Home » जाणून घ्या चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र यांमधील फरक

जाणून घ्या चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र यांमधील फरक

by Jyotsna Kulkarni
0 comment
Navratra
Share

आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक विविध प्रकारचे सण साजरे केले जातात. श्रावणानंतर तर सणांची मोठी रांगच लागते. आता गणेशोत्सवाची सांगता झाली आणि आता वेध लागले तर आदिमाया आदिशक्तीचा जागर साजरा करण्याचे. अर्थातच लवकरच शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होणार आहे. नऊ दिवस देवीची स्थापना करून तिची पूजा करून तिच्यासमोर गरबा रंगणार आहे.

या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. शारदीय नवरात्राची आता पुन्हा मोठी धूम रंगणार आहे. दरम्यान वर्षभरामध्ये आपण चार नवरात्री साजऱ्या करतो. यातली एक चैत्र नवरात्र, दुसरे शारदीय नवरात्र आणि दोन गुप्त नवरात्रीचा यात समावेश आहे. आषाढ आणि माघ महिन्यातील नवरात्र गुप्त पद्धतीने साजरे केले जाते. मग चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र यात काय फरक आहे.

मराठी नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी या कालावधीत वर्षातले पहिले नवरात्र साजरे केले जाते. वसंत ऋतुच्या सुरुवातीला हे पहिले नवरात्र साजरे करत असल्यामुळे याला वासंतिक नवरात्र असेही म्हटले जाते. तर शारदीय नवरात्र हे शरद ऋतुच्या सुरुवातीला साजरे केले जाते. त्यामुळे अश्विन नवरात्राला शारदीय नवरात्र म्हटले जाते.

Navratra

चातुर्मासातील अश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते विजयादशमी म्हणजेच दसऱ्यापर्यंत हे नवरात्र असते. चैत्र नवरात्रातील नवमी राम नवमी म्हणून ओळखली जाते. म्हणूनच याला राम नवरात्र असेही म्हटले जाते. अश्विन नवरात्रात देवीच्या मूर्तीची स्थापना करून दसऱ्याला तिचे विसर्जन केले जाते.

चैत्र आणि शारदीय नवरात्र ही गृहस्थ आणि कौटुंबिक जीवन जगणाऱ्यांसाठी शुभ मानली जातात. दोन्हींमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. दोन्ही नवरात्रीच्या उपासनेची पद्धत जवळपास सारखीच आहे, पण दोन्हींचे व्रत पाळण्यात फरक आहे आणि दोन्हींचेही महत्त्व देखील वेगळे आहे. अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला संपूर्ण भारतभर दुर्गापूजा साजरी केली जाते. उत्तर आणि पश्चिम भारतात हा सण खूप चांगला साजरा केला जातो. ही नवरात्री दुर्गा, भद्रकाली, जगदंबा, अन्नपूर्णा, सर्वमंगला, भैरवी, चंडिका, कलिता, भवानी, मूकांबिका या मातृशक्तीच्या नऊ रूपांना समर्पित आहे.

शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसांत, देवी दुर्गाने जगाच्या कल्याणासाठी महिषासुराशी युद्ध केले आणि दहाव्या दिवशी त्याचा पराभव केला. याव्यतिरिक्त, शारदा नवरात्रीच्या दहाव्या दिवशी, भगवान रामाने राक्षस राजा रावणाचाही पराभव केला, धार्मिकता पुनर्स्थापित केली, ज्याला दसरा (विजयादशमी) म्हणून ओळखले जाते. शारदीय नवरात्र सांसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरे केले जाते. तर चैत्र नवरात्र आध्यात्मिक आकांक्षा, सिद्धी आणि मोक्ष प्राप्तीसाठी साजरे केले जाते.

चैत्र शुक्ल पक्षात चैत्र नवरात्र साजरी केली जाते. हा सण मुख्यतः उत्तर भारत आणि पश्चिम भारतात साजरा केला जातो. हा सण हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला होतो. मराठी लोक हा गुढीपाडवा आणि काश्मिरी हिंदू ‘नवरे’ म्हणून साजरा करतात. इतकेच नाही तर आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातील हिंदू तो ‘उगादी’ म्हणून साजरा करतात.

=================

हे देखील वाचा : नंदिनीचे तुप

================

चैत्र नवरात्रीचे महत्त्व महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात अधिक आहे, तर गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये शारदीय नवरात्रीचे महत्त्व अधिक आहे. शारदीय नवरात्रीच्या काळात शक्तीची उपासना म्हणून बंगालमध्ये दुर्गापूजा उत्सव साजरा केला जातो. दुसरीकडे गुजरातमध्ये गरबा वगैरेचे आयोजन केले जाते.

चैत्र नवरात्रीच्या शेवटी रामनवमी येते. रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाचा जन्म झाला, असे मानले जाते. तर शारदीय नवरात्रीचा शेवटचा दिवस महानवमी म्हणून साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी विजय दशमी उत्सव असतो. विजय दशमीच्या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध केला आणि भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.