भारत असा एक देश आहे जेथे विविध जाती-धर्मांचे लोक राहतात. प्रत्येकाची परंपरा, सण साजरी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. मात्र हिंदू धर्मातील महत्वाच्या सणांपैकी एक असलेला गुढी पाडवा (Gudi Padwa) येत्या २२ मार्चला साजरा केला जाणार आहे. या दिवसापासून चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला हिंदू नववर्षाची सुरुवात होते. गुढी पाडवा भारतातील विविध भागात वेगवेगळ्या नावाने जसे उगाडी, छेकी चांद, युगादी अशा नावाने ओळखले जाते. तर जाणून घेऊयात गुढी पाडव्याचा सण का साजरा केला जातो आणि त्यामागील धार्मिक मान्यता काय आहे.
महाराष्ट्रात गुढी पाडव्याचा सण मोठ्या धुमधामात साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या घराबाहेर गुढी उभारुन त्याची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की, या दिवशी विशेष पूजा केल्याने येणारे नवं वर्ष सुख, शांति, समृद्धी आणि सौभाग्य लाभते.
गुढी पाडवा शुभ मुहूर्त
यंदाच्या वर्षी गुढी पाडव्याच्या सणाची तिथी रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी सुरु होणार असून २२ मार्चला रात्री ८ वाजून २० मिनिटांनी संपणार आहे. त्यामुळे २२ मार्चला गुढी पाडवा साजरा केला जाणार आहे. गुढी पाडव्याच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त २२ मार्चला सकाळी ६ वाजून २९ मिनिटांनी सुरु होणार असून ७ वाजून ३९ मिनिटांपर्यंत असणार आहे.
गुढी पाडव्याचे महत्व
अशी मान्यता आहे की, याच दिवशी ब्रम्ह देव यांनी सृष्टीची रचना केली होती. या दिवशी सुर्यदेव प्रथमच जगात अवतरले होते. तर पौराणिक कथा अशी आहे की, या दिवसी भगवान श्री रामाने बालीचा वध करत लोकांना त्यांच्या त्रासातून सुटका केली होती. त्यामुळेच या दिवसाला विजय दिवसाच्या रुपात साजरा केला जातो. हेच कारण आहे की, या दिवशी लोक आपल्या घराबाहेर विजयाची पताका फडकवतात. त्याचसोबत याच दिवशी शिवाजी महाराजांनी परकीय घुसखोरांचा पराभव केला होता. हा विजय शिवाजी महाराज आणि त्यांच्या साथीदारांनी गुढी उभारून साजरा केला. (Gudi Padwa)
गुढी पाडव्याच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्तावर स्नान करत प्रार्थना केली जाते. तसेच या दिवशी घराची स्वच्छता करुन त्याची सजावट करतात. फुलांच्या माळा, मातीचे दिवे आणि रांगोळी काढली जाते. नवे वस्र परिधान केले जातात. घराबाहेर गुढी उभारली जाते. देवाला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. सर्वत्र गुढीपाडव्या निमित्त मिरवणूका काढल्या जातात.
हे देखील वाचा- देशातील ‘या’ गावात केले जाते दोन मुलांचे एकमेकांशी लग्न
तसेच गुढी पाडव्याला कडुलिंबाच्या पाल्याला फार महत्व असते. आयुर्वेदात कडुलिंबाच्या झाडाला बहुगुणी असे मानले गेले आहे. त्यामुळे पाडव्याला कडुलिंबाची पाने टाकून गरम पाण्याने अंघोळ केली जाते. त्याचसोबत कडुलिंबाची पाने, फुले, ओवा, मीठ, हिंग एकत्र करुन चटणी खाल्ली जाते. या व्यतिरिक्त कडुलिंबाच्या झाडाचे आध्यात्मिक महत्व सुद्धा आहे. या झाडाला ब्रम्हदेव किंवा जगन्नाथांचे प्रतीक मानले गेले आहे.