तीर्थांमध्ये काशी। व्रतांमध्ये एकादशी।
भाषांमध्ये तैशी। मर्हाटी शोभिवंत।।
केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ दिला आहे. मागील अनेक दशकांपासून मराठी जनतेची ही मागणी अखेर पूर्ण झाली आहे. अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे सर्व निकष मराठी भाषेने पूर्ण केले आणि अखेर मराठी भाषा अभिजात झाली. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. याआधी पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठीला हा बहुमान मिळाल्यानंतर मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
सुबोध भावेने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहले आहे, “अभिजात भाषा, मराठी भाषा! केंद्र सरकार आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जे लढले त्या प्रत्येकाला मनापासून वंदन!”
तर अभिनेत्री सायली संजीवने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, “अभिमानास्पद!! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा!!!”
View this post on Instagram
तर गायक, संगीतकार सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले की, “आपण ज्या भाषेत आपल्या भावना व्यक्त करतो, ज्या भाषेत आपण आपले विचार करतो आणि स्वप्न बघतो त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. गेल्या २७ – २८ वर्षात आपण मराठी गाणी आणि कविता ऐकल्या आणि आता अभिजात भाषेच्या दर्ज्यामुळे हा आनंद द्विगुणित झाला आहे. यानिमित्ताने ज्या ज्या ज्येष्ठ लोकांनी आपली भाषा जपली आणि वेचली त्या सर्वांचे आभार. त्यांना सर्वांना वंदन आणि आपल्या मराठीलाही वंदन करतो.”
View this post on Instagram
तर दिग्दर्शक, गीतकार असलेल्या क्षितिज पटवर्धनने त्याच्या सोशल मीडियावर लिहिले, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल. आता आपली मराठी बोलण्याची, वाचण्याची, पाहण्याची, जपण्याची जबाबदारी वाढलीय. फक्त उत्सव नाही जगण्यात मराठी आणूया. फक्त प्रमाण नाही बोलीत मराठी सजवूया.फक्त जुनं नाही नवीन कला, साहित्य घडवूया. फक्त जपणूक नाही मराठी चौफेर वाढवूया.”