तुम्हाला २००८ साली लाँच झालेली सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारी नॅनो कार आठवते का? नॅनो जेव्हा लॉंच झाली तेव्हा त्या गाडीचं क्रेझ वेगळंच होतं. रतन टाटा यांचं स्वप्न होतं की, प्रत्येक भारतीयाच्या खिशाला परवडेल अशी कार असायला पाहिजे. पण काही काळाने नॅनोचा सेल्स कमी झाला, आणि आजकाल क्वचितच रस्त्यावर ती दिसते. पण तुम्हाला माहित आहे का? नॅनो यायच्या तब्बल ६० वर्षांआधी, म्हणजे १९४० च्या दशकात, भारतात पहिली स्वदेशी मिनी कार बनली होती! तिचं नाव होतं ‘मीरा’, जी नंतर ‘मीरा मिनी कार’ म्हणून ओळखली जाऊ लागली. आणखी इंट्रस्टिंग गोष्ट म्हणजे, ही मीरा मिनी कार शंकरराव कुलकर्णी नावाच्या मराठी माणसाने बनवली होती आणि ती गाडी रस्त्यावर धावलीसुद्धा. शंकररावांची इच्छा होती की, भारतातल्या सामान्य माणसासाठी स्वस्त आणि छोटी गाडी बनवायची आणि त्यांनी ती बनवून दाखवली. पण मग अशी काय अडचण आली, की ती कार मार्केटमध्ये लॉंच होऊ शकली नाही आणि ही ‘मीरा मिनी कार’ नेमकी कशी होती? हे जाणून घेऊ..(Meera Mini Car)
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, पश्चिम महाराष्ट्रात औद्योगिक क्रांतीचे वारे हळूहळू वाहू लागले होते. अशातच एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात, इचलकरंजीच्या मातीत, शंकरराव कुलकर्णी यांचा जन्म झाला. पण त्यांचं बालपण फारसं सुखकर नव्हतं. घरची परिस्थिती बेताची होती, आणि शिक्षणाचा खर्च पेलवणं कुटुंबाला अवघड गेलं. त्यामुळे, जिथे इतर मुलं शाळेत शिकत होती, तिथे शंकररावांना वयाच्या आठव्या वर्षी शिक्षणाला राम राम ठोकावा लागला. वयाच्या अवघ्या १६-१७व्या वर्षी, ज्या वयात मुले खेळतात, शाळेत शिकतात त्या वयात शंकरावांनी किर्लोस्करवाडीचा रस्ता धरला. आणि ते किर्लोस्कर समूहात पॅटर्नमेकर म्हणून काम करू लागले. इथे त्यांनी फक्त कामच केलं नाही, तर यंत्रसामग्रीच्या जगातले बारकावे शिकले. सिलेंडरहेड बनवण्याचं तंत्र शिकलं. पाच वर्षं किर्लोस्करमध्ये घालवल्यावर, त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.(Top Stories )
किर्लोस्करमधल्या अनुभवाच्या जोरावर,वयाच्या २१-२२व्या वर्षी त्यांनी स्वतःची कुलको इंजीनीरिंग वर्क्स ही कंपनी सुरू केली. त्यांना यात यश मिळायला लागलं. त्यांचा हा व्यवसाय वाढण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. १९४९ ला ते जर्मनीला गेले असताना त्यांना तिथे ऑटोमोबाइल एक्जीबिशन पाहिलं. तिथे बऱ्याच मोठ मोठ्या कंपनीच्या गाड्या होत्या. त्यांंना तिथल्या कार्स खूप आवडल्या. तिथून ते घरी यायला निघाले, तेव्हा त्यांच्या डोक्यात एकच विचार घोळू लागला. आपल्या देशात स्वदेशी कार बनायला हवी. ते आणि त्यांचे सहकाऱ्यांनी चार सीटर आणि एअर कूलिंग असलेली कार बनवायचं ठरवलं. १९४९ मध्येच त्यांनी कागदावर गाडीचं पहिलं डिझाइन तयार केलं आणि गाडीचा पहिला प्रोटोटाइप तयार केला. गाडी तयार झाली आणि RTO नं गाडीला नंबर दिला – MHK १९०६.(Meera Mini Car)
१९५१ साली त्यांनी दुसरा प्रोटोटाइप बनवला, यावेळी ती तीन सीट्सची होती. यात एक १९ हॉर्स पावरचं एअर-कूल्ड इंजिन होतं, जे १ लिटर पेट्रोलमध्ये २१ किलोमीटरचं मायलेज द्यायचं. इतकंच काय, ती गाडी ९० किमी प्रतितास वेगाने धावायची! आता ही गाडी फक्त स्वस्तच नव्हती, तर टिकाऊ आणि इंधन वाचवणारी पण होती. शंकररावांनी रबर सस्पेंशन वापरलं, ज्यामुळे १०० हून जास्त पार्ट्सची गरजच पडली नाही.गाडीची उंची ६ ते ११ इंचापर्यंत ऍडजस्ट करता यायची. आता पुढचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला, तो म्हणजे गाडीला नाव काय द्यायचं आणि १९६५ मध्ये त्यांना याचं उत्तर मिळालं. त्यांनी त्यांच्या नातीच्या नावावरून गाडीला मीरा असं नाव दिलं. (Meera Mini Car)
१९७० ला शंकररावांनी त्यांचं फायनल मॉडेल तयार केलं. ही गाडी एकदम स्टायलिश होती. तीन दरवाजांची – एक ड्रायव्हरच्या बाजूला आणि दोन दुसऱ्या बाजूला. या गाडीत चार माणसं मस्त बसू शकायची आणि समोर थोडी जागा सामानासाठी होती. १९७५ साली त्यांनी यात वॉटर-कूल्ड V-ट्विन इंजिन टाकलं, जे १४ हॉर्स पॉवरचं होतं. आणि मायलेज तब्बल २१ किलोमीटर प्रति लिटर! आणि किंमत? फक्त १२,००० रुपये! म्हणजे ही गाडी टाटा नॅनोसारखीच बजेटमध्ये होती. (Top Stories )
===============
हे देखील वाचा : Space Mission वर खरंच पैसा बर्बाद होतो ?
===============
आता शंकररावांचं स्वप्न होतं की ही गाडी प्रत्येक भारतीयाच्या घरात पोहोचावी. त्यांनी जयसिंगपूर म्युनिसिपालिटीकडून मोफत जमीन मिळवली, कारखाना उभारायचा प्लॅन केला. ते गाडी घेऊन मुंबईला गेले, गेटवे ऑफ इंडियासमोर प्रदर्शन केलं. त्यांनी खंडाळ्याचा घाट पार करत गाडी चालवली होती आणि इथेच त्यांच्या स्वप्नाला ब्रेक लागला. तेव्हा प्रोब्लम असा झाला की, भारतात ऑटोमोबाइल इंडस्ट्री सरकारच्या ताब्यात होती. शंकररावांनी केंद्र सरकारकडे कारखाना उभारण्यासाठी मदत मागितली, पण सरकारनं नकार दिला. का? कारण १९७५ साली सुझुकी कंपनी भारतात येणार होती आणि सरकारला परदेशी कंपन्यांशी करार करायचे होते. शंकररावांनी तेव्हा तब्बल ५० लाख रुपये खर्च केले होते, पण त्यांना परवानगी मिळाली नाही. त्यात एक्साइज ड्युटी न भरल्यामुळे त्यांच्या पाच गाड्यांना रस्त्यावर चालवण्याची परवानगी मिळाली नाही. यानंतर हळूहळू त्यांचे प्रयत्न थंडावत गेले आणि काही काळातच मीरा मिनी कारचं स्वप्न अर्धवटच राहिलं.(Meera Mini Car)
शंकररावांच्या नातवंडांनी सांगितलं की, मीरा आणि टाटा नॅनोमध्ये जास्त फरक नव्हताच. दोन्ही गाड्यांचा हेतू एकच होता, तो म्हणजे सामान्य माणसापर्यंत गाडी पोहोचावी. शंकररावांनी जे स्वप्न पाहिलं, ते पुढे टाटांनी पूर्ण केलं. पण ‘मीरा मिनी कार’ नंतर कधीच रस्त्यावर धावली नाही. ती फक्त एक प्रोटोटाइप बनून राहिली, पण त्या छोट्या गाडीनं भारताच्या ऑटोमोबाइल इतिहासात एक वेगळीच छाप सोडली.