होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंडे राजीनामा देतील, असा दावा त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केला होता. परंतु तसे झाले नाही आणि तो दावा फोल ठरला. त्यानंतर करूणा यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडून राजीनामा लिहून घेण्यात आला असून तो दोन तीन दिवसांत जाहीर केला जाईल, असा नवा दावा केला होता. तो मात्र खरा ठरला. (Political News)
मुंडे यांना गुर्मी होती त्यामुळे हे सर्व प्रकरण घडले, अशी प्रतिक्रिया हे प्रकरण लावून धरणारे आमदार धस यांनी दिली आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकरणाची सुनावणी करावी आणि सर्व आरोपींना तात्काळ फाशी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ते काहीही असले तरी तीन महिन्यांपूर्वी अत्यंत दणदणीत विजय मिळवून सत्तेवर आलेल्या महायुती सरकारला या घटनेने मोठा धक्का बसला आहे. मुंडे यांचा राजीनामा आला असला तरी त्याचे पडसाद येते काही दिवस पडत राहणार, हे नक्की.