टेलिव्हिजन आजच्या काळातील सर्वांच्याच मनोरंजनाचे महत्वाचे साधन आहे. टीव्हीशिवाय कोणीही त्यांच्या घराची कल्पना देखील करू शकत नाही. याच टीव्हीवर आजवर अनेक शो आले आणि गेले. मात्र काही शो प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले. मराठीबद्दल बोलायचे झाले तर झी मराठीवर अनेक मालिका अशा आल्या ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः गारुड निर्माण केले.
काही मालिकांशिवाय तर या मालिकांचा प्रवास, इतिहास पूर्णच होणार नाही. असा एक शो आहे जो मालिका नाही म्हणता येणार पण मालिकांपेक्षा जास्त लोकप्रिय झाला. महिला वर्गामध्ये तर या शोने आपले एक वेगळेच प्रस्थ तयार केले. हा शो आहे ‘होम मिनिस्टर’ झी मराठीवर दररोज संध्याकाळी ‘दार उघड बये दार उघड….’ असे म्हणत अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भाऊजी येतात. तमाम मराठी भगिनींचा अतिशय लाडका आणि आवडता शो म्हणून ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाला ओळखले जाते.
साधारण दोन दशकांपूर्वी हा शो फक्त सहा भागांसाठी म्हणून सुरु करण्यात आला होता. मात्र सहा भागांचे कधी साडे सहा हजार भाग झाले कोणाला समजलेच नाही. १३ सप्टेंबर २००४ रोजी या शोचा पहिला भाग प्रक्षेपित करण्यात आला होता. आज अर्थात १३ सप्टेंबर २०२४ रोजी या शोचे २० वर्ष पूर्ण होत आहे.
‘होम मिनिस्टर’ ने प्रेक्षकांचे केवळ मनोरंजनच केले नाही त्यांच्या मनाला स्पर्श केला. अनेक कुटुंबाना सुखद अनुभव या कार्यक्रमाने दिले. हा कार्यक्रम मराठी टेलिव्हिजनवर एक मैलाचा दगड ठरला. या कार्यक्रमाच्या टीमने आतापर्यंत जवळपास १५ लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. ६५०० पेक्षा जास्त भाग प्रक्षेपित झाले असून आदेश भावोजींनी जवळपास ६ लाख कुटुबांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. या एवढ्या मोठ्या प्रवासादरम्यान या शोच्या टीमला आदेश बांदेकर यांना अनेक चांगले वाईट अनुभव आले. सर्व उराशी बाळगून त्यांनी हा शो केला.
View this post on Instagram
या शोने ना केवळ ‘होम मिनिस्टर’च्या संपूर्ण टीमला तर संपूर्ण महाराष्ट्राला असे अनेक अनमोल आणि कधीही न विसरता येणारे क्षण दिले. अनेक दुरावलेल्या, ताटातूट झालेल्या नात्यांना जवळ आणले. त्यांच्यामध्ये आपुलकी निर्माण केली. गोड बोलून नात्यांमधील कटुता तर बाजूला केली सोबतच त्यांना सांभाळायची समज देखील दिली. असा हा शो एकीकडे आज २० वर्ष जरी पूर्ण करत असला तरी लवकरच शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. खुद्द आदेश बांदेकर यांनीच याबद्दल माहिती दिली आहे.
होम मिनिस्टरची आतापर्यंत २० झाली आणि तेवढीच अर्थात २० पर्व देखील झाली. त्यातली काही गाजलेली पर्व म्हणजेच भारत दौरा, महाराष्ट्र दौरा, स्वप्न गृहलक्ष्मीचे, होणार सून मी ह्या घरची, नववधू नं 1, जाऊबाई जोरात, काहे दिया परदेस, अग्गबाई सुनबाई, पैठणी माहेरच्या अंगणी, होम मिनिस्टर घरच्या घरी, कोविड योद्धा विशेष आणि नुकतंच पार पडलेलं ‘महामिनिस्टरचं’ पर्व ज्यात विजेत्या वहिनींना मिळाली 11 लाखांची सोन्याची जर असलेली पैठणी आणि ती पैठणी विणली गेली होती अपंग मुलामुलींकडून.
होम मिनिस्टर शोच्या २० वर्षांविषयीच्या प्रवासाबद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणाले की, ‘२० वर्ष आनंदाची होती, झी मराठीच्या माध्यमातून २० वर्षात साधारण ६५०० भाग, अंदाजे ६ लाख २२५० कुटुबांसोबत थेट संवाद साधता आला. विविध कार्यक्रमांमधून ६० लाख प्रेक्षकांना आनंद देता आला. या प्रवासात अनेक कुटुंबाना आणि माऊलींना भेटत असताना त्यांचा चेहेऱ्यावरील समाधान ऊर्जा देत होते आणि अजूनही अनेक कुटुंब “होम मिनिस्टरची” वाट बघत आहेत. २० वर्षाच्या या प्रवासानंतर आता वेळ आली आहे विश्रांतीची, तेव्हा आज्ञा असावी.’
होम मिनिस्टर कार्यक्रम बंद होत असल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गाला याचे खूपच दुःख होत आहे. या शोने या महिला वर्गामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण करत त्यांना त्यांच्यातले कलागुण बाहेर आणण्यास मदत केली.