भारत देश हा विविध गोष्टीने समृद्ध आहे. आपल्या या देशाला अनेक वर्षांचा मोठा इतिहास आहे. या देशावर अनेकांनी आक्रमण केले, राज्य केले. स्वतःची सत्ता इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, मात्र असे असूनही या देशाने आणि इथल्या लोकांनी सगळ्यांना पळवून लावले. भारतचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या देशाला लाभलेला धार्मिक इतिहास. (India First Village Mana)
भारताला अतिशय मोठा आणि महत्वाचा धार्मिक इतिहास आहे. महाभारत आणि रामायण या देशातल्या भूमीवर घडले असल्याचे सांगण्यात येते. आपले महाकाव्य म्हणून प्रसिद्ध असलेले महाभारत तर जगभर प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. महाभारत घडले की फक्त काल्पनिक आहे. या वादात नको पडायला मात्र, याच महाभारताच्या अनेक खुणा आपल्याला आजही अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. महाभारत घडल्याची साक्ष आजही अनेक गोष्टी आपल्याला देतात.
महाभारत घडल्याचा एक मोठा पुरावा म्हणजे ‘माणा’ गाव. देवभूमी उत्तराखंड राज्यातील चामोली जिल्ह्यातील हे गाव म्हणजे भारताचे पहिले गाव आहे. भारत-चीन सीमेवर असलेले माणा हे गाव, आधी शेवटचे भारतीय गाव म्हणून ओळखले जायचे. मात्र आता हे ‘पहिले भारतीय गाव’ म्हणून ओळखले जाते. ‘माणा’ हे गाव मधल्या काही वर्षांमध्ये खूपच चर्चेत आले. सोबतच सोशल मीडियावरील ट्रॅव्हलिंग व्लॉगमुळे देखील या गावाला नवीन ओळख मिळाली आहे.
‘माणा’ या गावाबद्दल सांगायचे तर उत्तराखंड सरकारने ‘पर्यटन गाव’ म्हणून जाहीर केले आहे. सरस्वती नदीच्या काठावर, बद्रीनाथ शहरापासून फक्त तीन किमी अंतरावर आहे. ते सर्वोत्तम पर्यटनांपैकी एक ठरले आहे. माणा हे गाव बद्रीनाथजवळ आहे आणि बद्रीनाथच्या दर्शनासाठी जाणारे भाविक पर्यटनासाठी माणा गावात जातात.
या गावाचे जुने नाव ‘मणिभद्र’ होते. येथे येणारे पर्यटक अलकनंदा आणि सरस्वती नदीचे संगम पाहायला येतात. सोबतच गणेश गुफा, व्यास गुफा आणि भीमपुलदेखील पाहण्याजोगी ठिकाणं आहेत. या गावाला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे मे ते ऑक्टोबर दरम्यान. या काळात इथे अनेक पर्यटक येतात. बद्रीनाथ धाम बंद झाल्यावर येथे येणे-जाणे बंद होते.
माणा गावात भोटिया समुदायाचे, मंगोल जमातीचे लोकं राहतात. ते अतिशय सुंदर सजवलेल्या आणि आकर्षक डिझाइन कोरलेल्या छोट्या झोपड्यांमध्ये राहतात. माणा हे लोकरीच्या कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे कपडे प्रामुख्याने मेंढीच्या लोकरीपासून बनवले जातात. यासोबतच हे गाव बटाटे आणि राजमासाठीही प्रसिद्ध आहे.
माणा गावाचे सर्वात मोठे आणि महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, अशी मान्यता आहे की, याच गावातून पांडव स्वर्गात गेले. येथे अशा अनेक खुणा असल्याचे देखील सांगण्यात येते. शिवाय येथे सरस्वती नदी देखील पाहायला मिळते. या नदीवर ‘भीम पुल’ आहे. असे सांगितले जाते की, जेव्हा पांडव स्वर्गात जात होते, तेव्हा त्यांनी सरस्वती नदीकडे पुढे जाण्यासाठी रस्ता मागितला होते, पण नदीने त्यांना नकार दिला. तेव्हा भीमाने दोन मोठ्या शिळा उचलल्या आणि नदीवर ठेवल्या, त्यामुळेच याला भीम पुल म्हणतात. या पुलावरूनच चालत पांडव स्वर्गात गेले होते.
अजून एका मान्यतेनुसार गणेश जेव्हा वेद लिहीत होते तेव्हा सरस्वती नदी जवळ वाहत असल्याने त्यांना तिच्या आवाजाचा त्रास होत होता. त्यांनी सरस्वती नदीला विनंती केली की, आवाज कमी कर पण नदीने नकार दिला. गणेश यांनी सरस्वती नदीला श्राप दिला की, इथून पुढे तु कधीच कोणलाही दिसणार नाहीस.
====================
हे देखील वाचा : एक डान्सिंग आजार, जो नाचवतो आणि जीव घेतो…
====================
याच माणा गावात महर्षी व्यास गुफा देखील आहे. या गुफेबद्दल सांगितले जाते की, महर्षि वेद व्यास यांनी येथे वेद, पुराण आणि महाभारताची रचना केली आणि गणेशांनी ते लिहून ठेवले.
यासोबतच माणा या गावात ट्रेकिंगसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इथे तुम्ही धर्तीवरील खरा स्वर्ग अनुभवू शकता. सोबतच अतिशय स्वच्छ आणि फ्रेश वातावरण असल्याने ताजे आणि प्रसन्न वाटते. माणा या गावात तुम्ही डेहराडून एयरपोर्टवरून, हरिद्वार रेल्वे स्टेशनवरून गाडी करून जाऊ शकतात. (India First Village Mana)