कांदा आपल्या भारतीय किचनचा राजा. हो खरंच आहे ना.. कांद्याशिवाय आपला एकही दिवस आणि एकही जेवण पूर्ण होत नाही. भाजी, कोशिंबीर, पराठा, सॅलड, नाश्ता आदी सर्वच ठिकाणी हे कांदे महाराज त्यांची उपस्थित दाखवत असतात. ‘कांद्याशिवाय जेवणाला चव नाही’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकत असतो. डोळ्यातून पाणी काढणारा हा कांदा जिभेला चव देऊन तृप्त करत असतो.
तुम्हाला माहिती आहे का मंडळी जेवणाची चव आणि शोभा वाढवणारा हा कांदा आरोग्यासाठी देखील कमालीचा उपयुक्त आहे बरं का… आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन आम्हाला तर माहिती आहेत कांद्याचे गुणधर्म. ताप आला की आम्ही कांद्याचा रस लावतो, उन्हात बाहेर जाताना कांदा बरोबर नेतो आदी अनेक मात्र अहो या व्यतिरिक्त देखील कांदा खूपच औषधी आहे. चला तर मग आज या लेखातून जाणून घेऊया कांद्याचे गुणधर्म.
आपण अनेकांकडून, विविध जाहिरातींमधून ऐकले, पाहिले असेल की कांद्याचा रस हा केसांसाठी किती आवश्यक आणि औषधी आहे. कांद्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन ए, आयर्न, झिंक, व्हिटॅमिन सी यांसारखे पोषक घटक आढळतात, ज्यामुळे केसांचे पोषण होऊन त्यांचे योग्य वाढ होत ते निरोगी राहण्यास मदत होते. सोबतच केसांमधील कोंडा कमी होतो, केस काळेभोर राहतात.
कांदा हा फ्लेव्होनॉइड्स आणि थायोसल्फिनेट्सचा मोठा आणि महत्वाचा स्रोत आहे. कांद्यामधील फ्लेव्होनॉइड्स या गुणधर्मामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. तर थायोसल्फिनेट्स हे रक्ताची सुसंगतता योग्य ठेवतात. यामुळे हार्ट अटॅक आणि पॅरालिसिसचा धोका अनेक पटींनी कमी होतो.
कांद्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स हे आपले शरीर मजबूत करण्यास मदत करू शकतात. एका संशोधनानुसार कांद्याची रासायनिक रचना इतकी मजबूत आहे की ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. शिवाय कांद्यात कॅन्सर विरोधी गुणधर्म देखील असतात.
कांदा हा ऍलर्जीविरोधी आहे. एका अभ्यासानुसार, कांदा खाल्ल्याने श्वासनलिकेच्या अलगावच्या स्नायूंना आराम मिळतो ज्यामुळे दम्याच्या रुग्णांना सहज श्वास घेण्यास मदत होते. हे कांद्यामध्ये असलेल्या फ्लेव्होनॉइड्सच्या गुणधर्मामुळे शक्य होते.
कांद्याचा अजून एक चांगला फायदा म्हणजे कांद्यामधील सेलेनियम हे शरीरात व्हिटॅमिन ई तयार करण्यास मदत करते. यामुळे डोळ्यांच्या वेदनादायक समस्या दूर होण्यास मदत होते.
कांद्यांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के भरभरून असतात. हे सर्व व्हिटॅमिन्स आपल्या त्वचेसाठी आवश्यक आहे. हे व्हिटॅमिन्स हानिकारक अतिनील किरणांपासूनही आपले रक्षण करतात. चेहऱ्यावरील मुरुमे, पुरळ जाण्यासाठी लावल्या जाणाऱ्या फेसपॅकमध्ये तुम्ही कांद्याचा रस घालून लावला तर चेहरा स्वच्छ होऊन कोमल होतो.
(वरील गोष्टी आणि उपाय आम्ही फक्त तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत. गाजावाजा कोणताही दावा करत नाही.)