लखनऊ, २३ मे २०२५. सकाळचे साधारण सव्वा अकरा वाजले असतील. लखनऊच्या हजरतगंजमधलं सीबीआय ऑफिस, जिथे नेहमीच शांतता आणि कडक सुरक्षा असते. पण त्या दिवशी तिथे एक असा प्रकार घडला की सगळं वातावरणच बदललं. दिनेश मुर्मू,एक ६५ वर्षांचा माणूस गेटवर आला आणि आत जायची विनंती करू लागला तेव्हा त्याला तिथून हकलल्यानंतर त्याने गेटवर उभ्या असलेल्या एएसआय वीरेंद्र सिंह यांच्यावर धनुष्यबाणाने हल्ला केला. बाण थेट वीरेंद्र यांच्या छातीजवळ घुसला आणि एकच गोंधळ उडाला.
लोकांनी आरडाओरडा केला, काहींनी वीरेंद्र यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या सुरक्षारक्षकाने दिनेशवर खुर्ची फेकून त्याला थांबवायचा प्रयत्न केला. पण दिनेश थांबला नाही. तो ऑफिसच्या आत शिरला आणि आणखी एक बाण मारायच्या तयारीत होता. शेवटी, इतर सुरक्षारक्षकांनी त्याला पकडलं आणि मारहाण करून जमिनीवर पाडलं. बंदूक पिस्तोल वापरण्याच्या काळात हा माणूस धनुष्यबाण का घेऊन आला आणि त्याने तो बाण फक्त त्याला हकलल्यामुळे चालवला का? तर नाही, यामागे आहे बदल्याची एक कहाणी, जी ३२ वर्षांपासून दिनेशच्या मनात खदखदत होती. त्याबद्दलच जाणून घेऊ.
ही घटना लखनऊच्या हजरतगंज परिसरात घडली. सीबीआय ऑफिसच्या बाहेर तैनात असलेले एएसआय वीरेंद्र सिंह आपलं कर्तव्य बजावत होते. तेवढ्यात बिहारच्या मूंगेर जिल्ह्यातील खडगपूर गावचा रहिवासी असलेला दिनेश मुर्मू तिथे आला. तो संशयास्पदरीत्या गेटजवळ उभा होता. वीरेंद्र यांनी त्याला ओळखपत्र आणि भेटीचं कारण विचारलं. दिनेशने स्पष्ट उत्तर न देता आत जाण्याचा आग्रह धरला. पण काही क्षणांतच झाडामागून लपून त्याने वीरेंद्र यांच्यावर बाण चालवला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सगळं स्पष्ट दिसतं. वीरेंद्र यांनी वेदनेने तडफडत गार्ड केबिनमध्ये आश्रय घेतला, पण दिनेशने त्यांचा पाठलाग करत आणखी एक बाण चालवण्याचा प्रयत्न केला. शेवटी, एका सुरक्षारक्षकाने काठीने दिनेशच्या हातावर मारून त्याचं धनुष्य खाली पाडलं आणि त्याला पकडलं.
वीरेंद्र सिंह यांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांच्या छातीत ५ सेंटीमीटर जखम झाली होती, पण आता ते धोक्याबाहेर आहेत. पोलिसांनी दिनेशला अटक केली आणि त्याच्यावर खटला दाखल झाला. २४ मे रोजी त्याला मजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आलं आणि १४ दिवसांसाठी त्याला जेलमध्ये पाठवण्यात आलं.
पण हा दिनेश कोण आहे? आणि त्याने असा का हल्ला केला? दिनेश मुर्मू हा एक माजी रेल्वे कर्मचारी आहे. तो आदिवासी समुदायाचा आहे आणि रेल्वेत गँगमन म्हणून काम करायचा. १९९३ मध्ये सीबीआयने रेल्वेतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तपास केला, ज्यात दिनेशने एका भ्रष्ट सहकाऱ्याला, सीताराम गुप्ताला, पकडवण्यास मदत केली होती. पण दिनेशचा दावा आहे की सीबीआयने त्याला खोट्या आरोपात अडकवून त्याचीच नोकरी हिसकावली. यामुळे त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. “यामुळे मी माझं सगळं गमावलं – नोकरी, मान, उपजीविका,” असं त्याने पोलिसांना सांगितलं. “३२ वर्षं मी हा बदला घेण्यासाठी वाट पाहिली.”
===============
हे देखील वाचा : Anandibai Joshi : एका सामान्य स्त्रीची असामान्य यशोगाथा – डॉक्टर आनंदीबाई जोशी
===============
दिनेशचा राग इतका प्रचंड होता की त्याने सीबीआय अधिकाऱ्यांचा पाठलाग सुरू केला. गेल्या दोन महिन्यांपासून तो लखनऊमध्ये होता, सीबीआय कार्यालयाची रेकी करत होता. त्याने हाताने बनवलेलं लाकडी धनुष्य आणि लोखंडी टोकाचे बाण वापरलं. पोलिसांना तो म्हणाला, “जसं भगवान रामाने अन्यायाविरुद्ध धनुष्य उचललं, तसं मीही केलं. त्याला आपल्या कृत्याचा अजिबात पश्चात्ताप नाही. असंही तो म्हणाला आहे. पण यात आणखी एक ट्विस्ट आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिनेशची मानसिक स्थिती स्थिर नाही. यापूर्वीही त्याने असेच हल्ले केले आहेत. २००५ मध्ये दिल्लीत एका पोलिस कॉन्स्टेबलवर आणि २०१५ मध्ये जौनपूरमध्ये जीआरपीच्या एक शिपायावर हल्ला केल्याप्रकरणी तो जेलमध्ये गेला होता. पोलिस आता त्याच्या नक्षलवादी संबंधांचीही तपासणी करत आहेत.
पोलिसांनी दिनेशवर खुनाचा प्रयत्न आणि सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिस आता त्याच्या १९९३ च्या प्रकरणाची आणि रेल्वेतील बडतर्फीच्या दाव्यांची चौकशी करत आहेत. त्यानंतर सत्य काय हे आपल्या समोर येईल.