Home » हरवले ते गवसले का ?

हरवले ते गवसले का ?

by Correspondent
0 comment
Share

भारताने न्यूझीलंडविरुद्धची ३ सामन्यांची टी २० मालिका ३-० अशा फरकाने जिंकून निर्भेळ यश संपादन केले. या विजयामुळे विश्वचषक स्पर्धेतील पराभवाची परतफेड झाली अशी सर्वसामान्य क्रिकेट रसिकांची भावना असू शकते. काही जण या यशाचे श्रेय नव्याने नियुक्त झालेले प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) व कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना देतील. परंतु याही पलीकडे जाऊन विचार केल्यास या यशासाठी खालील मुद्दे कारणीभूत ठरल्याचे लक्षात येईल.

१- योग्य संघ निवड :
निवड समितीने विश्वचषक स्पर्धेतील संघ निवडीतील चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. जडेजा, शमी, बुमराह, विराट यासारख्या सततच्या क्रिकेटमुळे दमलेल्या खेळाडूंना विश्रांती देऊन भरात असलेल्या वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल, दीपक चहर, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, श्रेयस अय्यर यासारख्या खेळाडूंना संधी दिली. यातील दोन अपवाद, श्रेयस आणि चहल वगळता, बाकी सर्व खेळाडू अष्टपैलू असल्याने संघातील संतुलन साधले गेले व भारताला सहाव्या गोलंदाजांचा पर्याय उपलब्ध झाला. त्याचा फायदा रोहितला तिसऱ्या सामन्यात नक्कीच झाला.

2- दर्जेदार क्षेत्ररक्षण :
विश्वचषक स्पर्धेत भारताचे क्षेत्ररक्षण मरगळल्यासारखे झाले होते. पण या मालिकेत क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावलेला आढळला. ऋषभ पंतने दुसऱ्या सामन्यात घेतलेला गुप्तिलचा झेल तसेच तिसऱ्या सामन्यात निशामचा घेतलेला झेल अफलातून होता. हे दोन्ही उंच झेल त्याने बरच अंतर धावत जाऊन घेतले. तिसऱ्या सामन्यात ईशान किशनने सॅन्टेनरला तसेच सैफ़र्टला धावबाद करताना दूरवरून अचूक फेक करताना विलक्षण चपळता दाखवली. मात्र उंच उडालेले झेल घेण्यात थोडी सुधारणा होणे आवश्यक आहे.

३- गोलंदाजी :
गोलंदाजांनी बहुतांशी क्षेत्ररक्षणानुसार मारा केला. हर्षल पटेल, वेंकटेश अय्यर या नवोदित गोलंदाजांनी भुवनेश्वर कुमारला चांगली साथ दिली. अश्विनने पहिल्या सामन्यात चॅपमनला फसवून त्रिफळाबाद करताना आपल्या बुद्धिमानतेची चुणूक दाखवली. तिसऱ्या सामन्यात अक्षर पटेलने चॅपमनला पुढे खेचून पंतकरवी यष्टीबाद करताना डोकेबाज गोलंदाजीचा नमुना पेश केला.

४- उत्तम नियोजन :
प्रत्यक्ष मैदानावर रोहितने नियोजनानुसार अंमलबजावणी केली. निशाम हा प्रामुख्याने लेग साईडला फटके मारतो हे हेरून त्याला शॉर्ट ऑफ गुडलेंग्थ व ऑफ स्टंपच्या बाहेर भुवनेश्वर व इतर गोलंदाजांनी गोलंदाजी करून जखडून ठेवले त्यामुळे तो लवकर बाद झाला.

पहिल्या सामन्यात अश्विनने सैफ़र्टला रिव्हर्स स्वीप च्या सापळ्यात अडकवताना अचूक क्षेत्ररक्षण लावल्याने त्याचा फटका भुवनेश्वरच्या अलगद हातात गेला. हर्षल पटेलने हाणामारीच्या शेवटच्या षटकात धीम्या गतीच्या चेंडूंचा हुशारीने वापर केला.

वरील विवेचनानुसार भारताने पुढील विश्वचषकासाठी तयारी सुरु केल्याचे जाणवले. राहुल द्रविड यांच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाची झलक पण दिसून आली. कसोटी संघात समाविष्ट खेळाडूंनी विजयाच्या जल्लोषात सामील होण्याऐवजी पुरेशी झोप घेण्यास प्राधान्य द्यावे ही त्यांची सूचना याची साक्ष आहे.

एकूणच या विजयामुळे हरवलेला विश्वचषक पुन्हा गवसेल का याचे उत्तर २०२२च्या स्पर्धेतच मिळेल पण द्रविड व रोहितच्या यशस्वी ‘सलामीमुळे’ आपली त्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे असा दिलासा मात्र नक्कीच मिळू शकतो हीच या मालिकेची फलश्रुती म्हणावी लागेल. अर्थात ‘दिल्ली अभी बहुत दूर है’ याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.

– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.