केरळमधील जगप्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 270 वर्षांनंतर महाकुंभभिषेक सोहळा झाला आहे. भगवान विष्णूंना समर्पित असलेले श्री पद्मनाभस्वामी मंदिर त्याच्या खजिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराभोवती अनेक रहस्य आहेत. जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणूनही याच श्री पद्मनाभस्वामी मंदिराचा उल्लेख होतो. भगवान विष्णूंना समर्पित श्री पद्मनाभस्वामी मंदिर त्याच्या खजिन्यांसाठीही प्रसिद्ध आहे आणि त्याच्याशी संबंधित अनेक रहस्ये आहेत. मंदिरातील खजिन्याबाबत नेहमी कथा सांगितल्या जातात . प्रत्यक्ष नागलोकमधील रक्षकच या खजिन्याचे रक्षण करतात, असेही काही स्थानिक सांगतात. या मंदिराचे आणखी वैशिष्ट म्हणजे, तिथे करण्यात येणारे पूजाविधी. याच सोहळ्यातील एक महत्त्वाचा सोहळा असतो तो, महाकुंभभिषेक. (Kerala)
मंदिरातील पावित्र्य राखले जावे आणि देवाच्या मुर्तीमधील उर्जा कायम रहावी यासाठी हा सोहळा करण्यात येतो. श्री पद्मनाभस्वामी मंदिरात तब्बल 270 वर्षानी हा अलौकिक सोहळा पार पडला. यावेळी तमाम विष्णु भक्तांनी मंदिरात गर्दी केली होती. कुंभभिषेक हा एक विशेष धार्मिक विधी असून हा विधी तीर्थस्थळ आणि मंदिराचे पावित्र्य आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी केला जातो. यासंदर्भात अनेक धार्मिक ग्रंथात माहिती सांगितलेली आहे. हाच विधी श्री पद्मनाभस्वामी मंदिरात पार पडला. या विधीसोबतच मंदिरात विश्वक्षेनाची मूर्ती पुन्हा स्थापित करण्यात आली आहे. (Marathi News)
हा सर्व विधी एकदिवसाचा असला तरी गेले वर्षभर मंदिरातील पुजारी यासाठी तयारी करत होते. यासोबतच तिरुवांबडी श्रीकृष्णस्वामी मंदिरातही अष्टबंधकलशम नावाचा विधी करण्यात आला. जेव्हा श्री पद्मनाभस्वामी मंदिरात महाकुंभभिषेकम केले जाते, तेव्हाच तिरुवांबडी श्रीकृष्णस्वामी मंदिरात अष्टबंधकलशम नावाचा हा विधी कऱण्याची परंपरा आहे. अष्टबंधकलाशममध्ये एक विशेष प्रकारचे नैसर्गिक चिकट मिश्रण तयार केले जाते. त्यात लाकूड लाख, चुनखडीची पावडर, राळ, लाल गेरू, मेण, लोणी आणि आठ प्रकारच्या औषधी वनस्पती मिसळल्या जातात. या मिश्रणाचा वापर देवतांच्या मुर्तींना पुन्हा मुळ स्वरुप प्राप्त होते, अशी मान्यता आहे. याशिवाय देवाच्या मुर्तीमध्ये असलेली उर्जाही याच मिश्रणाच्या अभिषेकानंतर प्राप्त होत असल्याचे सांगण्यात येते. श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील महाकुंभभिषेकसोहळ्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. (Kerala)
त्यानंतर 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीला मंदिरातील काही मूर्तींना हानी झाल्याचा अहवाल जाहीर झाला. त्यानंतर श्री पद्मनाभस्वामी मंदिरात महाकुंभभिषेकम समारंभ करण्यात यावा यासाठी प्रयत्न सुरु झाले. यातून मंदिराचे नूतनीकरणही सुरु झाले. मात्र कोविड-19 साथीचा या सर्व कामाला फटका बसला आणि त्यात महाकुंभभिषेक समारंभाचे आयोजनही लांबणीवर पडले. 2021 पासून या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली. यातून तिरुवांबडी श्री कृष्णस्वामी मंदिरात चांदीचा खांब बसवण्यात आला. त्यानंतर तब्ब्ल 270 वर्षानी होणा-या महाकुंभभिषेक सोहळ्याची तयारी सुरु करण्यात आली. या सोहळ्याचे महत्त्व जाणून यासाठी देशभरातीलच नव्हे तर जगभरातील भगवान विष्णूचे भक्त उपस्थित रहाणार हे जाणून भव्य तयारी सुरु झाली. पुढच्या साधारण 100 वर्षाहून अधिक काळापर्यंत हा विधी आता पुन्हा होणार नाही, हे जाणून भाविकांनीही यासाठी मोठ्या संख्येनं नावनोंदणी केली. (Marathi News)
=========
हे देखील वाचा : Temple : जगाच्या अंताचे रहस्य असलेल्या ‘या’ मंदिरात दर्शन घेण्यासाठी जावे लागते ९० फूट खोल गुहेत
=========
महाकुंभभिषेकमच्या आधी मंदिरात अनेक धार्मिक विधी करण्यात आले, यात आचार्य वरणम, प्रसाद शुद्धी, धारा आणि कलशम या विधींचा समावेश आहे. त्रावणकोर राजघराण्याचे प्रमुख मूलम थिरुनल रामा वर्मा यांनी मंदिरात प्रार्थना केली. यानंतर, मुख्य पुजाऱ्याने राजघराण्यातील सदस्यांच्या उपस्थितीत अष्टबंध कलश केला. विश्वकसेनची जी मूर्ती पुन्हा बसवण्यात आली आहे ती 300 वर्षे जुनी आहे. मूर्तीची पुनर्स्थापना झाल्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि नारायण मंत्रांचा जप करण्यात आला. या दुर्मिळ विधी पाहण्यासाठी केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकरही उपस्थित होते. शिवाय भाविकांनी भल्या पहाटेपासून या सोहळ्याची झलक बघण्यासाठी रांगा लावल्या होत्या. हा सर्व सोहळा 8 जून रोजी पार पडला असला तरी श्री पद्मनाभस्वामी मंदिरात पुढचे काही दिवस यासंबंधी सर्व पूजासोहळे होणार आहेत, त्यामुळे त्यात सहभागी होण्यासाठी हजारो भाविक केरळमध्ये दाखल होत आहेत. (Kerala)
सई बने