श्रीकांत नारायण
महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या मुसळधार वृष्टीमुळे प्रचंड नुकसान तर झालेच शिवाय मोठ्या प्रमाणावर प्राणहानीही झाली. कोंकणात चिपळूण शहरासह अनेक शहरात पुराने थैमान मांडले तर महाडजवळ दरडी कोसळून अनेकांचे बळी गेले. सातारा जिल्हातील पाटण तालुक्यातही काही गावात दरडी कोसळून निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. कोल्हापूर, सांगली शहरांनाही पुराचा जबरदस्त तडाखा बसला आहे. असंख्य लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत.
महाडजवळील तळिये या गावावर ओढवलेले अस्मानी संकट तर फारच भीषण होते. या गावावर दरडी कोसळल्यामुळे पन्नासहून अधिक गावकरी मृत्युमुखी पडले तर अनेकजण बेपत्ता असल्याचे समजते. उध्वस्त घरांचे ढिगारे उपसण्याचे काम पूर्ण होईपर्यंत ती ‘बेपत्ता’ माणसेही कदाचित काळाने हिरावून घेतलेली असतील. तळिये गावची दुर्घटना पाहून काही वर्षांपूर्वी भीमाशंकरजवळील माळीण गावावर कोसळलेल्या अशाच नैसर्गिक संकटाची आठवण झाली. मुसळधार पावसामुळे मध्यरात्री दरड कोसळल्यामुळे माळीण गाव पूर्णपणे उध्वस्त झाले होते. सुमारे चारशे नागरिकांचे त्यामध्ये बळी गेले होते.

‘तळिये’ काय किंवा ‘माळीण’ काय अशा ठिकाणी घडलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या घटना लक्षात घेता लगेचच ‘आपत्ती व्यवस्थापन यंत्रणे’ची आठवण होते आणि तिच्या अस्तित्वाविषयीच शंका निर्माण होते. दरवर्षी पावसाळा येतो आणि कोठे ना कोठे तरी मुसळधार वृष्टी होतेच. मग नद्यांना महापूर, नागरिकांच्या घरात पाणी शिरणे, दरडी कोसळणे अशा कित्येक संकटांना सामोरे जावे लागते. अशा संकटांचे लवकरात लवकर निवारण करणे हेच ‘आपत्ती व्यवस्थापन यंत्रणे’ चे काम असते मात्र आजपर्यंतचा अनुभव असा आहे की, अशा संकटाच्या वेळी ही यंत्रणाच कुचकामी असल्याचा प्रत्यय येतो. त्यामुळे या यंत्रणेचा उपयोग तरी काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
आता तळियेचेच उदाहरण घ्या ना, गुरुवारी दुपारी चार वाजता मुसळधार पावसामुळे या गावावर दरड कोसळली मात्र शुक्रवार दुपारपर्यंत म्हणजे चोवीस तास उलटून गेले तरी प्रशासनातर्फे पाठविली जाणारी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेची टीम तेथे पोहोंचू शकली नव्हती. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात बोलताना, मुसळधार पाऊस आणि खराब रस्ते यामुळे मदत-यंत्रणा तेथे वेळेवर पोहोंचू शकली नाही असे सांगितले आहे.
दुर्घटनेचे वृत्त कळताच ठाणे, डोंबविली, मुंबई आदी भागातून मृतांचे नातेवाईक तळियेला दुसऱ्या दिवशी पोहोंचतात मात्र रायगड, जवळ असूनही मदत-यंत्रणा तेथे लगेच पोहोंचू शकत नाही याचा अर्थच राज्याचे प्रशासन त्या आपत्कालीन व्यवस्थेच्या यंत्रणेबाबत किती उदासीन आहे याची प्रचिती येते. केवळ पाऊस आणि खराब रस्ते यामुळे जर मदत-यंत्रणा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊ शकत नसेल तर ती ‘आपत्कालीन व्यवस्था यंत्रणा’ आहे की नेहमीची साधी प्रशासन यंत्रणा आहे अशा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. थोडक्यात आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेबाबत प्रशासनच किती बेफिकीर आहे हेच यावरून सिद्ध होते.

सुमारे तीस वर्षांपूर्वी लातूरजवळील किल्लारी भागात प्रचंड भूकंप झाला. अनेक गावे उध्वस्त झाली त्यावेळीही राज्याची आपत्कालीन व्यवस्था यंत्रणा पूर्णपणे कुचकामी असल्याचे दिसून आले. तब्बल तीन दिवसानंतर लष्कराने जेंव्हा त्या परिसराचा ताबा घेतला तेंव्हाच तेथे प्रत्यक्ष मदतकार्य सुरु झाले. तेच जर राज्याच्या प्रशासन यंत्रणेने तातडीने तेथे जाऊन ढिगारे उपसण्याचे काम सुरु केले असते तर काही जणांचे प्राण निश्चितच वाचू शकले असते.
वास्तविक आपत्कालीन व्यवस्था यंत्रणेबाबत बोलायचे झाल्यास तिच्याकडे केंद्र आणि राज्य सरकारांचे पहिल्यापासूनच दुर्लक्षच झाले असे म्हणावे लागेल. “नैसर्गिक संकटे आल्यावर मग पाहू” अशीच त्याबाबतची कोणत्याही सरकारची भूमिका असते. मात्र नैसर्गिक संकटे ही काही सांगून येत नसतात हे सरकारला सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी आपली यंत्रणा केंव्हाही सुसज्ज ठेवणे अत्यावश्यक असते.
केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेवर असतांना त्यांनी खास आपत्कालीन व्यवस्था यंत्रणा विभाग स्थापन करून ते खाते शरद पवार यांना सांभाळण्यासाठी दिले होते. त्यासाठी त्यांना मंत्रिपदाचा दर्जाही दिला होता. मात्र नंतरच्या मंत्रिमंडळात असा स्वतंत्र विभाग निर्माण केल्याचे दिसून आले नाही. नाही म्हणायला राष्ट्रीय आपत्ती निवारणासाठी ‘एनडीआरएफ’ हे लष्कराचे खास पथक स्थापन करण्यात आले आहे. परंतु त्याला खूप मर्यादा असल्याचे जाणवते.

जेंव्हा केंव्हा नैसर्गिक आपत्ती कोसळते तेंव्हा ‘एनडीआरएफ’च्या तुकड्या त्या त्या भागात जातात आणि आपले मदतकार्य सुरू करतात. मात्र जेंव्हा अतिशय दुर्गम भागात नैसर्गिक आपत्ती कोसळलेली असते अशा वेळी ‘एनडीआरएफ’ च्या तुकड्या प्रत्यक्ष घटनास्थळी जाण्यास खूप विलंब होतो अशा वेळी स्थानिक प्रशासन यंत्रणाही तिच्यावरच अवलंबून असल्याचे भासविले जाते त्यामुळे प्रत्यक्षात मदत-कार्याला खूप उशीर होतो.
तळिये गावात गुरुवारी दुपारी दरडी कोसळल्या मात्र तेथे शनिवारी सकाळपर्यंत एनडीआरएफ च्या तुकड्या पोहोंचू शकल्या नव्हत्या. यावरून हे लक्षात येते की ‘एनडीआरएफ’ बरोबरच स्थानिक प्रशासन यंत्रणेने देखील अशी आपत्कालीन सुसज्ज यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे तरच नागरिकांना लवकर मदत मिळून त्यांचे किमान प्राण तरी वाचले जाऊ शकतील. मात्र त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचे जाणवते.
”नेमेचि येतो पावसाळा… ” या उक्तीप्रमाणे दरवर्षी पावसाळा येतो. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अनेकदा मुसळधार वृष्टीही होते. अर्थात हवामान खाते फक्त ‘अंदाज’ सांगून मोकळे होते असाही आजवरचा अनुभव आहे. पाऊस पडणार आहे एवढेच भाकीत व्यक्त करून हवामान खात्याची जबाबदारी संपत नाही. एकदा पाऊस सुरू झाला की, त्याची तीव्रता किती आहे तसेच ढगफुटीचे अंदाजही हवामान खात्याने आपल्या यंत्रणेचा उपयोग करून देण्याची गरज आहे. हवामान खात्याकडे अद्यावत यंत्रणा आहे मात्र ती सातत्याने चांगल्याप्रकारे कार्यान्वित ठेवणे हेही हवामान खात्याचेच काम आहे.

एका वृत्तानुसार मुंबईतील हवामान खात्याकडे असलेली अत्याधुनिक रडार यंत्रणा गेल्या काही दिवसापासून बंद आहे. असे असेल तर त्याला जबाबदार कोण? सरकारने त्याचीही चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे. याबाबत हवामान खात्याकडून दाखविण्यात आलेली निष्क्रियता लक्षात घेता अशा नैसर्गिक संकटांबाबत तेही तेवढेच जबाबदार आहे असे म्हटले तर ते अयोग्य ठरणार नाही. हवामान खात्याने आपत्कालीन संकटात आपलीही तेवढीच जबाबदारी आहे याची जाणीव ठेवल्यास आणि प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवल्यास अशा जीवघेण्या आपत्तीवर वेळीच उपाययोजना करता येऊ शकते.
थोडक्यात सर्व संबधित यंत्रणांनी परस्परांशी योग्य तो समन्वय साधून आपली कार्यतत्परता दाखविली तर अशा नैसर्गिक संकटांवर तातडीने मात करता येऊ शकते मात्र त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. केवळ पाऊस ‘लहरी’ आहे तो केंव्हाही कोसळू शकतो असे म्हणून प्रशासन यंत्रणेनेही आपला लहरीपणा दाखवून त्याकडे दुर्लक्ष करणे हे परवडणारे नाही हेच तळियेसारख्या नैसर्गिक संकटांनी दाखवून दिले आहे. यापूर्वीही राज्यात अशा अनेक अस्मानी सुलतानी संकटांची मालिका होऊन गेलेली आहे मात्र त्यापासून कोणीही योग्य ती खबरदारी घेतल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे प्रत्येक नैसर्गिक संकटाच्या वेळी पुन्हा ”ये रे माझ्या मागल्या…” असाच प्रकार दिसून येतो.
नागरिकांच्या दृष्टीने हे दुष्टचक्र कधी संपणार आहे ते देवच जाणो.
– श्रीकांत नारायण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)