मराठी सिनेसृष्टीतील अतिशय हँडसम, एव्हरग्रीन आणि प्रतिभावंत अभिनेता म्हणजे सुनील बर्वे. आज मराठी इंडस्ट्रीमधील सर्वात फिट अभिनेता म्हणून सुनील यांना ओळखले जाते. वयाची पन्नाशी ओलांडूनही त्यांच्या वयाचा थांगपत्ता देखील लावता येणार नाही. इतका चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांचा फिटनेस जपला आहे. आज ३ ऑक्टोबर रोजी सुनील त्यांचा ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे. मागील अनेक वर्षांपासून ते मनोरंजनविश्वात सक्रिय आहेत.
सुनील बर्वे यांनी हिंदी, मराठी, गुजराथी आदी भाषांमध्ये काम केले आहे. नाटक, चित्रपट, मालिका अशा मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांमध्ये काम करत त्यांची आपली छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. सुनील यांचा अभिनयाचा प्रवास थक्क करणारा आहे. अनेक चढ – उतार असलेल्या या क्षेत्रात त्यांनी त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले आणि यश मिळवले. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया सुनील यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी.
सुनील बर्वे हे या इंडस्ट्रीत येण्याअगोदर मेडीकल रिप्रेजेंटीवचे काम कार्याचे. पण त्या कामात त्यांचे मन कधीच रमले नाही. म्हणूनच सुनील यांनी अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. अभिनयासोबतच सुनील यांनी काही काळ रेडिओ जॉकीचे देखील काम केले आहे.
सुनील नोकरी करत असताना गायन आणि तबल्याच्या क्लासला जात असे. ते उत्तम गाणे गातात. त्यांनी काही अवॉर्ड शोमध्ये, काही कार्यक्रमांमध्ये त्यांच्या गायनाची झलक आपल्याला दाखवली आहे. ते सात वर्षे तबला शिकले आहेत. गांधर्व महाविद्यालयाची मध्यमा ही संगीताची परीक्षा ते उत्तीर्ण झाले आहेत.
त्यावेळी तेथील एका लहान थिएटर ग्रुपसोबत ते काम करु लागले. या थिएटर ग्रुपद्वारे त्यांना विनय आपटे यांच्या ‘अफलातून’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. ही संधी वेळ न दडवता सुनील यांनी घेतली आणि अशाप्रकारे अभिनयात त्यांना पहिला प्रोजेक्ट मिळाला. या पहिल्या नाटकात सुनील यांनी महेश मांजरेकर, अतुल परचुरे, सचिन खेडेकर यांच्यासोबत काम केले. आज हे चारही कलाकार आज मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि प्रतिभावंत कलाकार आहेत.
सुनील बर्वे यांना ’मोरूची मावशी’ आणि कशी मी राहू तशीच’ यांसारख्या मराठी नाटकांमध्ये काम केले आणि अभिनयक्षेत्रात त्यांना त्यांच्या अभिनयातील प्रतिभेच्या जोरावर काम मिळत गेली. हळूहळू सुनील बर्वे हे नाव गाजू लागले. त्यांनी अफलातून, असेच आम्ही सारे, आपण ह्यांना ऐकलंत का, ऑल दि बेस्ट, इथे हवंय कुणाला प्रेम, कशी मी राहू तशीच, चारचौघी, झोपी गेलेला जागा झाला, बायकोच्या नकळत, म्हणून मी तुला कुठेच नेत नाही, लग्नाची बेडी, वन रुम किचन, श्री तशी सौ, हॅलो इन्स्पेक्टर, हीच तर प्रेमाची गंमत आहे, ह्यांना जमतं तरी कसं आदी अनेक नाटकांमध्ये काम केले.
यासोबतच त्यांनी आई, गोजिरी, जमल हो जमलं, तू तिथं मी, आत्मविश्वास, आनंदाचे झाड, आहुती, दिवसेंदिवस, लपंडाव, लालबागचा राजा, सुगंधा यासोबतच सुनील यांनी सुधीर फडके यांच्या बायोपिकमध्ये देखील काम केले आहे. याशिवाय त्यांनी अधांतरी, असंभव, अवंतिका, आवाज, इमारत, कुंकू, कळत नकळत, ऊन पाऊस, चतुराई, चाळ नावाची वाचाळ वस्ती, जावईशोध, झोका, त्रेधातिरपीट, थरार, नायक, प्रपंच, मेघ दाटले, बोलाची कढी, रिमझिम, वळवाचा पाऊस, श्रीयुत गंगाधर टिपरे, हे सारे संचिताचे, आदी टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सध्या सुनील हे झी मराठीवरील पारू या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत झळकत आहे.
मराठीसोबतच सुनील बर्वे यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये ‘अस्तित्व,’ ‘टुन्नू की टिना’, ‘निदान’ आदी हिंदी सिनेमांचा समावेश होतो. चैल छबीला आणि गुंथून जरीवाला या गुजराती मालिकांमध्ये देखील काम केले आहे.
सुनील यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांची प्रेमकहाणी कोणत्याही सिनेमाला मागे टाकेल अशी आहे. ज्या मुलीने त्यांना नाकारले होते आणि आज तिच मुलगी सुनील यांची पत्नी आहे. सुनील यांनी प्रेमविवाह केला आहे. सुनील यांच्या पत्नीचे नाव अपर्णा बर्वे असे आहे.
=======
हे देखील वाचा : नवरात्राची पहिली माळ – श्री शैलपुत्री पूजन
=======
सुनील यांनी पाटकर कॉलेजमधून बी.एससीची पदवी घेतली आहे. त्यांनी अपर्णा यांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा ते बारावीमध्ये होते. त्यावेळी अपर्णा या अकरावीमध्ये होत्या. पाटकर कॉलेजबाहेर एका विश्वास हॉटेलच्या बाहेर अपर्णा त्यांच्या एका मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आल्या होत्या. त्याचवेळी सुनील यांनी अपर्णा यांना पहिल्यांदा पाहिले आणि पाहताक्षणीच ते त्यांच्या प्रेमात पडले.
तेव्हा अपर्णा यांनी त्यांच्या हातात त्यांच्या नावाचे एक ब्रेसलेट घातले होते. त्यावरुन सुनील यांना त्यांचे नाव अपर्णा असल्याचे समजले. त्यावेळी सुनील यांनी अपर्णा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी अपर्णा यांनी त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला होता. मात्र जेमतेम ओळख वाढवत सुनील यांनी अपर्णा यांच्यासोबत मैत्री केली. पुढे मैत्रीचे रुपांतर अर्थात प्रेमात झाले आणि मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज अपर्णा आणि सुनील यांना सानिका आणि अथर्व ही दोन मुले आहेत.