प्लेऑफ मध्ये अखेरच्या क्षणी प्रवेश मिळवणाऱ्या मुंबईच्या संघासमोर एलीमीनेटर सामन्यात मुंबईसमोर लखनऊचे आव्हान असेल. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही संघांना आपल्या फिरकी गोलंदाजांकडून विशेष अपेक्षा असतील. विजयी संघ फायनलच्या दिशेने एक पाऊल टाकेल तर पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.(MI vs LSG)

यंदाच्या हंगामात सुरुवातीचे दोन सामने गमावूनसुद्धा मुंबईच्या संघाने मुसंडी मारत चांगली कामगिरी केली होती. साखळी सामन्यातील शेवटच्या १२ सामन्यांपैकी ८ सामने जिंकत आपल्या प्लेऑफच्या तिकिटावर शिक्कामोर्तब केले होते. मुंबईच्या या कामगिरीत मुंबईच्या फलंदाजांनी महत्वाची भूमिका बजावली होती.(MI vs LSG)
आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांत लयीत नसलेल्या सुर्यकुमार यादवने जबरदस्त लय पकडत वेळोवेळी आपली आणि संघाची कामगिरी उंचावली आहे. मागच्या सामन्यातील शतकवीर कॅमेरून ग्रीनदेखील चांगल्याच लयीत आहे. रोहित शर्मादेखील हळूहळू आपल्या लयीत आल्याप्रमाणे भासत आहे. युवा नेहल वढेरा आणि टिलक वर्मा यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.(MI vs LSG)
मुंबईची गोलंदाजी या हंगामात कमकुवत भासत आहे. दुखापतीमुळे संघाचा स्टार गोलंदाज या हंगामात सहभागी होऊ शकला नव्हता तर वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला देखील दुखापतीमुळे मध्येच माघार घ्यावी लागली होती. मागच्या काही सामन्यात आकाश मधवालने चांगले प्रदर्शन करत जलद गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. अनुभवी पियुष चावलाने वेळोवळी विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. चालू हंगामात तो मुंबईकडून सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या या दोघांवर मुंबईच्या गोलंदाजीची भिस्त बऱ्यापैकी अवलंबून आहे.
========
हे देखील वाचा : IPL मध्ये आतापर्यंत ‘या’ खेळाडूंनी पटकावली आहे ऑरेंज कॅप
========
दुसरीकडे लखनऊच्या गोलंदाजीत बऱ्यापैकी धार जाणवत राहते. रवी बिष्णोईने सातत्याने बळी मिळवले आहेत. मात्र कर्णधार कृणाल पांड्या, नवीन-उल-हक आणि आवेश खान यांना आपल्या गोलंदाजीत सातत्य राखता आलेले नाही. मार्कस स्टोईनीस वगळता लखनऊच्या इतर फलंदाजांना आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. आजचा सामना जिंकायचा असेल तर त्यांना चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन करावे लागणार आहे.