Home » Maratha History : राजाराम महाराजांच्या पहिल्या पत्नी ताराराणी नव्हत्या तर…

Maratha History : राजाराम महाराजांच्या पहिल्या पत्नी ताराराणी नव्हत्या तर…

by Team Gajawaja
0 comment
Maratha HIstory
Share

१६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांच्या पत्नी सोयराबाई या मराठ्यांच्या इतिहासात भोसले घराण्यातील पहिल्या राणी बनल्या. त्यानंतर भोसले घराण्यातील छत्रपतींच्या पत्नींना ‘राण्या’ असं म्हणायला सुरुवात झाली. या काही राण्या, जसं की सईबाई, सोयराबाई, येसूबाई आणि ताराबाई यांसारख्या महत्त्वाकांक्षी आणि कर्तबगार राण्यांचे उल्लेख इतिहासात बऱ्याच ठिकाणी सापडतील. पण या नावांव्यतिरिक्त अशा एक राणी आहेत, ज्यांच्याबद्दल इतिहासात फारशी नोंद नाही. ज्यांची एक-दोन ओळींपेक्षा जास्त माहिती सापडत नाही. पण त्यांचा त्याग फार मोठा होता, आज आपण मराठ्यांच्या इतिहासाच्या अज्ञातवासातील याच राणीबद्दल जाणून घेणार आहोत.(Maratha History)

‘राणी जानकीबाई’, छत्रपती राजाराम महाराज म्हणजे मराठ्यांचे तिसरे छत्रपती आणि शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र यांच्या पहिल्या पत्नी. इतिहासात जानकीबाईंचे फक्त दोनच उल्लेख सापडतात. पहिला उल्लेख त्यांच्या लग्नाचा सापडतो. जो कृष्णाजी अनंत सभासद आपल्या बखरीमध्ये देतात आणि तो असा की, शिवाजी महाराजांचं निधन व्हायच्या जवळपास ३ आठवड्यांआधी महाराजांनी राजाराम आणि जानकीबाईंचं लग्न लावलं. जानकीबाई या प्रतापराव गुजर यांच्या कन्या. प्रतापराव हे शिवाजी महाराजांचे निष्ठावान सरदार. जे बहलोलखानावर बेभान होऊन तुटून पडले आणि हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुति दिली. त्यांचे स्वराज्यावरील हेच ऋण फेडण्यासाठी शिवाजी महाराजांनी त्यांची मुलगी आणि आपल्या धाकट्या मुलाचं, म्हणजे राजारामसोबत रायगडावर लग्न लावून दिलं. शिवाजी महाराजांनी तिचं नाव ‘सौभाग्यवती जानकीबाई’ असं ठेवलं, कारण राजारामचं नाव रामासारखं होतं आणि जानकी म्हणजे सीता. (Top Stories)

इतिहासात दूसरा उल्लेख त्यांच्या मृत्यूचा सापडतो तो म्हणजे मल्हार रामराव चिटणीस यांच्या बखरीत. त्यांच्या त्या उल्लेखावरून बऱ्याच इतिहासकारांनी असं विधान मांडलं की, संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत जानकीबाईंचा मृत्यू झाला आणि नंतर संभाजी महाराजांनी राजाराम महाराजांचं लग्न ताराबाई आणि राजसबाई यांच्याशी लावलं. पण डॉ. आप्पासाहेब पवार यांनी संपादित केलेल्या ताराबाईकालीन कागदपत्रांतून आणि कोल्हापूरच्या यादव घराण्याच्या अस्सल दस्तऐवजांतून असं कळतं की जानकीबाई संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मरण नव्हत्या पावल्या तर त्या १६८९ मध्ये जुल्फिकारखानाने रायगडाला जो वेढा घातला तेव्हा त्या जिवंत होत्या.(Maratha History)

Maratha HIstory

तेव्हा काय झालं… १६८९ मध्ये मुघलांनी रायगडाला वेढा घातला. त्यावेळी राजाराम महाराज गड सोडून प्रतापगडावर गेले. तिथून त्यांनी आपला विश्वासू सेवक गिरजोजी यादव याला रायगडावर पाठवलं, राणी जानकीबाई आणि शाहूराजे यांना आणण्यासाठी. राजाराम महाराजांनी गिरजोजी यांना मजकूर पाठवला होता तो मजकूर असा, “त्या उपरी आही राजश्री राजारामसाहेब छत्रपति राज्य करू लागले त्यापासी गेलो. ते समई जुलपुकारखान गनीम रायेगडास वेढा घालावयास आला. याकरिता राजेश्री स्वामी प्रतापगडास गेले. अर्जोजी (गिरजोजी) यादव यास रायेगडी ठेविले. प्रतापगडीहून राजेश्री स्वामी राजाराम महाराज गनिमाचे दाटीकरिता परळीस गेले. तेथून पन्हाळ्यास गेले. आम्हास प्रतापगडीहून मातुश्री जानकीबाई व राजेश्री शाहू राजे यांस आणावया कारणे रायेगडास रवाना केले होते. आम्ही वेढियांतून गडावरी जाऊन चांगोजी काटकर (रायगडाचा किल्लेदार) आदिकरून सकलास राजेश्री स्वामींची आज्ञा सांगितली. ते ना यैकत. तेव्हा राजेश्री स्वामीच्या खर्चाकारणे सोने वस्तभाव मागोन घेतली आणि तैसेच वेढियातून निघोन कांगोरीस आलो. तेथे मुलुकातील लोक बदलोन येऊन गडाखाली बैसले. तेथून आपण युक्तीने निघोन रोहिडा, पांडवगड, वैराटगड, सातारा-परळी या किल्ल्यांवरून गनिमाच्या सिलसिल्यावरून रातवे खपून परम संकटे तितके सोने वस्तभाव सांभाळून पनालेस राजेश्री स्वामी जवळी गेलो.”  (Top Stories)

या मजकुरात “आम्हास प्रतापगडीहून मातुश्री जानकीबाई व राजेश्री शाहू राजे यांस आणावया कारणे रायेगडास रवाना केले होते.” या वाक्यात ज्या जानकीबाईंचा उल्लेख झाला. त्या म्हणजे राजाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीच होत्या. कारण या नावाचं कोणीच भोसले घराण्यात नव्हतं. पण यानंतर एक प्रश्न असा उभा राहतो तो म्हणजे की, राजाराम महाराजांच्या तीन पत्नी – जानकीबाई, ताराबाई आणि राजसबाई.राजाराम महाराजांनी ताराबाई आणि राजसबाईला सोबत घेतलं, पण जानकीबाईला का मागे सोडलं? याचं समाधानकारक उत्तर इतिहासात कुठेच सापडत नाही. पण जरी कितीही प्रश्न उभे राहिले तरी या वरुन जानकीबाईंच्या अस्तित्वाविषयी कोणतीच शंका उभी राहत नाही.(Maratha History)

===============

हे देखील वाचा : Chatrapati Shivaji Maharaj : महाराजांच्या ३२ मण सोन्याच्या सिंहासनाबद्दलची रंजक तथ्ये

===============

१६८९ मध्ये रायगडाच्या पाडावानंतर ज्या राजबंद्यांना कैद करून बादशहाच्या छावणीत नेले. त्या राजबंद्यांच्या यादीत येसूबाई,शाहूराजे यांच्याशिवाय सकवारबाई, संभाजी महाराजांचे दासीपुत्र मानसिंग व मदनसिंग यांची नावे इतिहासात येतात. पण राणी जानकीबाईंचे नाव येत नाही. त्यामुळे असा समज तयार झाला की, त्या रायगडाच्या वेढ्यातच मरण पावल्या. पण एका १०० वर्षांपूर्वीच्या मराठी संशोधकांनी उल्लेखलेल्या यादीतून असं कळतं की जानकीबाई मरण पावल्या नव्हत्या तर त्या मुघलांच्या कैदेत होत्या! याच यादीत दुर्गाबाई नावाच्या आणखी एका राणीचा उल्लेख आहे, ज्या संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या आणि त्यांचीही सुटका झाली.(Maratha History)

येसूबाईंच्या सुटकेचे आणि स्वराज्यात परतण्याचे उल्लेख इतिहासात सापडतात, पण जानकीबाईच्या सुटकेचा असा स्पष्ट उल्लेख कुठेच नाही. जर येसूबाईंसोबत त्याही महाराष्ट्रात परतल्या असतील तर मग त्यांचं पुढे काय झालं? याबद्दल इतिहास काहीच सांगत नाही. रामायण काळातील जानकीला जसा १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला, तसा या जानकीला मात्र त्यापेक्षा दुप्पट २८ वर्षांहून जास्त काळ कैदेत काढावा लागला.

संदर्भ: मराठेशाहीचे अंतरंग – डॉ. जयसिंगराव पवार


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.