Home » किरण मानेंची वारीवरील ‘ती’ पोस्ट व्हायरल

किरण मानेंची वारीवरील ‘ती’ पोस्ट व्हायरल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Kiran Mane Pandharpur Waari Post
Share

आषाढ महिना लागला की, चाहूल लागते ती चातुर्मास आणि विविध सणांची. एकीकडे पाऊसाने निसर्गावर हिरवी चादर पांघरलेली असते, गारवा निर्माण झालेला असतो आणि प्रसन्नता असते. तर दुसरीकडे सणांची सुरुवात होत असल्याने उत्साहाचे, आनंदाचे वातवरण असते. याच आषाढाची सुरुवात होते ती, आषाढी एकादशीने. आषाढी एकादशी म्हटले की, लगेच डोळ्यासमोर येते ती पंढरीची वारी. ही वारी आपल्याला अनेक गोष्टींची शिकवण देताना देखील दिसते. (Kiran Mane Waari Post )

आषाढीची वारी म्हणजे वैष्णवांचा नेत्रदीपक सोहळा. काही शे किलोमीटर पायी चालत विठ्ठल नामाचा जप करत हे वारकरी पंढरीत पोहचतात आणि आपल्या विठुरायाचे दर्शन घेतात. देश नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून या वारीसाठी लोकं पंढरपुरात येतात. असे म्हणतात की या वारीचा अनुभव आयुष्यात एकदा तरी घ्यायला पाहिजे. अतिशय उत्तम नियोजन, स्वयंशिस्त मुखी विठ्ठलाचे नाव घेत हे वारकरी पायी चालत असतात. वारीबाबत अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या आपल्याला नेहमीच चकित करताना दिसतात.

kiran-mane-post-about-pandharpur-waari-went-viral-marathi-info

पंढरीच्या वारीबद्दल सामन्यांना तर नेहमीच आदर आणि आकर्षण असते. मात्र याला आपले मराठी कलाकार देखील अपवाद नाही बर का…त्यांना देखील वारीबद्दल खूपच आदर असतो. अनेकदा विविध प्रकारे ही बाब आपल्या लक्षात येत असते. मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय गाजलेले अभिनेते म्हणजे किरण माने. आपल्या अभिनयासोबतच पोस्टमुळे चर्चेत असलेल्या किरण माने यांनी पुन्हा एकदा एक पोस्ट केली आहे. अभिनेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते असलेल्या किरण माने यांनी पोस्ट करत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “‘वारी’ ही लै लै लै नादखुळा गोष्ट आहे. खणत गेलं तर मानवतेचा खजिना सापडतो. आपल्या संतांनी असंच ‘टाईमपास’ म्हणून वारी आणि किर्तनपरंपरा सुरू केली नाही. माणसामाणसातले सगळे भेदभाव नष्ट करणारा खतरनाक विद्रोह होता तो.

…याचं जगात भारी उदाहरण म्हणजे पैठणचा हजरत इद्रिस हुसैनी सय्यद सादात दर्गा ! संत एकनाथांच्या पालखीसाठी जाणाऱ्या किंवा नाथषष्ठीसाठी आलेल्या दिंड्या याच दर्ग्यात मुक्कामाला थांबतात. तिथले मुस्लिम बांधव सगळ्या वारकऱ्यांची लैच प्रेमानं, उत्साहानं सेवा करतात. या मुक्कामात आपले वारकरी दर्ग्याला भक्तीभावानं पूजतात. मुस्लिम बांधवांकडनं आपल्या वारकर्‍यांना जेवण दिलं जातं.”

पुढे माने लिहितात, “…विशेष म्हणजे या काळात ह्या दर्ग्यात नमाज आणि भजन दोन्ही ‘अदा’ होतं ! ज्यावेळी मुस्लिम बांधवांच्या नमाजाची वेळ होते त्यावेळी वारकरी आपले भजन थांबवून ब्रेक घेतात आणि नमाज पूर्ण झाला की वारकरी परत भजन कंटिन्यू करतात !! एरवी सहज एकनाथांच्या दर्शनाला पैठणला गेलेला वारकरी मज़ारीवर माथा टेकूनच येतो. जे मुस्लीम भाविक दर्ग्यात येतात, ते एकनाथ महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत.

संत एकनाथ महाराज आणि हजरत इद्रिस हुसैनी या दोन्ही महामानवांना या सलोख्याच्या वारीतनं आपल्या सगळ्यांना काहीतरी ‘मेसेज’ द्यायचाय. तो आपण समजून घेतला पायजे.

======

हे देखील वाचा : एकसारख्या नावामुळे गायक अरमान मलिकला मनस्ताप

======

ज्ञानेश्वरांनी सुरू केलेला ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ हा विचार नामदेव, तुकोबारायांपास्नं आपल्या सगळ्या संतांनी अंगीकारला… तीच परंपरा आपल्या आज्ज्या-पणज्यांनी, बापजाद्यांनी जोपासत आपल्यापर्यन्त आणलीय. ती फुंकून आपल्या पुढच्या पिढ्यांच्या मनामेंदूत नफरतीचं विष पेरायचं, का आपल्या बापजाद्यांचा प्रेमाचा वारसा समृद्ध करायचा हे आपलं आपण ठरवायचंय. आपल्या धडावर ‘आपलंच’ डोकं आहे…”

किरण माने यांच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांनी सांगितलेल्या या माहितीबद्दल त्यांचे कौतुक केले आणि आभारही मानले आहे. दरम्यान किरण माने ते टीव्ही इंडस्ट्रीमधील चर्चित चेहरा आहे. त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले असून, सध्या ते तिकळी या मराठी मालिकेत दिसत आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.