भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी हत्या झाली. या हत्येचे पडसाद दिल्लीत एका दंगलीच्या रुपाने उमटले. 1984 मध्ये झालेल्या या दंगलीत शिखसमाजाची मोठी हानी झाली. या सर्वावर आधारीत चौरासी ही हिंदी कादंबरी आहे. सत्य व्यास यांच्या कादंबरीत एक हळुवार प्रेमकहाणी आणि त्याला दंगलीची पार्श्वभूमी अशी कथा आहे. प्रेमकथा असूनही अत्यंत परखड भाषा असलेल्या या कादंबरीमध्ये प्रशासन आणि पोलीस या दोघांच्याही भूमिकेवर प्रश्न निर्माण करण्यात आले आहेत. आता या सर्वावर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. त्याचे कारण म्हणजे डीज्नी प्लस हॉटस्टार 24 जून रोजी येणारी ग्रहण ही वेबसिरीज.
सध्या ओटीटी माध्यमांची चलती आहे. त्यातही वेबसिरीजच्या माध्यमातून अनेक गंभीर विषयांनाही नव्यानं हाताळण्यात येत आहे. सध्याॲमेझॉन प्राईमवर फॅमिली मॅनच्या दुस-या सिजनला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. तेवढाच विरोधही या सिरीजला झालाय. मात्र या वादामुळे की काय फॅमिली मॅन सिरीजला प्रेक्षकांची सर्वांधिक पसंती मिळाली आहे. आता अशीच सिरीज डीज्नी प्लस हॉटस्टार येत आहे. ग्रहण ही सिरीज 1984 मध्ये झालेल्या दिल्लीतील दंगलीवर आधारीत आहे. त्यामुळे या सिरीजचा ट्रेलर रिलीज झाल्यावर त्याचेही वाद आणि उस्तुकता या संमिश्र वातावरणात स्वागत होत आहे.
ग्रहण (Grahan) वेबसिरीजचं मूळ चौरासी ही हिंदी कादंबरी आहे. सत्य व्यास यांनी दंगलीमध्ये फरफट झालेल्या प्रेमवीरांची कथा यात गुंफली आहे. या कथेतला नायक ऋषी दंगलीतून एका शिख कुटुंबाला वाचवतो… मात्र हे करतांना तो कळत नकळत स्वतः दंगेखोर होतो. दंगलीच्या या परिस्थितीवर सत्य व्यास यांनी अत्यंत परखड भाषेतलं मांडलेलं मत हे या पुस्ककाचं आणि येऊ घातलेल्या वेबसिरीजचं सार आहे. दंगे की रात का अपना ही सन्नाटा होता है… बाक़ी सारी खामोशी से अलहदा.. बिल्कुल अलग… यह आपको डाराता नहीं… मरने से पहले की ख़ामोशी सुनाता है… सब कुछ सामान्य रहते हुए भी कितना असामान्य! नेमका हाच धागा ग्रहण या वेबसिरीजमध्ये पकडण्यात आला आहे.
डीज्नी प्लस हॉटस्टारवर नुकताच ग्रहण सिरीजचा ट्रेलर रिलीज झाल्यावर पुन्हा 1984 च्या दंगलींवरुन वाद होणार अशी चर्चा रंगू लागली आहे. त्याचबरोबर ओटीटी माध्यमांना मिळत असलेल्या स्वातंत्र्याबाबतही चर्चा सुरु झाली आहे. पवन मल्होत्रा आणि जोया हुसैन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ग्रहणच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. गुरुसेवक आणि त्यांची मुलगी, आईपीएस अधिकारी अमृता सिंह यांची ही कथा आहे. 1984मध्ये झालेल्या दंगलीची फाईल पुन्हा उघडण्यात येते. त्यातील काही घटनांचा तपास करण्याची जबाबदारी आईपीएस अधिकारी अमृता सिंह यांच्यावर येते. अमृता सिंह यांचा हा तपास त्यांच्याच घरापर्यंत पोहचतो. त्यांचे वडील गुरुसेवक यांच्यापर्यंत दंगलीची पाळंमुळं पोहचतात, तेव्हा अमृता हादरुन जाते. सध्याचा काळ ते 1984 चे दंगलीचे दिवस, असा प्रवास असलेली ही वेबसिरीज आठ भागांची आहे. यात अंशुमान पुष्कर, वमिका गब्बी, टीकम जोशी आणि सहीदुर रहमान यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. जार पिक्चर्सच्या या वेबसिरीजचे दिग्दर्शक रंजन चंदेल आहेत.
एक हळुवार प्रेमकहाणी ते दंगलीच्या काळ्या धुराआड लपलेलं एक रहस्य असा प्रवास करणा-या या वेबसिरीजबाबात प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. 24 जून रोजी रिलीज होणारी ग्रहण सिरीज 1984च्या दंगलीतील आठवणी नव्यानं जाग्या करणार हे नक्की.
– सई बने.