विठ्ठल नेमका कोणता खरा… माढ्याचा की पंढरपुरचा… आता देव म्हटलं तर खरं-खोटं असं काही येतच नाही. भक्तांसाठी तो खराच असतो. पण वादच असा आहे की देवसुद्धा खऱ्या-खोट्यामध्ये अडकलेला आहे. सध्या सगळीकडे वारीचं वातावरण आहे. पण दरवर्षीप्रमाणे हा वाद सुद्धा पुन्हा उफाळून बाहेर येतो की विठोबाची मूळ मूर्ती कोणती… माढ्याच्या मंदिरातली की पंढरीमधली ! (Pandharpur)
कमरेवर हात ठेऊन विटेवर उभा असलेल्या त्या विठुरायाची मूर्ती सगळ्यांच्याच डोळ्यात भरते, मनाला समाधान देते. पण कधीतरी, कुठेतरी तुम्ही हे ऐकलंच असेल, पंढरपूरची जी विठ्ठल मूर्ती आहे, ती खरी नाहीये… अनेकांना बुचकळ्यात पाडायला लावेल, अशीच ही गोष्ट ! मुळात हा संवेदनशील विषय असला तरी गेल्या कित्येक वर्षांपासुन याच विषयावर राज्यात वादंग सुरू आहे. काही म्हणतात माढ्याचा विठोबा खरा तर काही म्हणतात पंढरपूरचा विठोबा खरा ! पण हा विठ्ठल मूर्तीचा नेमका वाद काय ? मूळ मूर्ती कोणती पंढरपूरची की माढ्याची ? या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकूया. (Top Stories)
महाराष्ट्रात दोन प्रसिद्ध विठ्ठल मंदिर आहेत. एक आपलं मूळ पंढरपूरचं आणि दुसरं पंढरपुरपासून जवळपास ५० किलोमीटर दुसर असलेल्या माढाचं ! माढामधील ग्रामस्थांनी या मंदिराचं नावच मूळ विठ्ठल मंदिर, कसबा पेठ, माढा असं केलं आहे. आपल्या मंदिरांवर अनेकदा परकीय आक्रमकांनी आक्रमण केलंय. त्याला पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सुद्धा अपवाद ठरलं नाही. त्यामुळे विठ्ठल मूर्ती अनेकदा मंदिरातून हलवल्याचंही सांगितलं जातं. यावेळी मूर्ती बाटवली जाऊ नये म्हणून पुजारी ती एखाद्या तळघरात लपवायचे, विहीरीत सोडायचे किंवा दुसऱ्या ठिकाणी ती पाठवून द्यायचे.(Pandharpur)
सुरुवातीला आपण हे पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीबाबत जाणून घेऊया. मूर्तिशास्त्र अभ्यासक आणि मंदिरस्थापत्य तज्ञ डॉ. गो. ब. देगलूरकर यांच्या मते जी पंढरपुरमध्येच आहे तीच विठ्ठलाची मूळ मूर्ती आहे. याचं स्पष्टीकरण देताना ते सांगतात की, ही विठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात सहाव्या शतकापासून आहे. याच मूर्तीच्या ठेवणीतून आणि अलंकारांमधून त्या काळाची कल्पना येते. याचं उदाहरण द्यायचं झालं तर मूर्तीच्या कानातील मकरकुंडल हे त्या काळातील शिल्पांमध्येच पाहायला मिळतात. याशिवाय दोन्ही हात कंबरेवर असलेली एक विष्णुमूर्ती पाचव्या शतकात मध्यप्रदेशच्या उदयगिरी लेणीत सापडली होती. अशाच मूर्ती कुशाण काळात सुद्धा पाहायला मिळतात.(Top Stories)
आता हीच मूर्ती इतर ठिकाणी हलवली गेली होती का ? तर हो ! इतिहासकार ग. ह. खरे यांनी याबाबत पुराव्यानिशी काही गोष्टी मांडल्या आहेत. आक्रमकांपासून मूर्ती सुरक्षित रहावी म्हणून दोन-तीन वेळा ही मूर्ती हलवली होती. मात्र ती पुन्हा आणून त्याच ठिकाणी स्थापित करण्यात आली. ‘महाराष्ट्राची चार दैवते’ या पुस्तकात त्यांनी म्हटलंय की, विठ्ठलाची मूळ मूर्ती ही माढ्याला हलवली, याला कोणताही आधार नाही. पण मूर्ती पंढरपूरजवळच्या देगावला हलवली होती. यासोबतच ती पुन्हा पंढरपुरात असल्याची पावतीसुद्धा उपलब्ध असल्याचं इतिहासकार खरे सांगतात. याशिवाय चिंचोली, हळसरे या गावांमध्येही मूर्ती हलवल्याचे पुरावे आहेत. माढा आणि पंढरपूरच्या मूर्तीमध्ये काय फरक आहे, याबद्दल देगलूरकर यांचं मत आहे की, पंढरपूरची मूर्ती ही माढ्याच्या मूर्तीपेक्षा जुनीच दिसते. पंढरपूरच्या मूर्तीमध्ये मकरकुंडल आहेत तर माढ्याच्या मूर्तीत शंखकुंडल ! कासे पितांबर अशी ती मूर्ती नाही. याशिवाय माढ्याची मूर्ती नग्न आहे. त्या मूर्तीच्या हातात जशी काठी आहे ती पंढरपूरच्या मूर्तीमध्ये नाही.(Top Stories)
आता माढ्याची मूर्ती ही मूळ मूर्ती आहे, असं सांगणाऱ्यांच्या दृष्टीकोनातून इतिहास जाणून घेऊया. इतिहास संशोधक रा. ची. ढेरे यांच्या संशोधनावरून ८०च्या दशकात बराच वाद झाला होता. त्यांनी माढ्याचा विठुराया हाच खरा आहे, असे आमच्याकडे पुरावे आहेत, असं त्यांनी म्हटलं होतं. पाहायला गेलं तर माढ्यातल मंदिर गजबजलेलं नाही, पण तरीही ही मूर्ती प्राचीन असल्याचं ढेरे सांगतात. ते आपल्या लेखांमध्ये मांडतात की, स्कंदपुराणातील ‘पांडुरंगमहात्म्य’ या संस्कृत रचनेपासून ते संत सावता माळी यांच्या अभंगापर्यंत पंढरपूरच्या विठ्ठलाचं जे वर्णन सापडतं, तशी मूर्ती पंढरपुरात नाही. हृदयस्थानावर कोरलेला कुटमंत्र हे त्या मूर्तीर्चं महत्त्वाचं वर्णन आहे. तशीच मूर्ती माढा येथे आहे. (Pandharpur)
श्री स्पर्शाद्यं सत्यनामाद्यं षणषटु सदीर्घकं || षटषटू दिनंत्यंतं ससारं तं विदर्बु धा: || श्री वत्स
हा कुटमंत्र माढ्याच्या विठ्ठलाच्या छातीवर कोरलेला स्पष्टपणे पाहता येतो. आता संतसाहित्यातून मूर्तीचं वर्णन बघूया. संत सावता माळी आपल्या अभंगात म्हणतात की,
विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ । दयकमळ मंत्रसिद्ध ॥
दिगंबर मूर्ती गोजरी सांवळी । तोडे पायी वाळी मनगटी ॥
कटीवर हात, हाती पद्म शंख । पुष्पकळी मोख अंगुलीत ॥
सावता माळी म्हणे शब्दब्रह्म । नाम विठ्ठलाचे कलियुगीं ।।
सावता माळी यांना जशी मूर्ती दिसली तसं त्यांनी याचं वर्णन करून ठेवलं आहे. विठ्ठल कसा आहे तर दिगंबर आहे. तो सावळा आहे, त्याच्या पायात तोडे आहेत. दोन्ही हात कमरेवर आहेत. गळ्यात कौस्तुभमणी, डाव्या हातात शंख. उजव्या हाताच्या तळवा काठीवर टेकवलेला आणि मनगटावर कडे, असं माढाच्या मूर्तीचं वर्णन आहे. मात्र पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीत अशी कोणतीही ओळख दिसत नाही. माढामधील मूर्ती खडबडीत नाही. सध्याची पंढरपूर येथील पांडुरंग मूर्ती खडबडीत वाटते. इतक्या वर्षापासून वेगवेगळ्या अभिषकामुळे त्याची झीज झाली असावी, असं सांगण्यात येतं. पण ज्या शिळेपासून माढ्याचा विठ्ठल घडलेला दिसतो त्याच शिळेपासून रुक्मिणी घडलेली दिसते, असं ढेरे यांचं म्हणणं आहे. (Pandharpur)
===============
हे देखील वाचा : Jagannath Rathyatra : भगवान जग्गनाथ यांच्या रथयात्रेची काही रंजक तथ्ये
===============
याच वादावर माढ्यातील देवळाचे पुजारी उत्कर्ष कुंभेजकर यांनीही म्हटलं आहे की, पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीच्या आणि रुक्मिणी मूर्तीच्या दगडात फरक जाणवतो. पण पंढरपूरच्या रुक्मिणीमातेचा दगड आणि माढ्यातील विठ्ठलमूर्तीचा दगड सारखा वाटतो. कदाचित ते शिल्पकलेच्या अभ्यासकांना स्पष्टपणे मांडता येईल आणि त्या दिशेने अधिक अभ्यास व्हायला हवा.(Top Stories)
वैष्णव धर्मात दगडाच्या मूर्तीपेक्षा माणसातील देव मोठा मानला गेला आहे. हजारो मैल चालून जे वारकरी बंधू-भगिनी पंढरीला जातात, ते केवळ विठ्ठलाची मूर्ती दिसावी म्हणून नाही. त्यांच्यासाठी तो प्रवासच अलौकिक असतो. देवदर्शन ही तर फक्त औपचारिकता असते. अनेकदा विठ्ठलाचं दर्शन प्रत्यक्षात झालं नाही तरी तो कळसाचं दर्शन घेऊन माघारी परततो. कारण त्याच्यासाठी विठ्ठल त्या दगडाच्या मूर्तीत नसून एकमेकांच्या अंतरात आहे. म्हणूनच एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला भेटतो, तेव्हा त्याच्या पाया पडतो. माणसातच देव मानण्याची ही प्रथा वारकऱ्यांनी कायम ठेवली आहे. (Pandharpur)
माढा आणि पंढरपूर हा मूळ मूर्तीबाबतचा वाद असला तरी अनेकांनी ही मूर्ती बुद्धाची आहे, असाही दावा केला आहे. मुळात ‘सत्याची कास’ धरण ही महाराष्ट्राची परंपराच आहे. मग तो देव असो वा मनुष्य ! कित्येक वादांना न डगमगता महाराष्ट्राने अनेकदा कटू सत्य मांडलं आहे, पचवलं आहे. म्हणूनच सन्याशाचं पोर असं बोलून वाळीत टाकलेले ज्ञानेश्वर इथे ‘माऊली’ ठरतात आणि इंद्रायणीत पोथ्या बुडवूनही तुकाराम ‘जगद्गुरू’ म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच ‘ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे’ म्हणणाऱ्या मराठी मनाने हा विठ्ठलाचा आणि विठ्ठलभक्तीचा अभ्यास अखंड सुरू ठेवायलाच हवा.
संदर्भ
श्रीविठ्ठल एक महासमन्व्यक – श्री रामचंद्र चिंतामण ढेरे
संत सावता माळी यांचे अभंग
गो. ब. देगलूरकर यांचे लेख
श्री विठ्ठल आणि पंढरपूर – ग. ह. खरे
पांडूरंगमहात्म्य
लोकमत लेख
महाराष्ट्र टाईम्स लेख
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics