तुम्हाला जर मी सांगितलं की उत्तर प्रदेशचा पहिला मुख्यमंत्री एक मराठी माणूस होता तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? ऐकायला जरी विचित्र वाटतं असलं तरी ही गोष्ट खरी आहे. स्वतंत्र भारतात उत्तर प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्रिपद भुषवणारी व्यक्ती ही मराठी होती. इतकंच नाही तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यसैनिकांसाठी त्यांनी चांगली कामगिरीही केली होती.
गोविंद वल्लभ पंत हे मुळचे महाराष्ट्रातले. दहाव्या शतकात पंत यांचे कुटुंब उत्तर भारतात स्थायिक झाले होते. १० ऑक्टोबर १८८७ साली पंत यांचा जन्म उत्तराखंडमध्ये मराठी कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. गोविंद पंत यांचे वडिल मनोहर पंत हे सरकारी नोकर होते. त्यांची नोकरी फिरतीची असल्याने गोविंद पंतांचे संपूर्ण पालनपोषण त्यांचे आजोब बद्री दत्त यांनी केले. बद्री दत्त हे सुद्धा स्थानिक शासनात अधिकारी होते. त्यांनीच पंतावंर संस्कार केले आणि पंतांवर त्यांचा खुप प्रभावही होता. (Govind Vallabh Pant)
अलाहबाद विद्यापीठातून पंतांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. काशिपूरमध्ये त्यांनी वकिलीची प्रॅक्टिसही सुरू केली. १९१४ पासून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. स्वातंत्र्यसैनिक रामप्रसाद बिस्मिल आणि अश्फाकउल्लाह खान यांच्याविरोधात काकोरी केस सुरु होती. पंतांनी या दोघांसाठी कोर्टात बाजू मांडली. १९२८ साली सायमन कमिशनविरोधात काँग्रेसने आंदोलन केले होते. तेव्हा ब्रिटिशांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. जवाहरलाल नेहरु या आंदोलनात सहभागी होते. ब्रिटिश पोलिस जेव्हा नेहरुंवर लाठीने हल्ला करणार होता तेव्हा पंत मध्ये आले आणि त्यांना नेहरूंना लाठ्या खाण्यापासून वाचवले. खुद्द नेहरु यांनी आपल्या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे. पण यात पंत गंभीर जखमी झाले आणि हा त्रास त्यांना पुढे आयुष्यभर सुरूच राहिला.
१९४२ च्या चले जाव लढ्यात पंतांनी हिरहिरीने सहभाग घेतला होता. तेव्हा पंतांना ब्रिटिशांनी अहमदनरगच्या तुरुंगात डांबले होते. जवाहरलाल नेहरुंनी पंतांची कोर्टात बाजू मांडली आणि तब्येतीच्या कारणावर त्यांची सुटकाही केली. महात्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहात सहभाग नोंदवला म्हणून पंत तुरुंगातही गेले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात उत्तर प्रदेश हा मध्य प्रांत म्हणून ओळखला जायचा. १९४६ साली मध्य प्रांतात विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळलं. तेव्हा काँग्रेसने गोविंद वल्लभ पंत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. पुढे वर्षभरात देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वतंत्र भारतात उत्तर प्रदेशचे १९४७ ते १९५४ पर्यंत पंतच मुख्यमंत्री होते. (Govind Vallabh Pant)
=================
हे देखील वाचा: यांच्यामुळे मी मुख्यमंत्री होऊ शकले नाही !
==================
मुख्यमंत्री असताना पंतांनी राज्यात पंचायत व्यवस्था आणली. त्यामुळे स्थानिकांचे प्रश्न सोडवणे आणखी सोपे गेले. पंतांनी शेतकऱ्यांना शिक्षण घेण्याची आणि सहकारी तत्वावर व्यवसाय करण्याची प्रेरणा दिली. पंत मुख्यमंत्री असताना राम जन्मभुमीचे आंदोलन सुरू झाले होते. त्यांच्याच काळात १९४९ साली बाबरी मशिदीत राम आणि सिताचे पुतळे ठेवण्यात आले होते. तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी पंतांना हे पुतळे हटवण्याचे आदेश दिले होते. पण पंतांनी तसे करण्यास नकार दिला. असे केल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते हे पंतांनी नेहरुंना पटवून दिले. १९५० साली राज्य सरकारने या जागेचा ताबा घेतला. तसेच या भागात हिंदूंना प्रार्थना करायला परवानगी दिली आणि मुस्लिमांना या भागात नमाझ पठण करण्यास बंदी घातली.
पुढे गोविंद वल्लभ पंत यांची वर्णी केंद्रीय गृहमंत्रिपदी लागली. १९५५ ते १९६१ या काळात ते देशाचे गृहमंत्री होते. गृहमंत्रिपदी असतानाही त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवली. या काळात देशात भाषानिहाय प्रांतरचना झाली. ही प्रांतरचना करण्यात आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात पंतांनी उत्तम कामगिरी केली. पंत गृहमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारची आणि काही राज्यांची अधिकृत भाषा हिंदी केली होती. पंतांनी केलेल्या देशसेवेबद्दल हयातीत त्यांना भारतरत्न देऊन सन्मान करण्यात आला होता. पुढे ७ मार्च १९६१ ला त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचे निधन झाले. रामजन्मभुमी आंदोलनात त्यांनी घेतलेल्या भुमिकेमुळेच कायदा सुव्यवस्था राखली आणि कुठलीही दंगल झाली नाही. (Govind Vallabh Pant)